प्लास्टिक दरवाढीचा दुहेरी फटका: पिशव्यांच्या किमती ४०% वाढल्या; सर्वसामान्यांच्या खिशाला झळ
By अजित घस्ते | Updated: March 21, 2026 10:16 IST2026-03-21T10:14:14+5:302026-03-21T10:16:27+5:30
प्लास्टिक वस्तूंच्या किमतीत वाढ, पिशव्यांचे दर वाढले ४० टक्क्यांनी; सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका तर प्लास्टिकचा चटका

प्लास्टिक दरवाढीचा दुहेरी फटका: पिशव्यांच्या किमती ४०% वाढल्या; सर्वसामान्यांच्या खिशाला झळ
पुणे : आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम स्थानिक बाजारपेठांवरही जाणवत आहे. कच्च्या मालाचा तुटवडा आणि वाहतूक खर्चातील वाढीमुळे प्लास्टिक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. विशेषतः प्लास्टिक पिशव्यांच्या दरात तब्बल ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. लहान मुलांच्या खेळण्यांच्या किमतीही वाढल्याचे होलसेल प्लास्टिक खेळण्याचे व्यापारी सुरेश जैन यांनी सांगितले.
दरवाढीमुळे किराणा दुकानदार, भाजी विक्रेते आणि इतर लहान व्यावसायिक अडचणीत आले आहेत. काही विक्रेत्यांनी पर्याय म्हणून कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर सुरू केला आहे. मात्र, त्यांचेही दर तुलनेने जास्त असल्याने पूर्णतः पर्याय उपलब्ध होणे कठीण जात आहे.
जागतिक परिस्थिती स्थिर होईपर्यंत ही स्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे. पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर वाढवण्याची ही योग्य वेळ असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मुळशी पर्यावरण समन्वयक बाळासाहेब रास्ते यांनी प्लास्टिकचा वापर कमी करून पुनर्वापरक वस्तूंना प्राधान्य देण्याचे आवाहन केले.
असे आहेत सध्याचे दर
प्रकार दर प्रतिकिलो
प्लास्टिक पिशवी ५० मॉक्रो : वरची - १२५ रुपयांवरून २२५ रुपये किलो
प्लास्टिक खेेळणी : बॉल - ब’ट- - ५० रुपयांवरून ते ८० ते ९०
प्लास्टिक खुर्ची लहान - २५० रुपयांवरून ते ३५०
प्लास्टिक खुर्ची मोठी - ५५० रूपयांवरून ते ७५० ते ९००
प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या : १० रुपयांवरून १५ तर २० वरून २५
घरगुती प्लास्टिक बादल्या व भांडी : १०० रुपयांवरून १५० तसेच १८० वरून २२०
सणात प्लास्टिक वस्तू महागल्या
आगामी चैत्र यात्रांच्या काळात बाजारात लागणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंच्या किमतीत ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रामुख्याने घरगुती वापराच्या वस्तू, खेळणी, पाण्याच्या बाटल्या आणि सजावटीच्या साहित्यावर याचा मोठा परिणाम झाला आहे.
अशी आहेत दरवाढीची प्रमुख कारणे : युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली. मार्च २०२६ मध्ये जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल १०० च्या पार गेल्याने प्लास्टिकचा कच्चा माल किमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे उत्पादनाचा खर्च वाढल्याने प्लास्टिकच्या तयार वस्तू महागल्या आहेत.
- महाराष्ट्र सरकारने सण-उत्सव आणि समारंभात वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या फुलांवर पूर्णपणे बंदी घालण्याने पर्यायी प्लास्टिक साहित्याचा तुटवडा जाणवत आहे.
- डेकोरेटर्ससाठी खर्चाचे गणित बदलले आहे. नियम मोडल्यास पाच हजारांपासून २५ हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद केल्याने अनेक विक्रेत्यांनी प्लास्टिक साहित्याचा साठा कमी केला आहे.
- विक्रेते आणि ग्राहकांवर परिणाम
पुण्यातील गुलटेकडी मार्केटयार्ड व मंडई, बोअर आळी, पेठा, कोंढवा परिसरातील विक्रेत्यांनी कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे कंपन्यांनी पुरवठा कमी केला आहे. यात्रांच्या काळात प्लास्टिकच्या गृहोपयोगी वस्तूंची मोठी उलाढाल होते. मात्र यंदा वाढलेल्या किमतींमुळे ग्राहकांनी हात आखडता घेतला आहे. दुसरीकडे, प्लास्टिक फुलांवर बंदी आल्याने नैसर्गिक फुलांच्या उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
मागील काही आठवड्यांत प्लास्टिक पिशव्यांच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. पूर्वी ज्या पिशव्या ठराविक दराने मिळत होत्या, त्या आता ३० ते ४० टक्क्यांनी महाग झाल्या आहेत. किरकोळ विक्रेत्यांनाही हा वाढीव खर्च ग्राहकांवर टाकावा लागत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसत आहे. - सुरेश जैन, माजी अध्यक्ष, मंडई व्यापारी संघटना