दौंड (पुणे) : सात जणांचं कुटुंब एका चारचाकी वाहनातून ते पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले होते. पहाटे साडे चारच्या सुमारास त्यातील ड्रायव्हरला चहा पिण्याची तलप होते. आणि हे कुटुंब एका टपरीजवळ थांबले. त्याचवेळी यांच्यासोबत एक भयानक घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या काही लोकांनी त्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली. कोयत्याचा धाक दाखवत महिलांच्या अंगांवरचे दागिने घेतले. इतकंच नाही, तर या कुटुंबीयांसोबत असलेल्या एका सतरा वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा देखील प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना दौंड जवळील स्वामी चिंचोली परिसरात घडली. या दुर्दैवी घटनेच्या आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची मागणी आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत केली आहे.
पंढरपूर वारीसाठी व देवदर्शनासाठी निघालेल्या पुणे जिल्ह्यातील वारकरी भजनमंडळींवर स्वामी चिंचोली, ता. दौंड परिसरात सोमवारी (दि. ३० जून २०२५) पहाटेच्या सुमारास भीषण हल्ला झाला. दोन अज्ञात युवकांनी कोयत्याचा धाक दाखवून, डोळ्यात मिरची पूड फेकून महिलांच्या अंगावरील सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटले. यासोबतच, त्यांच्या समवेत असलेल्या अल्पवयीन मुलीला बाजूला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे
या पार्श्वभूमीवर, दौंडचे आमदार राहुल कुल यांनी महाराष्ट्र विधानसभेत या घटनेचा तीव्र निषेध केला. त्यांनी मागणी केली की, "संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, त्यांच्या विरुद्ध कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि या घटनेतील पीडितांना त्वरित न्याय मिळावा यासाठी खटला जलदगती (फास्ट ट्रॅक) न्यायालयात चालवावा." तसेच, दौंड तालुक्यातील पोलिसांची संख्या अपुरी असल्याने, दौंड व यवत या दोन पोलीस स्टेशनचे विभाजन करून पाटस येथे नवीन पोलीस स्टेशन मंजूर करावे आणि आवश्यक मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी आमदार राहुल कुल यांनी केली आहे