पुणे: मुंब्रा रेल्वे अपघाताची घटना ताजी असतानाच पुण्यामध्ये रेल्वे अपघाताची एक घटना समोर आली आहे. पुण्यामध्ये धावत्या रेल्वेमध्ये आग लागल्याची घटना घडली. दौंड पुणे डेमो ट्रेनमध्ये अचानक आग लागली. ट्रेनला आग लागल्याचं लक्षात येताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. (Daund Pune Demu Train Fire)
दौंडमधून दररोज सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी ही गाडी सुटते. नेहमीप्रमाणे ही आज सकाळी पुण्याच्या दिशेने निघाली. पण अचानक रेल्वेच्या एका डब्यात आग लागली आणि गोंधळ उडाला. मिळालेल्या माहितीनुसार, दौंड - पुणे रेल्वे स्थानकादरम्यान धावणाऱ्या शटल डेमो ट्रेनमध्ये अचानक आग लागली. या ट्रेनला अचानक आग लागल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. जीव वाचविण्यासाठी प्रवासी इकडे तिकडे धावले. किंकाळ्या, आरडाओरडा अन सर्वांची पळापळ झाली.
इंजिन पासून तिसऱ्या बोगीत आग लागली होती. आग लागल्याचं कळताच ट्रेन थांबवण्यात आली. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. पण या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. पुणे विभागातील दौंड एक मुख्य स्थानक आहे. दौंडहून पुण्याकडे जाण्यासाठी सकाळी ही शटल डेमो आहे. आणि आज सोमवार पहिलाच दिवस कामाचा असल्या कारणाने दौंडहून पुण्याकडे जाणारी ही प्रचंड गर्दी असते. या गाडीमध्ये दैनंदिन प्रवासी असतात.
त्या व्यक्तीला बाहेर काढलं अन् त्याच जीव वाचला
दरम्यान दौंडवरून सुटून पुण्याला येत असताना ट्रेनच्या तिसऱ्या बोगीत टॉयलेट मध्ये शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या टॉयलेट मध्ये एक व्यक्ती अडकून राहिला होता. दरवाजा लॉक झाल्यामुळे दरवाजा उघडता येत नव्हता. या व्यक्तीने आरडाओरडा केल्याने इतर प्रवाशांच्या लक्षात आलं. या डब्यामध्ये धूर देखील पसरला होता. त्यामुळे प्रवासी प्रचंड घाबरले होते. काही विचित्र घटना घडू नये म्हणून काही प्रवाशांनी टॉयलेटचा दरवाजा तोडून त्या व्यक्तीला बाहेर काढलं आणि त्याचा जीव वाचला.
गेल्या आठ दहा दिवसात अनेक अशा घटना घडतायेत की प्रवाशांच्या जीवाशी खेळ चाललाय. रेल्वे प्रशासनाला नम्र विनंती आहे की, याची सखोल चौकशी करावी आणि काय घटना घडली याचं नेमकं कारण शोधून काढावं अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. मात्र या घटनेमुळे ट्रेनच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून याची चौकशी केली जाणार आहे. त्यामध्ये दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.