चित्रपट पडद्यावर साकारण्यासाठी दिग्दर्शकाला वाचावा लागतो शब्दांच्या आत दडलेला मजकूर - सुभाष घई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 20:56 IST2018-01-15T20:56:36+5:302018-01-15T20:56:57+5:30
चित्रपटाची पटकथा हे निव्वळ कागद असतात. चित्रपट पडद्यावर साकारण्यासाठी दिग्दर्शकाला शब्दांच्या आत दडलेला मजकूर वाचावा लागतो. तो त्या चित्रपटाचे एक कल्पनाविश्व तयार करतो.ती कथा कशा पद्धतीने मांडायची आहे याचे आराखडे विचारातून पक्के बांधतो. मग त्याला अनुसरूनच पात्रांची निवड करतो.

चित्रपट पडद्यावर साकारण्यासाठी दिग्दर्शकाला वाचावा लागतो शब्दांच्या आत दडलेला मजकूर - सुभाष घई
पुणे - चित्रपटाची पटकथा हे निव्वळ कागद असतात. चित्रपट पडद्यावर साकारण्यासाठी दिग्दर्शकाला शब्दांच्या आत दडलेला मजकूर वाचावा लागतो. तो त्या चित्रपटाचे एक कल्पनाविश्व तयार करतो.ती कथा कशा पद्धतीने मांडायची आहे याचे आराखडे विचारातून पक्के बांधतो. मग त्याला अनुसरूनच पात्रांची निवड करतो. अनेक प्रथितयश दिग्दर्शकांनी हेच केले, त्यातीलच एक नाव म्हणजे राज कपूर. गंभीर सामाजिक मूल्य असलेले विषयही त्यांनी वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर ठेवले.‘समझनेवाले समझ गए ना समझे वो अनाडी है’....अशा शब्दातं ’हिरो,‘कर्ज’, ‘खलनायक’ यांसारख्या चित्रपटांमधूनच स्वत:ची वेगळी छाप सोडणारा एक ‘शोमॅन’ भारतीय चित्रपटसृष्टीमधील ‘शोमॅन’ चे दिग्दर्शकीय पैलू उलगडत होता. मला ‘शोमॅन’ म्हणणं खूप संकोचल्यासारखं वाटतं, अशी प्रांजळ कबुली देत प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांनी आपल्या मोठेपणाचे दर्शन घडविले.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत ‘पिफ फोरम’ मध्ये सुभाष घई यांच्याशी डॉ. जब्बार पटेल यांनी ‘ राज कपूर आणि त्यांचे चित्रपट’
याविषयावर संवाद साधला. महाविद्यालयीन जीवनातही आम्ही मित्रमंडळी चित्रपटांबददल चर्चा करायचो. विशिष्ट दिग्दर्शक कोणत्या दृष्टीकोनातून चित्रपट बनवितो, विशेषत: राज कपूर यांच्या दिग्दर्शकीय कौशल्यांवर आम्ही बोलायचो, असे सांगून घई म्हणाले, राज कपूर यांची व्याख्या करणे अतिशय अवघड आहे. ते आपल्या चित्रपटांमधून गरिबी, सामाजिक विषमता अशा गंभीर विषयांवर भाष्य करायचे,
पण हे मांडताना प्रेक्षकांचे ते मनोरंजनही करायचे. त्यांच्या चित्रपटांमध्ये अनेक पापुद्रे असायचे. जे सहजासहजी लक्षात येणे सोपे
नाही. हे पापुद्रे उलगडून त्यांना समजून घ्यायला हवे. जगातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी ते एक होते. त्यांना काव्य आणि संगीताविषयी कमालीचा आदर होता. संगीत, नाटक व नृत्य यांचे एकत्रीकरण त्यांच्यासारखे फार कमी दिग्दर्शक करू शकले. प्रत्येक माणसात एक हदय
असते आणि प्रत्येक हदयात एक माणूस असतो, असे सांगणारे राज कपूर तत्त्ववेत्तेही होते. ते केवळ मनोरंजन करायचे नाहीत, तर एक साधा माणूस त्यांनी पडद्यावर उभा केला. गांजलेल्या माणसांच्या गोष्टी सांगणारा ते ’जोकर’ झाले.’ राजू’ ही व्यक्तिरेखा केवळ तेच करू शकतात...गुरू राज कपूर यांच्याबददल शिष्यत्वाच्या भूमिकेतून घई भरभरून बोलत होते. माझ्या मते ‘मेरा नाम जोकर’ हा राज कपूर यांचा सर्वश्रेष्ठ चित्रपट आहे, तर अभिनेते म्हणून ‘अंदाज’ हा चित्रपट मला सर्वोत्कृष्ट वाटतो असेही ते म्हणाले.
मानधन न विचारता ‘खानदोस्त’ ला दिला होकार...
राज कपूर हे माझ्यासाठी ‘आयडॉल’ होते. लहानपणापासून मी त्यांचे चित्रपट पाहात आलो. मी ‘खान दोस्त’ हा चित्रपट लिहिला. तेव्हा शत्रुघ्न सिन्हाबरोबर एक निरागस शिपाई मला हवा होता. ही भूमिका त्यांनी करावी अशी माझी इच्छा होती. त्यांनी पटकथा वाचली आणि तारखा किंवा मानधन याविषयी काहीही न विचारता लगेच होकार दिला. माझे एखादे काम आवडले तर ते आवर्जून दूरध्वनी करून कौतुक करायचे....त्यांच्या चित्रपटांचे मी निरीक्षण करायचो. त्यांचा विद्यार्थी असल्याचा मला अभिमान असल्याची भावना घई यांनी
व्यक्त केली.