माळेगांव कारखान्यासाठी ८८. ४८ टक्के उच्चांकी मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 21:41 IST2025-06-22T21:40:40+5:302025-06-22T21:41:59+5:30
शरद पवार गटाचे बळीराजा सहकार बचाव पॅनलचे २० उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले.

माळेगांव कारखान्यासाठी ८८. ४८ टक्के उच्चांकी मतदान
लोकमत न्यूज नेटवर्क, माळेगांव: माळेगांव कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज रविवार ( दि.२२) रोजी आज मतदान प्रक्रिया पार पडली.एकूण कारखान्याचे निवडणुकीमध्ये एकूण चार पॅनल व अपक्ष यांच्यामध्ये लढत होती.त्यासाठी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ८८. ४८ टक्के एकूण मतदान झाले. प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील श्री निलकंठेश्वर पॅनल व गुरु-शिष्यांचा चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा शेतकरी सहकार बचाव पॅनल यांच्यामध्ये प्रामुख्याने तुल्यबळ लढत होती. शिवाय शरद पवार गटाचे बळीराजा सहकार बचाव पॅनलचे २० उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले.
‘माळेगाव’ च्या कार्यक्षेत्रात आजचा दिवस सभासद राजाचाच होता. सभासदांना प्रचंड लक्ष्मी दर्शन झाल्याची परीसरात चर्चा होती. त्यामुळे मतदारही प्रचंड संख्येने बाहेर पडल्यााचे मानले जाते. त्यामुळे मतदानाची टक्केवारीमध्ये प्रचंड वाढ झाली.वाढलेला टक्का कोणत्या कोणाला तारक ,तर कोणाला मारक ठरणार याचीच उत्सुकता आहे.अवघ्या काही तासांवर निकाल आल्याने ‘साहेब’ ,दादांसह आण्णाकाकांचे राजकीय भवितव्य या निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागले आहे.
लोकसभा, विधानसभेनंतर काका पुतण्यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांविरोधात शड्डु ठोकला.तसेच महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असणार्या भाजपच्या गुरुशिष्यांनी या निवडणुकीत संपुर्ण राजकीय ताकत पणाला लावली.शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत या निवडणुकीसाठी चार दिवस तळ ठोकुन होते.त्यामुळे निवडणुक मोठ्या चुरशीची झाली.रविवारी(दि २२) झालेल्या मतदानात माळेगाव गटामध्ये मोठ्या प्रमाणावर क्रॉस मतदान झाल्याचे झाल्याने कोणत्या उमेदवाराचा बळी जाणार याची चर्चा सभासदांमध्ये होती या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे सभासदाने कोणता उमेदवार चांगला, तसेच नात्यागोत्याचे कोण आहे हे लक्षात घेऊन मतदान केले.त्यामुळे उमेदवार मात्र चिंताग्रस्त दिसत होते.निकालाची खात्री नसल्याने उमेदवार संभ्रमात आहेत.
माळेगांव कारखान्याच्या निवडणुकीसाठी सकाळी ७ वाजता मतदानास सुरवात झाली.यावेळी सकाळी ९ वाजेपर्यंत ९.११ टक्के मतदान झाले,सकाळी ११ वाजेपर्यंत २५.८१ टक्के,१ वाजेपर्यंत ४७.६६ टक्के,३ दुपारी ३ वाजेपर्यंत ६७.७५ टक्के,तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत ८४.२२ टक्के मतदान झाले.तर सायंकाळी ‘ब’ वर्ग मतदारसंघाचे ९९.०२ टक्के मतदान झाले.याच ‘ब’ वर्गातून खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणुक लढवित आहेत.
उपमुख्यमंंत्री अजित पवार यांनी बारामती येथे मतदान केले.यावेळी पत्रकारांनी पीडीसी बॅकेबाबत विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, आचारसंहिता सुरू झालेल्या दिवसापासून शरद संकुल याठिकाणी त्यांचा अड्डा तिथेच आहे. सहकाराच्या नियमात आचारसंहितेच्या काळात कोणालाही त्या ठिकाणी बसता येत नाही, प्रचार करता येत नाही याद्या करता येत नाहीत. काल रात्री सुद्धा तिथे बसूनच राजकारण चाललं होतंय. मला रात्री फोन आलेला दादा तिथे 'स्कॉड' पाठवा बघा काय होते. ते काय करायचं, पण ज्याचं त्याला लखलाभ, ज्याच त्याला लखलाब मला त्यात पडायचं नाही. पीडीसी बँकेत निळकंठेश्वर पॅनल चा एक तरी सदस्य होता का? असा सवाल उपमुख्यमंत्री पवार यांनी केला
ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांनी ११ हजार लोकांना प्रत्येकी १० हजार रुपयांनी प्रत्येकाला पैसे वाटायचे, अशी आम्हाला माहिती मिळाल्याचा खळबळजनक आरोप पत्रकारांशी बोलताना केला. गेली ४० वर्षे आम्ही लोकांच्यात राहून काम करत आहोत. लोकांचा कल आम्हाला जाणवत आहे. शंभर टक्के आमचा पॅनल विजयी होईल.पैशापेक्षा प्रेम आणि विश्वास मोठा आहे. आणि ते आम्ही संपादन केले आहे. म्हणूनच आम्हाला निवडून येण्याची खात्री असल्याचे तावरे म्हणाले.
खासदार सुप्रिया सुळे पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या,स्व.यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजविली.त्यांचेच संस्कार घेवुन गेली सहा दशके ‘पवारसाहेब’ बारामतीकरांच्या आशिर्वादानेव महाराष्ट्राच्या सहकार्याने देशात सहकाराचे नेतृत्व करीत आहेत.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून लोकशाही टिकविण्यासाठी मतदान महत्वाचे आहे.इव्हीएम मशिन,बॅलेट पेपर निवडणुक प्रक्रीयेचा भाग असुून त्याचा सन्मान करणे आवश्यक आहे.निवडणुका पादर्शन पध्दतीने झाल्या पाहिजेत,असे सुळे म्हणाल्या.