Pune Engineer News: पुण्यातील हिंजवडीमध्ये नोकरी करत असलेल्या नाशिकच्या इंजिनिअर तरुणाने ऑफिसमध्येच आत्महत्या केली. एका नामांकित आयटी कंपनीच्या कार्यालयातच ही घटना घडली. तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी आईवडिलांसाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ही चिठ्ठी पोलिसांना मिळाली असून, त्याने आईवडिलांना ह्रदय पिळवटून टाकणारी विनंती केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नाशिकचा २३ वर्षीय पीयूष अशोक कवडे या मेकॅनिकल इंजिनिअरने नैराश्यातून आयुष्याला पूर्णविराम दिला. नाशिकचा पीयूष पुण्यात वाकडमध्ये राहायला होता. तो अॅटलास कॉपको कंपनी वर्षभरापासून नोकरी करत होता.
मी सगळ्याच बाबतीत अपयशी ठरलोय
हिंजवडीपोलिसांनी सांगितले की, 'पीयूष कवडे सोमवारी (२९ जुलै) ऑफिसमध्ये होता. मीटिंग सुरू होती, त्यावेळी तो म्हणाला की, 'माझ्या छातीत दुखत आहे.' त्यानंतर मीटिंग रुममधून बाहेर आला. त्यानंतर त्याने सातव्या मजल्यावरून उडी मारली. सकाळी १०.१५ वाजता ही घटना घडली. त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले."
तरुणाने सुसाईड नोटमध्ये काय म्हटलंय?
"तरुणाजवळ एक चिठ्ठी मिळाली आहे. त्याने कुणाचेही नाव घेतलेले नाही. पण, मी चांगला मुलगा बनू शकलो नाही. तुम्हाला एक चांगला मुलगा असायला हवा होता. मी सगळ्याच बाबती अपयशी ठरलो आहे. तुमचा वेळ वाया घालवू नका. काळजी घ्या", असे तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलेले आहे.
पीयूषच्या निधनाबद्दल कंपनीने दुःख व्यक्त केले आहे आणि त्याच्या कुटुंबीयांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. आमच्या कंपनीतील कर्मचाऱ्याचे सुरक्षा आणि आरोग्य याला कंपनीचे सर्वोतोपरी प्राधान्य आहे, असे कंपनीने म्हटले आहे.