पुणे : रिक्षा स्टँडवर रिक्षा लावण्यावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून दोघांनी रिक्षाचालकावर हत्याराने वार गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी दोघा रिक्षाचालकांना अटक केली आहे. नरेश रामंचद्र तिडंगे (४०, रा. विश्रांतवाडी) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी परशुराम राजू मानिके (२१) आणि नागेश मानिके (१९, दोघे रा. भीमनगर, विश्रांतवाडी) यांना अटक केली असून, त्यांच्या साथीदारावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार धानोरीतील साईधाम सोसायटी येथे बुधवारी (दि. ११) रात्री सव्वाआठच्या सुमारास घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे रिक्षाचालक आहेत. त्यांचा दि. ११ जून रोजी सायंकाळी रिक्षा स्टँडला रिक्षा लावण्यावरून वाद झाला होता.
त्यानंतर नरेश तिडंगे हे पॅसेजर घेऊन धानोरी येथील साईधाम सोसायटीत गेले होते. पॅसेजरला सोडल्यानंतर ते परत येत असताना वाटेत तिघांनी त्यांना गाठले. सायंकाळी झालेल्या वादाच्या रागातून त्यांनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हत्याराने त्यांच्या हातावर, पायावर, शरीरावर इतरत्र वार करून गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पदमराज गंपले करत आहेत.