पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे शुक्रवारी (दि. २०) शहरात मुक्कामी आगमन झाले. यावेळी असंख्य दिंड्या या पालखी महोत्सवात सहभागी झाल्या आहेत. प्रामुख्याने सामाजिक जाणिवांची शिकवण देणारी वारी म्हणूनही यंदाच्या पालखी सोहळ्याकडे बघितले जाऊ शकते. त्र्यंबकेश्वर येखील आधारतीर्थ आश्रमातील ५० चिमुकले हाच संदेश घेऊन आळंदी ते पंढरपूर मार्गावर दिंडीत सहभागी झाले आहेत.
राज्यातील आत्महत्याग्रस्त, आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आधारतीर्थ आश्रम काम करते. या आश्रमातील २५ मुले आणि २५ मुली यंदाच्या वारीत सहभागी झाले आहेत. ‘आमच्या शेतकरी बापाने आत्महत्या केली ती चूक तुम्ही करू नका’ असा संदेश हे चिमुकले वारीद्वारे देत आहेत. यासह चिमुकल्यांच्या हातात, आत्महत्या हा पर्याय नाही, व्यसन करू नका, गुन्हेगारीकडे वळू नका, असे संदेश देणारे फलक देखील आहेत. वर्ष २००९ पासून या आश्रमातील मुले दरवर्षी पालखी सोहळ्यात सहभागी होत असतात. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी या मुलांना शिकवण्याचे काम करतात. याच संस्थेतील २५ मुली आज शिक्षिका, २ मुली पोलिस उपनिरीक्षक म्हणून समाजात कार्यरत असल्याचे आश्रमाचे पदाधिकारी त्र्यंबकराव गायकवाड यांनी सांगितले.
देवा, भरपूर पाऊस पडू दे..
दिंडीत सहभागी झालेल्या या मुलांशी ‘लोकमत’ने संवाद साधला असता, ‘आम्हाला आमच्यासाठी काही नको; पण जी वेळ आमच्यावर आज आली आहे ती कुणावरही न येवो’ अशी मागणी आमची पांडुरंगाकडे आहे. देवा, भरपूर पाऊस पडून दे, कुणालाही आत्महत्या करायला लागू नये, अशी आमची आर्त विनवणी विठ्ठलाचरणी असल्याचे या चिमुकल्यांनी सांगितले.