नेत्यांचा वैचारिक गोंधळ अन् कार्यकर्ते संभ्रमात; वर्धापन दिनाचे फलित
By राजू इनामदार | Updated: June 12, 2025 15:09 IST2025-06-12T15:09:09+5:302025-06-12T15:09:40+5:30
- दोन्ही राष्ट्रवादीच्या मेळाव्यांचे कवित्व

नेत्यांचा वैचारिक गोंधळ अन् कार्यकर्ते संभ्रमात; वर्धापन दिनाचे फलित
पुणे : नक्की काय करायचे आहे याबद्दल नेतेच गोंधळात सापडलेले, त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते संभ्रमात इतकेच काय ते भली मोठी गर्दी जमवून साजऱ्या केलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याचे कवित्व असे आता दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील त्यांचेच कार्यकर्ते बोलू लागले आहेत. ‘काय करायचे ते एकदाचे करून टाका’ किंवा मग स्पष्टपणे ‘नाही व्हायचे आम्हाला एकत्र’ असे तरी सांगून टाका, म्हणजे ‘आम्ही मोकळे आणि तुम्हीही मोकळे’ अशीच दोन्हीकडच्या बहुतांश कार्यकर्त्यांची भावना असल्याचे दिसते आहे.
महापालिका निवडणुकांची पार्श्वभूमी
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा २६ वा वर्धापन दिन मंगळवारी (दि.१०) पुण्यात वेगवेगळा साजरा झाला. अजित पवार गटाची बालेवाडीतील गर्दी ‘सत्तेचा फायदा कसा मिळवता येईल’ या विचारात तर शरद पवार गटाची बालगंधर्वमधील गर्दी ‘सत्तेची संधी मिळणार की नाही?’ या प्रश्नाच्या गुंत्यात. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थेची, प्रामुख्याने महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली. महापालिकेतील सत्ता काय असते याची पुरती माहिती असलेली ही गर्दी. त्यामुळे निष्ठेची आरती म्हटली जात असली तरी या गर्दीच्या अंतर्यामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर यांचा एकत्रीकरणाबाबत निर्णय तरी काय होतो याचाच विचार होता. काहींनी तो उघडपणे बोलून दाखवला.
एकत्र येण्यावर भाष्य नाही
मात्र, दोन्ही मेळाव्यांचा पिंपरी-चिंचवड व पुणे या राज्यातील दोन्ही महापालिकांसाठी फार काही उपयोग होईल असे काही झालेच नाही. एकीकडे पैशांची उधळपट्टी दिसत होती तर दुसरीकडे नेत्यावरची निष्ठा सोडवत नसलेल्यांची मांदियाळी. दोन्हीकडून एकत्र येण्यावर एका शब्दाचेही भाष्य झाले नाही. म्हणजेच संभ्रम कायम राहिला. दोन्ही मेळाव्यांनंतर गर्दीत तेच बोलले जात होते. साहेब आणि दादाच गोंधळलेले दिसत आहेत हे त्या गर्दीतील काही जणांचे भाष्य. मग कशाला उगाच इतका सायास करायचा? हा वैतागही त्यांच्यातलाच.
शरद पवारांचे वक्तव्य
तो निर्माण झाला शरद पवार यांनी काही महिन्यांपूर्वी केलेल्या वक्तव्याने. तसेही फूट पडल्यापासूनच ही तर शरद पवार यांचीच खेळी असे म्हटले जात होतेच. त्यातच त्यांनी ‘एकत्रीकरणाच्या निर्णयात मी नाही, त्याचा निर्णय पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे व नेते घेतील’ असे म्हटले. तेव्हापासून एकत्रीकरणाच्या चर्चेने जोर धरला. वर्धापन दिनाच्या मेळाव्यात त्यावर काहीतरी नेमके भाष्य होईल अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती, मात्र संभ्रम कायम ठेवण्यातच दोन्हीकडच्या नेत्यांनी धन्यता मानली.
नेत्यांकडून निराशा
महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाईल, अशी आशा दादांच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना होती. मात्र, ४ चा प्रभाग, युतीबरोबरच राहण्याची शक्यता, त्यामुळेच भारतीय जनता पक्षाचा वरचष्मा राहण्याची चिन्हे यामुळे त्यांची निराशा झाली. तर, शरद पवार यांच्या मेळाव्यातही साहेब पदाधिकाऱ्यांच्या मनातील ओळखतील, नक्की काहीतरी बोलतील, किमान दिशा देतील, मार्गदर्शन करतील अशी खात्री वाटणाऱ्यांच्या आशेवर पाणी पडले. राष्ट्रीय प्रश्नांवरची साहेबांची भूमिका त्यांना ऐकायला लागली, त्याशिवाय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांची ‘आमचे प्रेमाचे नाते’, ‘एकाच ताटात जेवलो आहोत’, ‘ते विसरले असतील मी विसरणार नाही’, ‘तीन निवडणुकांमध्ये त्यांनी माझेच काम केले’ अशी कौटुंबिक भावगीतेही सहन करावी लागली. तीसुद्धा मागील अनेक महिन्यांपासून वाजत आहेत.
मेळाव्यांचे फलित काय?
अजित पवार आक्रमक म्हणून प्रसिद्ध आहेत. एकत्रित राष्ट्रवादीमध्ये त्यांनी दोन्ही महापालिकांना आपला बालेकिल्ला बनवले होते. तेही सलग १५ वर्षे. भाजपने त्याला सुरुंग लावला. विसर्जित महापालिकांमध्ये दोन्हीकडे भाजपची सत्ता होती. त्यामुळेच की काय मंगळवारच्या मेळाव्याला पिंपरी-चिंचवडमधून कोणीही उल्लेखनीय नेता नव्हता. तिथे त्यांना शहराध्यक्षपदासाठी शोध घ्यावा लागला. पुण्यातही होते ते शहराध्यक्ष त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे पदमुक्त झाले. दोन दोन शहराध्यक्षशिवाय कार्याध्यक्ष नेमण्याची वेळ आली. पुण्यातूनही मेळाव्यात काही लक्षणीय कामगिरी झाली नाही.
शरद पवार यांच्या मेळाव्यात पुण्याची मान उंचावणारी ठरली, ते श्रेय शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे, मात्र सगळे नगरसेवक तिकडे गेल्याने तेही मोजक्याच नगरसेवकांसह एकटेच पडले आहेत. त्यामुळे तिथेही पुण्यातून किंवा पिंपरी-चिंचवडमधून नाव घ्यावे असे कोणीही मोठे नेते नव्हतेच.
राजकीय उत्साह नाहीच
दोन्हीकडचा मेळावा राज्याचा होता, गर्दी राज्यातून झाली होती, अजित पवार गट सत्तेतील गट, पण त्यांचे तीन तीन महत्त्वाचे मंत्रीच मेळाव्यात नव्हते. शरद पवार गट विरोधातील, अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके यांनी भाषण गाजवले व त्याचबरोबर शरद पवार यांच्या राजकारणाचे, कधीही न उलगडणारे असे मार्मिक वर्णनही केले. अन्यची भाषणे मात्र निष्प्रभ होती. कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांचेही. आपण कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण का घेत नाही? हुंडाबंदी चळवळ का सुरू करत नाही? असे प्रश्न त्यांनी केले. हे करण्यासाठी कोणी अडवले हेही त्यांनीच सांगायला हवे होते. सत्ता नाही, निवडून येण्याची हमी नाही पण अजित पवार नाहीत, त्यांचे पाठीराखे नाहीत, त्यामुळे उमेदवारी मिळेल, साहेबांचे पाठबळ मोठे ठरेल या खात्रीने अजूनही या गटात गर्दी आहे. पण, त्यांना दिलासा मिळेल असे काहीच मेळाव्यात झाले नाही.
संभ्रम कायम
अजित पवार यांचा खमकेपणा, त्वरित निर्णय घेण्याची वृत्ती व सत्तेचा फायदा उठवण्यातील कुशलता यामुळे फूट पडली. त्यावेळी साहेबांना सोडून अनेकजण त्यांच्याबरोबर गेले. तर, साहेबांचा अनुभव, अडचणीतून बरोबर मार्ग शोधण्याचे त्यांचे कौशल्य तसेच ऐनवेळी राजकीय व्यूहरचना करत विजय मिळवण्याचे विजिगीषूपण यावर प्रचंड विश्वास असणारे त्यांच्याबरोबर राहिले. कोणत्याही निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांवर फौजेचे मनोबळ वाढवण्याची, त्यांना मदतीची खात्री देण्याची, विजय आपलाच आहे असा विश्वास देण्याची फार मोठी जबाबदारी असते. या दोन्हीकडच्या मेळाव्यात प्रमुख नेतेच वैचारिकदृष्ट्या गोंधळात असल्याचे दिसते. त्यामुळेच पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधील संभ्रम इतक्या मोठ्या मेळाव्यानंतरही अजून कायमच राहिला असल्याचे दिसते आहे.