परांजपेसारख्या अनेक व्यक्ती मी बघतो. त्यांना ज्या गोष्टी कळणं आवश्यक आहेत, असं मला वाटतं त्या या संभाषणात दडलेल्या आहेत... परांजपे साहेब, आपण फक्त १० मिनिटेच चालू शकता... बरोबर? आणि दोन-तीन वर्षांपूर्वी चांगले पाऊण- एक तास चालण्याचा व्यायाम करत होतात.? हो, हे बरोबर? आहे. परांजपे या कंबरेच्या त्रासामुळे तुम्ही तुमचं चालणं कमी केलंत. चाललोच नाही, तर कंबर दुखणारच नाही आणि पायात गोळे येणार नाहीत हा तुमचा युक्तिवाद. पण यात तुम्ही अनेक महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहात. वय वाढेल, तसं चालण्याचं महत्त्व वाढत जातं... नव्हे, तर चालण्याच्या व्यायामाशिवाय इतर व्यायाम अशक्य होत जातात. तुम्ही चालला नाहीत, तर तुमचा डायबेटीस वाढेल, हृदयरोग आटोक्यात राहणार नाही. आणखी काही महिन्यांनंतर उभं राहणंसुद्धा कष्टप्रद होईल. तुमच्या कंबरेच्या मणक्याच्या तीन- चार व पाच नंबरच्या मणक्यातील शिरा दबलेल्या आहेत. तीन व चार नंबरचे मणके एकमेकांवर घसरलेले आहेत. शस्त्रक्रियेने हा दाब काढून या मणक्यांना आधार दिला, तर तुमचं चालणं पूर्ववत होऊ शकतं. हा निर्णय घेताना, फक्त कंबरदुखी व न्युरोजेनिक क्लाॅडीकेशन बरं व्हावं हा उद्देश नाही, तर चालण्याची क्षमता वाढून डायबेटीस, हृदयरोग आटोक्यात राहावेत, मानसिक उत्साह आणि आयुष्य उपभोगण्याची क्षमता वाढावी हा महत्त्वाचा विचार यात आहे. शस्त्रक्रिया कधी व कोणावर करावी हे ठरवणं हे शास्त्रच आहे, ते शास्त्र प्रगत आणि उपयुक्त आहे. शस्त्रक्रिया करू नका, असा तुमच्या आजाराचा व एमआरआय तपासणीचा व्यवस्थित अभ्यास न करता मिळालेला सल्ला हा जरी जनमानसाला संतोष देणारा असला, तरी नेहमीच जनआरोग्याला योग्य असतो असं नाही. व्यायामाचं महत्त्व आणि आजार बरं करण्याची क्षमता न कळण्याइतकं हे शास्त्र दूधखुळं नाही. सरसकट सगळ्यांना शस्त्रक्रिया करू नका, असा सल्ला देणारे हे महामानवतावादी नाहीत आणि व्यवस्थित विचार व तपासणी न करता शस्त्रक्रिया करणं हे महान सर्जनचं लक्षण नाही. मणक्याच्या कुठल्या आजारावर कधी व कशी शस्त्रक्रिया करावी हे न्यूरोसर्जरीसारख्या तीन ते पाच वर्षांच्या अभ्यासक्रमात शिकावं लागतं... एवढं मोठं शास्त्र आहे. शस्त्रक्रिया करू नका, असं अभिमानाने व एमआरआयसारख्या तपासण्यांकडे तुच्छतेने बघून सांगणारे माणसाचं चालणं बंद झालं, तर त्यांना मदत करायला येणार नसतात किंवा चालण्याचं अंतर कमी होऊन डायबिटीस वाढला तर तो स्वतः वर घेणार नसतात. त्यामुळे स्वतःला काय योग्य याचा यथार्थ निर्णय शास्त्रीय माहितीच्या आधारावरच व स्वतःच घ्यावा, हे उत्तम.
नेहमी वाटतं की डॉक्टर, शस्त्रक्रियेत काय धोके आहेत? याबरोबर? शस्त्रक्रिया न करण्यात काय धोके आहेत? हा प्रश्न नेहमी विचारला जावा. या दोन्ही प्रश्नांच्या उत्तराच्या तुलनेतच बऱ्याच वेळेला निर्णय दडलेला असतो. मणक्याच्या आजारांविषयी शस्त्रक्रियेचा सल्ला देणाऱ्या व शस्त्रक्रियेशिवाय फक्त व्यायाम इत्यादी करण्यास सांगणाऱ्या.... दोघांनाही या प्रश्नांची उत्तरं माहिती पाहिजेत व ती रुग्णांना आस्थेने देण्याची वृत्ती पाहिजे.परांजपेंची शस्त्रक्रिया होऊन सव्वा वर्ष झालं. ते गेली वर्षभर रोज किमान एक तास चालत आहेत. त्यांचा डायबेटीस नियंत्रणात आहेत? आणि गुडघ्या भोवतीच्या स्नायूंची शक्ती वाढल्याने ते दुखणंसुद्धा कमी झाला आहे.
- डॉ. जयदेव पंचवाघ