सह्याद्री पर्वतरांगात दरड कोसळण्याची भीती;उपाययोजनांची मागणी
By राजू इनामदार | Updated: June 17, 2025 19:41 IST2025-06-17T19:40:53+5:302025-06-17T19:41:46+5:30
- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा पुढाकार

सह्याद्री पर्वतरांगात दरड कोसळण्याची भीती;उपाययोजनांची मागणी
पुणे: सततच्या पावसाने सह्याद्री पर्वतरागांमध्ये येत्या काही दिवसात दरडी कोसळण्याचा अंदाज पर्यावरण तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने तातडीने ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांची भेट घेऊन त्यांच्याकडून यावरच्या उपाययोजना माहिती करून घ्याव्यात व अमलात आणाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्याचबरोबर वन्यजीव संरक्षण कायद्यात बदल करण्याची गरजही या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
पक्षाचे प्रदेश प्रवक्ते सुनील माने यांनी ही माहिती दिली. माने म्हणाले, “सह्याद्रीच्या पर्वतरागांमध्ये सातत्याने पाऊस सुरू आहे. पर्यावरण अभ्यासकांच्या मते येत्या काही काळात तिथे दरडी कोसळण्याची दाट शक्यता आहे. याची आधी माहिती मिळाल्याने त्यावर उपाययोजना करणे सरकारचे काम आहे. त्यासाठी डॉ. गाडगीळ यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटावे व याची माहिती घ्यावी.”
मागील काही वर्षात मानव व वन्य प्राणी यांच्यात सातत्याने संघर्ष होताना दिसतो. वेगाने होणारे शहरीकरण, जंगलांचा होणारा ऱ्हास, शेती पद्धतीत होणारे बदल, वन्यजीवांच्या संख्येतील प्रादेशिक चढउतार ही याची कारणे आहेत. अनेकदा जंगली प्राणी मानवी वस्तीत येऊन मानव तसेच पाळीव प्राण्यांवर हल्ला करत आहेत. मात्र वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ मुळे आपण जंगली प्राण्यांना इजा पोहचवू शकत नाही. त्यामुळे या कायद्यात बदल करण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्र सरकारला त्याबाबत राज्य सरकारने प्रस्ताव पाठवणे आवश्यक आहे. राज्य सरकारने यात पुढाकार घ्यावा अशीही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे माने यांनी सांगितले.