पुणे : "आमची 'पोल खोल यात्रा' यशस्वी होत आहे. त्यामुळं त्यावर असे भ्याड हल्ले केले जात आहेत. राज्य सरकारला लक्षात येत आहे की आपल्या भ्रष्टाचाराची सगळी प्रकरणे बाहेर येत आहेत. त्यामुळे अशाप्रकारचे हल्ले होत आहेत. आम्ही या हल्ल्याचा जाहीर निषेध करत आहोत. कुणी किती जरी हल्ले केले तरी ही पोलखोल यात्रा थांबणार नाही, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी दिली आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली.
पुढे गृहमंत्र्यांच्या गोपनीय अहवाल बोलताना फडणवीस म्हणाले, जर हा अहवाल गोपनीय आहे तर तो तुमच्याकडे कसा आला? कुठलेच कर्तृत्व सरकार दाखवत नाही आणि असे काहीतरी अहवाल समोर आणून दिशाभूल करायची हेच या सरकारचे काम सुरू असल्याचा आरोपही फडणवीसांनी केला.
'राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना राष्ट्रवादीचा अजेंडा चालवावा लागतो. त्यांनी गृहमंत्री म्हणून बोलावं हीच आमची आणि राज्याची अपेक्षा असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.