कारण राजकारण : जिल्ह्याला उरला नाही राजकीय वाली, लोकांच्या संवेदना जाणणारा आमदार लागतोय शोधायला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 10:10 IST2025-06-11T10:08:21+5:302025-06-11T10:10:30+5:30
- अपवाद वगळता काहींचा स्टंटबाजीसाठी हॉटेलमध्ये जात मिसळवर ताव मारण्याचा प्रकार

कारण राजकारण : जिल्ह्याला उरला नाही राजकीय वाली, लोकांच्या संवेदना जाणणारा आमदार लागतोय शोधायला
-दुर्गेश मोरे
पुणे: विधानसभा निवडणूक होऊन सहा सात महिने उलटून गेले आहेत. जनमानसामध्ये अपवाद वगळता आमदारांना शोधावे लागत आहे. जे आहे ते मात्र, त्यांच्याच गोतावळ्यात अडकले आहे. त्यामुळे निवडून आलेल्यांपैकी लोकांच्या संवेदना जाणणारा आमदारच उरला नसल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. शासनादरबारी लोकांच्या व्यथा मांडणारा कोणीच नसल्याने राजकीय वालीच कोणी नसल्याचे समोर आले आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्याच्या विकासाचा म्हणा किंवा आपापल्या मतदारसंघाचा कायालापालट करण्यासाठी अनेक नतनवीन योजना, तसेच जुन्या योजना पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. निवडणूक संपली सत्ता आणि मंत्री पदेही मिळाली. त्यानंतर पाच-सहा महिन्यांचा कालावधीही उलटून गेला. पण, अद्यापही दिलेल्या आश्वासनांच्या पूर्तीसाठी कार्यवाही होताना दिसत नाही. महत्त्वाचे म्हणजे लोकांच्या संवेदना आणण्यासाठी अपवाद वगळता कोणीही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत नसल्याचे चित्र आहे. तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पूर्वी चढाओढ असायची. कुणी जनता दरबार भरवायचे, तर कोणी थेट गावात जाऊन लोकाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. एखादा फोन जरी केला, तरी काम होऊन जायचे. मात्र, आजची परिस्थिती अगदी उलट झाली आहे. मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, राहुल कुल सोडले, तर इतर आमदार कुठे आहेत, हे कोणालाच माहीत नाही.
काही आमदारांनी, तर स्टंटबाजीसाठी कुठं हॉटेलमध्ये जाऊन मिसळवर ताव मारत तर कोणी जो प्रश्न सुटलेला आहे, त्यावरच पुन्हा चर्चा करून नव्याने फाटे फोडण्याचा खटाटोप केला. पुणे शहरासाठी महत्त्वाचा असणाऱ्या रिंगरोड प्रकल्पाला गती मिळाली. पण, एका महाशयांनी थेट त्याला खोडा घालण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी गुन्हेगाराला पाचारण करून काम घेतलेल्या कंपनीलाच त्रास देण्याचा प्रयत्न केला. पण, ज्यावेळी त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले. त्यावेळी या महाशयांनी युटर्न घेऊन गायब झाले. ते आजपर्यंत कुठेच दिसले नाही. त्यामुळे नेमका काय प्रकार होता, याची खुमासदार चर्चा मात्र, जिल्ह्यात रंगू लागली.
दूसरीकडे जुन्नर, खेड आणि पुरंदरच्या आमदारांना भिंगाच्या माध्यमातून शोधणेही अवघड झाले आहे. आहेत मतदारसंघातच पण भेटतात मात्र ठराविक जणांना. त्यामुळे आम्ही जायचे कुणाकडे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. पूर्वी आमदारांचा फोन गेला, तरी प्रशासन खडबडून जागे व्हायचे आता मात्र, तशी परिस्थिती दिसत नाही. एखाद्या कामासाठी आमदारांच्या घराबरोबर प्रशासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे.
टेंडरसाठी आमदाराची मुलगी झेडपीत
काही दिवसांपासून छोट्या-मोठ्या कामांना सुरुवात झाली आहे. मात्र, ही कामे आपल्या ठेकेदारांना मिळावी यासाठी एका तालुक्यामध्ये जोरदार चढाओढ सुरू आहे. विशेष म्हणजे एका आमदाराने, तर चक्क मुलीलाच पाठवले. त्यानंतर काय काही ठेकेदारांसह मुलगी जिल्हा परिषदेत दाखल अन् कामाचे टेंडर यांनाच द्यायचे सोडले फर्मान, या घटनेमुळे संपूर्ण झेडपी हादरून गेली. इतिहासामध्ये असे कधीच घडले नव्हते. पण, काय करणार आता वेळही निघून गेली आहे. असो. एकूणच जिल्ह्यातील लोकांच्या समस्येवर बोलणारा लोकप्रतिनिधीच आता उरला नसल्याचे दिसते.
माजी आमदार अॅक्टिव्ह
विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या आमदारांना धक्का बसला आहे. त्यापैकी बहुतांश आमदार अजूनही मतदारसंघामध्ये अॅक्टिव्ह असल्याचे दिसते. दररोज त्यांचा नित्यक्रम सुरूच आहे. यामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, संग्राम थोपटे, दिलीप मोहिते पाटील, अतुल बेनके, अशोक पवार हे आजही तितकेच कार्यरत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये आजही हेच आमदार असल्याचे जाणवते.