आता ३१ मार्च पर्यंत ई-केवायसी करा, अन्यथा धान्य विसरा
By नितीन चौधरी | Updated: March 6, 2025 14:52 IST2025-03-06T14:51:43+5:302025-03-06T14:52:58+5:30
राज्यात २ कोटी २९ लाख ग्राहकांचे ई- केवायसी प्रलंबित

आता ३१ मार्च पर्यंत ई-केवायसी करा, अन्यथा धान्य विसरा
पुणे : शिधापत्रिकेला आधार क्रमांक जोडून त्यानुसार शिधापत्रिकेवरील नाव योग्य असल्याची खात्री करण्यासाठीची प्रक्रिया अर्थात ई-केवायसीसाठी राज्य सरकारने ३१ मार्चची मुदत दिली आहे. त्यानंतर ई केवायसी न करणाऱ्यांची शिधापत्रिकेवरून नावे वगळली जाणार आहेत. परिणामी, त्यांना धान्य मिळणार नाही, असा इशारा राज्य सरकारने दिला आहे. राज्यात
असे सुमारे २ कोटी २९ लाख ग्राहकांचे ई-केवायसी प्रलंबित आहे.
सर्वोच्च न्यायालय तसेच केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी पडताळणी करण्याच्या सूचना यापूर्वीच राज्य सरकारला दिल्या आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व रास्त भाव दुकानांवर ई-केवायसी मोहीम हाती घेऊन ही कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याची सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिल्या आहेत. ही प्रलंबितता मोठी असल्याने यासाठी यापूर्वी अनेकदा मुदतवाढ दिली होती. आता ३१ मार्च ही अंतिम मुदत दिली आहे. त्यानुसार राज्य सरकारने यासंदर्भात कार्यवाही करण्यासाठी सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी आणि अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना प्रत्येक आठवड्याला प्रलंबित ई-केवायसी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
तातडीने कार्यवाही करा
राज्यात सध्या २२ फेब्रुवारीच्या अहवालानुसार २ कोटी २९ लाख २ हजार ५६८ ग्राहकांचे ई-केवायसी प्रलंबित आहे. यासह राज्यातील २ कोटी १६ लाख ६८ हजार ४०७ आधार प्रमाणीकरण केलेल्या नोंदीदेखील ३१ मार्चपूर्वीच पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. या नोंदी सध्या पुरवठा निरीक्षकांच्या लॉगिनला असून, त्यांनी यावर तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना संबंधित जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
ई-केवायसी ३१ मार्चपूर्वी पूर्ण करावे; अन्यथा शिधापत्रिका बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी राष्ट्रीय सूचना केंद्राने मेरा केवायसी हे मोबाइल ॲप विकसित केले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी या ॲपद्वारे ई-केवायसी पूर्ण करावी. - महेश सुधळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे
पुण्यातील सद्य:स्थिती काय?
पुणे जिल्ह्यात ५ मार्चअखेर ८ लाख ५१ हजार ७६९ ग्राहकांचे ई- केवायसी प्रलंबित आहे. तर, ८ लाख ४६० ग्राहकांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण होऊन पुरवठा निरीक्षकांच्या लॉगिनला नोंदी प्रलंबित आहेत. १६ लाख २३ हजार ९२२ ग्राहकांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे.
२१ फेब्रुवारी रोजी ई-केवायसी प्रलंबित असणाऱ्यांची जिल्हानिहाय संख्या
पुणे १२,८९,८९०
परभणी ५,२७,४३१
नांदेड ९,४१,४५४
बीड ६,८६,५६४
धाराशिव ४,७२,८९०
लातूर ६,९८,१३६
नागपूर शहर ६,३१,८८६
धुळे ५,५६,५७७
सिंधुदुर्ग २,४३,६६७
हिंगोली २,९७,१२७
जळगाव १०,०६,७५६
नागपूर जिल्हा ६,५४,०१९
गडिचिरोली २,९९,०९९
नंदूरबार ४,३७,२६९
जालना ५,५७,४०३
मुंबई ई विभाग ६,८१,७४७
सोलापूर शहर १,८३,०८२
अकोला ४,४४,६८९
पुणे शहर ४,६१,४४५
अमरावती ६,६२,६७८
अहिल्यानगर ९,६९,७२३
बुलढाणा ६,०९,०९८
पालघर ६,०४,०४१
सांगली ५,८४,३९५
मुंबई ग विभाग ३,२३,३६५
यवतमाळ ६,३७,९०१
रायगड ५,४७,३३१
संभाजीनगर ७,२४,२२२
कोल्हापूर ७,६५,०६४
सोलापूर जिल्हा ५,४२,४९३
ठाणे जिल्हा १,९४,९९८
मुंबई ड विभाग २,५०,४२०
सातारा ५,१७,७१२
नाशिक ११,१९,३७९
गोंदिया ३,१७,८६४
वाशिम २,९६,९१७
चंद्रपूर ४,७०,२५५
मुंबई अ विभाग १,८०,५८०
रत्नागिरी ३,२१,२३१
वर्धा ३,१२,००६
मुंबई फ विभाग ६,४१,१६६
भंडारा २,३८,५९८
एकूण २,२९,०२,५६८