जगाला आपलेपणाच्या सुत्रात बांधणे हिंदू समाजाचे काम-मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 21:05 IST2025-06-27T21:02:38+5:302025-06-27T21:05:18+5:30

हिंदू समाजाला आपलेपणाच्या सुत्रात बांधणे हे संघाचे काम आहे. त्याच आपलेपणाच्या सुत्रात जगाला बांधणे हे हिंदू समाजाने स्वीकारलेले काम आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

It is the duty of Hindu society to bind the world in the bond of belonging - Mohan Bhagwat | जगाला आपलेपणाच्या सुत्रात बांधणे हिंदू समाजाचे काम-मोहन भागवत

जगाला आपलेपणाच्या सुत्रात बांधणे हिंदू समाजाचे काम-मोहन भागवत

पुणे : हिंदू समाजाला आपलेपणाच्या सुत्रात बांधणे हे संघाचे काम आहे. त्याच आपलेपणाच्या सुत्रात जगाला बांधणे हे हिंदू समाजाने स्वीकारलेले काम आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. संघ समाजात सेवाभावी कामांमधून आपलेपणा निर्माण करतो असे ते म्हणाले.

आयुर्वेद भास्कर प. य. तथा दादा वैद्य खडीवाले यांच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन शुक्रवारी बालगंधर्व रंगमंदिरात डॉ. भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. सिम्बायोसिस शिक्षणसंस्थेचे संस्थापक शां.ब. मुजुमदार, डॉ. राजीव ढेरे विनायक खडीवाले, संगीता खडीवाले व्यासपीठावर उपस्थित होते. संघाची कामकाज पद्धत, संघाचा सेवाभाव याबद्दल डॉ. भागवत यांनी विस्ताराने माहिती दिली, त्याचबरोबर वैद्य खडीवाले यांच्या चरित्रग्रंथाच्या वाचनातून त्यांच्यासारख्याच अनेक सेवाव्रतींना प्रेरणा मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

डॉ. भागवत म्हणाले, संघाचे काम सेवाभावातून आपलेपणा निर्माण करते. तुम्ही काम सुरू करा, संघ तुमच्याबरोबर येईल अशी ही पद्धत आहे. प्राण्यांना भूक समजते, भूक भागली हेही समजते. त्यानंतर ते काही बरोबर बांधून वगैरे घेत नाहीत. मनुष्याला बुद्धी आहे. ती आपलेपणाकडे झुकली असेल तर देवरूप होते, स्वार्थाकडे झुकली तर राक्षस होते. त्याची उदाहरणे आहेत, तसेच आपलेपणातून निर्माण झालेल्या विविधांगी कामांचाही उदाहरणे आहेत. असा आपलेपणा हिंदू समाजात निर्माण करणे हे काम संघ करतो.

डॉ. मुजुमदार यांनी महाराष्ट्रात आयुर्वेद विद्यापीठ नाही अशी खंत व्यक्त केली. वैद्य खडीवाले यांच्या कामाची त्यांनी प्रशंसा केली. ग्रंथनिर्मितीसाठी लेखिका तनुजा राहणे, मुद्रक गिरीश दात्ये यांचा डॉ. भागवत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दादा खडीवाले यांच्या कार्याविषयीच्या माहितीपटाचे सादरीकरण झाले. संगीता वैद्य खडीवाले यांनी स्वागत केले. विनायक वैद्य खडीवाले यांनी प्रास्ताविक केले. वैद्य शुभंकर कुलकर्णी धन्वंतरी स्तवन केले. स्नेहल दामले यांनी सुत्रसंचालन केले. डॉ. ढेरे यांनी आभार व्यक्त केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

आयुर्वेदातील जी काही मोठी नावे आहेत त्यातली बहुतांशी महाराष्ट्रातील आहेत, मात्र महाराष्ट्रात आयुर्वेद विद्यापीठ नाही. ते राजस्थानमध्ये आहे, नेहमीप्रमाणे ते गुजरातमध्येही आहे असे डॉ. मुजुमदार यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्रात हे विद्यापीठ व्हावे यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी डॉ. मुजुमदार यांनी केली.

Web Title: It is the duty of Hindu society to bind the world in the bond of belonging - Mohan Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.