पुणे : शहर आता राहण्यालायक राहिले नाही, या भारतीय जनता पक्षाच्या खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे पदाधिकारी तुटून पडले आहेत. हा घरचा आहेर कसा वाटतो, असा प्रश्न भाजपला काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी केला तर शहर राहण्यालायक कोणी ठेवले नाही, याचा विचार करा, असा सल्ला माजी नगरसेवक शिवा मंत्री यांनी दिला.
खासदार प्रा. डॉ. कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्तांसमवेत बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी शहराच्या अनेक नागरी समस्यांवर बोट ठेवत पुणे शहर आता राहण्यालायक राहिले नाही, अशी टीका केली. महापालिकेत सलग पाच वर्षे भाजपची एकहाती सत्ता होती. त्यानंतरची तीन वर्षेही लोकनियुक्त नगरसेवक अस्तित्वात नसताना भाजपनेच राज्य सरकार, आमदार यांच्या माध्यमातून महापालिकेवर वर्चस्व ठेवले. त्यामुळेच काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष जोशी यांनी हा घरचा आहेर कसा वाटतो, असा प्रश्न भाजपच्या पुण्यातील नेत्यांना केला. शहराच्या विकासाची बकवास आता भाजप नेत्यांनी बंद करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
उपरोधिक शब्दात कुलकर्णी यांचे कौतुक
दुसरीकडे काँग्रेसचे माजी नगरसेवक शिवा मंत्री यांनी पक्षात राहून पक्षाच्या विरोधात खरे काय ते स्पष्टपणे बोलण्याच्या तुमच्या हिमतीची दाद दिली पाहिजे, अशा उपरोधिक शब्दात खासदार प्रा. डॉ. कुलकर्णी यांनी कौतुक केले आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. केंद्रात मंत्रिपदे, राज्यात मंत्रिपदे, महापालिकेतील महापौरांसह सर्व पदेही भाजपकडेच असे असताना शहर राहण्यालायक कोणी ठेवले नाही याचा विचार करणार की नाही, असा प्रश्न मंत्री यांनी केला आहे. सगळे मोठे प्रकल्प निविदेमध्येच कोणी अडकवले? काम सुरू असताना ते कोणी थांबवले? विशिष्ट ठेकेदार कंपन्यांनाच काम मिळावे, याची मोर्चेबांधणी कोणी केली? या सर्व प्रश्नांची उत्तरेही आपण अशाच हिमतीने मिळवा व पुणेकरांसाठी जाहीर करा, असेही मंत्री यांनी म्हटले आहे.