बजरंगी भाईजान’ स्टाईल कारवाई; वेश्या व्यवसायातून सुटका झालेल्या त्या १५ बांगलादेशी महिलांचा मायदेशी प्रवास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 00:09 IST2025-07-23T00:08:23+5:302025-07-23T00:09:06+5:30
Pune News: ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात सरहद्द पार करणारी निरागस मुन्नी प्रेक्षकांच्या मनाला भावली होती. मात्र पुण्यात उघडकीस आलेली सरहद्द ओलांडणारी कथा देशाच्या सुरक्षेवर गदा आणणाऱ्या गंभीर बेकायदेशीर कारवायांशी संबंधित ठरली आहे.

बजरंगी भाईजान’ स्टाईल कारवाई; वेश्या व्यवसायातून सुटका झालेल्या त्या १५ बांगलादेशी महिलांचा मायदेशी प्रवास!
‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात सरहद्द पार करणारी निरागस मुन्नी प्रेक्षकांच्या मनाला भावली होती. मात्र पुण्यात उघडकीस आलेली सरहद्द ओलांडणारी कथा देशाच्या सुरक्षेवर गदा आणणाऱ्या गंभीर बेकायदेशीर कारवायांशी संबंधित ठरली आहे. पुणे शहरात छुप्या पद्धतीने वास्तव्यास असलेल्या १५ बांग्लादेशी महिलांना पकडण्यात आले होते. त्यानंतर या महिलांना त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी पोलिसांनी मोहीम उघडली आहे.
गुन्हे शाखेची आठ पथकं, सातत्याने कारवाई
गुन्हे शाखेच्या आठ विशेष पथकांनी १५ जुलैपासून शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांनी विरोधात मोहिम हाती घेतली होती. त्यानंतर बुधवार पेठ परिसरातून वेश्याव्यवसाय करणाऱ्या काही महिलांना ताब्यात घेण्यात आलं होतं. मूळ बांगलादेशच्या असलेल्या या महिलांनी पश्चिम बंगालमधील रहिवासी असल्याचे भासवून पुण्यात आश्रय घेतला होता. मात्र तपासाअंती त्यांची खरी ओळख उघड झाली.
पोलिसांनी अलीकडेच अनेक ठिकाणी छापे टाकून या महिलांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर बेकायदेशीर प्रवेश, ओळख लपवणे आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या महिलांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांना महिला रेस्क्यू विभागात ठेवण्यात आले होते. त्यानंतर आता कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाली असून आज (२२ जुलै) रोजी त्यांना अधिकृतपणे बांग्लादेशात पाठवले जाणार आहे.
स्थानिकांची जबाबदारी, पुढील कारवाई सुरूच राहणार
या महिलांना आसरा देणाऱ्या किंवा त्यांना ओळखपत्र मिळवून देण्यात मदत करणाऱ्या स्थानिक दलालांविरोधातही चौकशी सुरू आहे. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. ही कारवाई एवढ्यावरच थांबणार नसून, शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या इतर विदेशी नागरिकांविरुद्ध देखील ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.