Maharashtra Election 2019 : ...अन् तो मंत्री कोल्हा'पुरातून' कोथरूडमध्ये वाहत आला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 20:29 IST2019-10-14T20:29:08+5:302019-10-14T20:29:16+5:30
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती असताना सत्ताधारी निवडणुकांच्या प्रचारात मग्न होते.

Maharashtra Election 2019 : ...अन् तो मंत्री कोल्हा'पुरातून' कोथरूडमध्ये वाहत आला
पुणे- महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती असताना सत्ताधारी निवडणुकांच्या प्रचारात मग्न होते. त्यादरम्यान काय झालं? राज्यात एवढा पूर आला की कोल्हापूरचा एक मंत्री वाहत पुण्यात आला, असं म्हणत राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे, ते पुण्यातल्या कसब्यातील सभेत बोलत होते. कोथरूड मतदारसंघातून यंदा भाजपानं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. पाटील हे मूळचे कोल्हापूरचे असल्याने बाहेरचा उमेदवार कोथरूडकरांवर लादल्याची टीका करण्यात येत होती. मनसेने कोथरूडमधून किशोर शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती असताना सत्ताधारी निवडणुकांच्या प्रचारात मग्न होते. त्यादरम्यान काय झालं? तर कोल्हापूरचे एक मंत्रीच पुण्यात वाहत आला. #RajThackerayLive
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) October 14, 2019
या उमेदवाराला काँग्रेस राष्ट्रवादीने देखील पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांची आज कसबा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारासाठी सभा आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला. सव्वाशे वर्ष मराठेशाहीने ह्या संपूर्ण भूप्रदेशावर राज्य केलं होतं, पण आपला इतिहास पोहोचवला जात नाही. त्या वैभवशाली इतिहासाचा प्रचार-प्रसार सरकारने करायचा असतो. पण हे सरकार पुतळ्यांची स्मारकं करण्याच्या घोषणेत मश्गुल असल्याची टीकाही राज ठाकरेंनी भाजपा सरकारवर केली आहे.
अमोल यादव नावाच्या एका तरुणाने विमान बनवलं. नंतर त्याने ते मुख्यमंत्र्यांना दाखवलं. त्याला आश्वासन दिलं गेलं की 'ठाण्यात जमीन उपलब्ध करून देतो.' वास्तवात जमीन दिली नाही. अखेर तो मुलगा सरकारी दिरंगाईला कंटाळून अमेरिकेत गेला. हेच तुमचं 'मेक इन महाराष्ट्र'?, असं म्हणत राज ठाकरेंनी फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.