भरधाव कारने परप्रांतीयांना चिरडले; तीन ठार तर दोन गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 23:35 IST2023-09-24T23:33:57+5:302023-09-24T23:35:30+5:30
डिंगोरे येथे मध्यप्रदेश वरून दोन-तीन दिवसांपूर्वीच काही शेतमजूर कामासाठी आले होते.

भरधाव कारने परप्रांतीयांना चिरडले; तीन ठार तर दोन गंभीर
उदापूर : कल्याण-नगर महामार्गावरील डिंगोरे हद्दीतील दत्त मंदिरा जवळील कठेश्वरी पुला लगत भरधाव येणाऱ्या कारने परप्रांतीय पाच मजुरांना चिरडले असून त्यामध्ये दोन जण जागीच ठार तर एक व्यक्ती उपचारादरम्यान मयत झाला आहे तसेच इतर दोन जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर येत आहे. डिंगोरे येथे मध्यप्रदेश वरून दोन-तीन दिवसांपूर्वीच काही शेतमजूर कामासाठी आले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की सुमारे रात्री ८:१५ वाजण्याच्या सुमारास कल्याण वरून ओतूरच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारने (एम.एच.१२ व्ही.क्यु.८९०९) महामार्गावरील पायी चालत असलेल्या पाच परप्रांतीय मजुरांना जोरदार धडक दिली. या अपघातात जगदीश महेंद्रसिंग डावर, सुरमल मांजरे, दिनेश तारोले हे तिघेजण मयत झाले तर दिनेश जाधव विक्रम तारोले या दोघे गंभीर जखमी झाले असून आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सदर घटनेची माहिती समजतात ओतूर पोलीस स्टेशनचे एपीआय सचिन कांडगे यांची टीम घटनास्थळी पोहोचली असून पुढील तपास ओतूर पोलीस करत आहे. गेल्या चार-पाच दिवसात कल्याण महामार्गावर वारंवार अपघात होऊन अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनतोय की काय अशी शंका निर्माण होऊ लागली आहे प्रशासनाने गावागावालगत गतिरोधक बसवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.