चासकमान येथे भरदिवसा बिबट्या दिसल्याने एकच खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 13:05 IST2018-04-02T13:05:55+5:302018-04-02T13:05:55+5:30
ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची नांगरट करत असताना मयूर घनवट यांना बिबट्या व दोन बछडे दिसल्याने चासपरिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

चासकमान येथे भरदिवसा बिबट्या दिसल्याने एकच खळबळ
तुषार मोढवे
चासकमान:- घनवटवाडी येथे शेतामध्ये रविवारी संध्याकाळी चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची नांगरट करत असताना बिबट्या व दोन बछडे दिसल्याने चास परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने जंगली प्राण्यांचा वावर सतत पाहावयास मिळत असतो. परंतु, आता बिबट्या व बछडे दिसल्याने परिसरातील नागरिक घराच्या बाहेर येण्यास घाबरत असून वनविभाने पिंजरा लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
मागील तीन दिवसांपूर्वी चासकमान परिसरातील मोहकल येथील शेतकरी विठ्ठल तुकाराम राऊत यांच्या दोन शेळी तर किसन रणपिसे व संजय सिताराम राऊत यांच्या प्रत्येकी एक शेळी लांडगा व तरसाने पकडून नेल्याने संबंधित शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परिसरातील शेतकरी भितीच्या सावटखाली होते व आहे.
त्यातच रविवारी संध्याकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास चास व परिसरात गावात मागील दहा ते बारा दिवसांपासून बिबट्या, लांडगा, तरस या प्राण्यांनी अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. रात्रीच्या वेळेस परिसरात हे प्राणी चासकमान धरणाच्या आखरवाडी, मोहकल जवळील डाव्या कालव्यावर तसेच विहिरीवर पाणी पिण्यासाठी येत असतात. रात्रीच्या वेळेस अंधाराचा फायदा घेऊन परिसरातील शेतकऱ्यांच्या शेळ्या, मेंढ्या यांचा फडशा पाडत असल्याची घटना वारंवार घडत आहे. या परिसरात रब्बी हंगामातील पिकांची कामे सुरु असल्याने अहमदनगर,पारनेर,संगमनेर,भागातील अनेक मेंढपाळ परिसरात दाखल झाले आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात अनेक लाकूड व्यावसायिक भरदिवसा अनेक वृक्षांची राजरोस कत्तल करण्यात येत आहे. यामुळे वृक्षतोडीवर कडक अमंल बजावणी करुन वृक्षतोड थांबवण्यासाठी कडक उपाय योजना करण्याची गरज आहे.