पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील , दत्तात्रय भरणे असे महत्वाचे नेते गैरहजर राहिले होते. त्यामुळे या तीन्ही नेत्यांच्या गैरहजरीबददल कार्यकत्यामध्ये कुजबूज सुरू होती. त्याबाबत अजित पवारांनी महत्वाची माहिती दिली.
ते म्हणाले, राष्ट्रवादीचा वर्धापन दिन पुण्यात होत असला तरी राज्याच्या इतरही काही भागात आपला वर्धापन दिनाचा कार्यक्रम साजरा होत आहे. त्यामुळे मला समाधान आहे. मात्र, आजच्या या कार्यक्रमाला आपले काही कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. छगन भुजबळ यांचा आधीच विदेश दौरा ठरलेला होता. दत्तात्रय भरणे यांचाही ३० दिवसांपूर्वी विदेश दौरा ठरलेला होता. दिलीप वळसे पाटील यांची तब्येत बरी नाही. त्यामुळे व्हीएसआयच्या कार्यक्रमाला काल आले नव्हते. त्यामुळे आजच्या आपल्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला हे तीनही प्रमुख नेते उपस्थित राहू शकले नाहीत.
पुढे अजित पवार म्हणाले, मला आजही १० जून १९९९ हा दिवस आठवतो. शरद पवार आणि इतर काही मान्यवरांनी एकत्र येत राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत पक्षाने कधीही मागे वळून पाहिलं नाही. आपल्या पक्षाला कधीही बहुमत मिळालं नाही. आपल्याला नेहमीच सत्तेत सहभागी व्हावं लागलं. कारण आधीपासूनच राजकारणाची अशी परिस्थिती निर्माण झाली की एका पक्षाची सत्ता येण्याचे दिवस संपले आहेत. कारण केंद्रात देखील कुणाला यूपीए किंवा कोणाला एनडीए अशी आघाडी आणि युती करावी लागल्याची परिस्थिती देशाने पाहिली आहे. पण सर्वांनी साथ दिल्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २६ वा वर्धापन दिन साजरा करत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा पक्ष आहे. आता काही जण मला विचारतात की तुम्ही भाजपाबरोबर का गेला आहात? मी तुम्हाला सांगतो की, २०१९ साली आपल्या पक्षाने शिवसेना पक्षाबरोबर सरकार स्थापन केलं होतं. तेव्हा देखील आपण सत्तेसाठी काही तडजोडी केल्या होत्या. कारण शेवटी विरोधी पक्षात बसून आणि घोषणा देऊन चालत नाही. आपण साधू संत नाहीत. आपण लोकांचे प्रश्न सोडवणारे आणि बेरजेचं राजकारण करणारे लोक आहोत. त्यामधून आपण भाजपा आणि एनडीएबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असे अजित पवार यांनी सांगितले.