Baramati bypoll election: कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्या उचलायच्या नाहीत; प्रत्येकाला सन्मान देणार : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 18:41 IST2026-04-12T18:40:45+5:302026-04-12T18:41:12+5:30
Baramati bypoll election: नव्या दमाच्या सक्षम लोकांना पुढे आणण्यासाठी ठोस निर्णय घेऊन त्यांना कामाची संधी उपलब्ध करून दिली जाईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची आगामी रणनीती स्पष्ट केली.

Baramati bypoll election: कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्या उचलायच्या नाहीत; प्रत्येकाला सन्मान देणार : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
बारामती : आगामी काळात विकासकामे आणि संघटनात्मक बांधणी करताना प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वासात घेऊनच पुढील दिशा ठरविली जाईल. कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्या उचलायच्या नाहीत, या भावनेला पूर्णविराम देत प्रत्येकाला सन्मान दिला जाईल. नव्या दमाच्या सक्षम लोकांना पुढे आणण्यासाठी ठोस निर्णय घेऊन त्यांना कामाची संधी उपलब्ध करून दिली जाईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची आगामी रणनीती स्पष्ट केली.
कन्हेरी येथे मारुती रायाचे दर्शन घेऊन बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ नारळ फोडून करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, बारामतीची पोटनिवडणूक ही ऐतिहासिक जबाबदारी आहे. ती माझ्यासह बारामतीकरांवर देखील आहे. दोन महिन्यांपूर्वी नियतीचा क्रूर खेळ झाला. दादा आपल्याला सोडून गेले, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अलोट जनसागर लोटला.
यावेळी संपूर्ण देशाला दादा काय चीज होते ते समजलं. दादांच्या विमान अपघातात विखुरलेले कागदपत्रे त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत असणार्या कार्यमग्नतेचीच साक्ष दिली. दादांच्या नंतर मी घेतलेली जबाबदारी महिला म्हणून पार पाडू शकेल का, असा संशय अनेकांना होता. मात्र, ‘दादां’च्या आशीर्वाद रुपाने ही जनता माझ्यामागे उभी राहिली, मला लढण्याचे बळ दिले. राज्याला पहिले महिला धोरण देणार्या परिवाराची मी सून आहे. महिला म्हणून कोणीही माझ्या कामाचे मूल्यांकन करू नये, असे मला वाटते. दादांच्या निधनानंतर तालुक्यातील यात्रा, जत्रा, उरुस अत्यंत साधेपणाने साजरे झाले. त्यामुळे बारामतीकरांचे नेत्यांविषयी असणारे अपार प्रेम, श्रद्धा दिसून आले. बारामतीकरांच्या या विश्वासाला पात्र राहून ‘दादां’च्या स्वप्नातील बारामती घडविण्यासाठी पूर्ण ताकतीने काम करेन, अशी ग्वाही देते, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या. यावेळी वातावरण भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, संकट अंगावर घेणारा आणि कामाचा धडाका लावणारा नेता आपल्यात नाही, याची सर्वांनाच जाणीव होत आहे. मतदारांचा आवाज मुंबईत नाही, तर दिल्लीत गेला पाहिजे, असे मतदान करा. कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला ठेवा. कोण पवार कुटुंबाचे विचार मनात न आणता आपण सर्वजण पवार कुटुंबाचे देणे लागतो. हे मतदानातून सिद्ध करा, असे आवाहन भरणे यांनी केले.
यावेळी भाषण करताना अजितदादांच्या आठवणींनी मंत्री आदिती तटकरे यांचे डोळे पाणावले. यावेळी आमदार सुनील शेळके, दिलीप वळसे पाटील, सना मलिक, विश्वास देवकाते, भाजपचे अविनाश मोटे आदींची भाषणे झाली. यावेळी जय पवार, रुतुजा पवार, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार शंकर मांडेकर, पृथ्वीराज जाचक, वीरधवल जगदाळे, दिगंबर दुर्गाडे, सचिन सातव, किरण गुजर आदी उपस्थित होते.