LPG Gas Crisis : राहुल गांधी जाणीवपूर्वक भीती पसरवत आहेत; फडणवीसांचा गंभीर आरोप
By किरण शिंदे | Updated: March 15, 2026 16:54 IST2026-03-15T16:53:10+5:302026-03-15T16:54:39+5:30
काही ठिकाणी दिसत असलेल्या रांगा या अफवांमुळे निर्माण झालेल्या भीतीचे परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले.

LPG Gas Crisis : राहुल गांधी जाणीवपूर्वक भीती पसरवत आहेत; फडणवीसांचा गंभीर आरोप
पुणे - राज्यात गॅस टंचाईच्या अफवा पसरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना दिलासा देत गॅससाठी कुणीही घाबरून रांगा लावण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे नेते जाणीवपूर्वक लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पुण्यात आज मेट्रोच्या महत्त्वाच्या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले.पुणे मेट्रो भवनचे उद्घाटन झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी गॅस टंचाईबाबत सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली.
फडणवीस म्हणाले की, राज्यात किंवा देशात गॅसची कोणतीही कमतरता नाही. केंद्र आणि राज्य सरकारकडून वारंवार नागरिकांना याबाबत माहिती देण्यात येत आहे. पुरेसा गॅस साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाऊन रांगा लावण्याचे काहीच कारण नाही. काही ठिकाणी दिसत असलेल्या रांगा या अफवांमुळे निर्माण झालेल्या भीतीचे परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांनी आरोप केला की, राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे नेते लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत.. सरकारकडे पुरेसा साठा असून नागरिकांना आवश्यक तेवढा गॅस मिळत राहील. त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि गॅससाठी अनावश्यक गर्दी करू नये. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.