'अनेक वेळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 13:19 IST2025-06-16T12:42:38+5:302025-06-16T13:19:58+5:30
कुंडमाळ येथील पूल दुर्घटनेवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

'अनेक वेळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
CM Devendra Fadnavis on Maval bridge collapse: मावळ येथील इंद्रायणी नदीवरील ३५ वर्षे जुना पूल कोसळून चार पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुंडमळा या पर्यटनस्थळावर इंद्रायणी नदीवरील लोखंडी साकव पूल रविवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान अचानक कोसळला. या दुर्घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हा पूल धोकादायक असल्याचे जाहीर केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मावळ तालुक्यात कुंडमळा येथे रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून अनेक पर्यटक वाहून गेले होते. कुंडमळा पुलावरुन अनेकजण नदीपात्रात पडले होते. रविवार असल्याने पर्यटकांची या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. पर्यटकांच्या वजनामुळे अचानक पूल मधोमध तुटून कोसळला. या घटनेनंतर तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर येथे माध्यमांशी बोलताना या पुलाचे काम सुरु झालं असतं, तरी इतक्या लवकर तो तयार झाला नसता असं म्हटलं आहे.
"१० जूनला कंत्राट दिल्यानंतर जरी काम सुरु झालं असतं तरी एवढ्या लवकर तो पूल तयार झाला नसता. जिल्हाधिकाऱ्यांनी हा पूल धोकादायक आहे अशी घोषणा केली होती. हा पूल धोकादायक असल्याची पाटी गावकऱ्यांनीही लावली होती. दुर्दैवाने पर्यटक त्या ठिकाणी आले. अनेकवळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाही. यामध्ये कुणाची नाहीये किंवा इतका तो कमकुवत झालाय असं त्यांना वाटलं नसेल. त्यामुळे पर्यटक त्या ठिकाणी गेले. यातून भविष्यासाठी शिकण्याकरता गोष्टी आहेत. पावसाळ्यात पर्यटक जिथे जातात अशा ५०० जागा आहेत असं जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितले. लोकांना सुरक्षित कसे ठेवता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी पत्रकारांनी पूल दुर्घटनेबाबत संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवरही मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला. "काही लोक देशाच्या सेनेवर आरोप करतात, काही लोक देशाच्या शौर्यावर आरोप करतात. त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आरोपांचे पडलं आहे. मी अशा लोकांना उत्तर द्यायला बसलेलो नाही," असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.