महात्मा गांधींच्या सत्याग्रहाला नाही तर क्रांतिकारकांच्या भीतीने इंग्रज पळाले- राज्यपाल कोश्यारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 15:28 IST2021-12-29T15:22:14+5:302021-12-29T15:28:29+5:30

राज्यपाल कोश्यारी यांनी सुरुवातीला गुरुकुलच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला

british revolutionaries mahatma gandhi satyagraha governor bhagat singh koshyari | महात्मा गांधींच्या सत्याग्रहाला नाही तर क्रांतिकारकांच्या भीतीने इंग्रज पळाले- राज्यपाल कोश्यारी

महात्मा गांधींच्या सत्याग्रहाला नाही तर क्रांतिकारकांच्या भीतीने इंग्रज पळाले- राज्यपाल कोश्यारी

पिंपरी : महात्मा गांधीजींच्या (mahatma gandhi) सत्याग्रहाला नाहीतर जहाल क्रांतिकारकांचा उद्रेक होईल म्हणून इंग्रज भारतातून पळाले, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. प्राचीन भारतीय संस्कृती या विषयावर व्याख्यानमाला आणि भारतीय वारसा: परिचय आणि संवर्धन या विषयावरील कार्यशाळा पुनरुत्थान समरसता गुरुकुलम चिंचवड येथे होत आहे. त्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल कोश्यारी यांनी सुरुवातीला गुरुकुलच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

यावेळी इंडियन कॉन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सचे अध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, डेक्कन महाविद्यालयाचे माजी कुलगुरू डॉ. वसंत शिंदे, गिरीश प्रभुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, महापौर उषा ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, ॲड. सतिश गोरडे आदी उपस्थित होते.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, चाफेकर बंधु यांच्या सारख्या क्रांतिकारकांच्या धाडस आणि बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. देशाला आत्मनिर्भर बनविण्याचे काम पुनरुत्थान समरसता गुरूकुलम सारखे विद्यापीठांतून होत आहे. येथे तयार होणा-या कलाकृती या चांगल्या असून यांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. भटक्या विमुक्त समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना मुळ प्रवाहात आणण्यासाठी पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचे महान कार्य सूरू आहे. त्याचा वटवृक्ष व्हावा. भटक्या विमुक्त लोकांच्या हाती कला आहे. त्यांनी निर्माण केलेल्या अनेक वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. या संस्थेच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या कलात्मक वस्तू आपण विकत घेऊन त्याला आर्थिक हातभार लावला पाहिजे,' असे आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले.

खासदार विनय सहस्रबुद्धे म्हणाले, 'पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या कार्याचे व्यापक स्वरूप आहे. भटक्या विमुक्त लोकांना शिक्षण आणि विद्येच्या प्रवाहात आणण्याचे काम प्रभुणे करत आहेत. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचे कौतुक होत आहे ही आनंदाची बाब आहे. मुख्यप्रवाह याचा अर्थ व्यापक करायला हवा, जेणेकरून भटके विमुक्त या धारेचा सहज भाग होऊन जातील. क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची शिदोरी पुढे घेऊन जाणारे गिरीश प्रभुणे यांचे काम वंदनीय आहे.

क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त समितीच्या बोधचिन्हाचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी केले. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. सतिश गोरडे यांनी आभार मानले.

Web Title: british revolutionaries mahatma gandhi satyagraha governor bhagat singh koshyari