पिंपरी - बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. हल्ल्यानंतर अभिनेत्याला तातडीने उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हल्लेखोराने सैफवर सहा वेळा वार केला होता. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफवर दोन सर्जरी करण्यात आल्या. या सर्जरीसाठी जवळपास सहा तास लागले. यानंतर आता सैफला आयसीमधून एका स्पेशल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. या हल्ल्यानंतर मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थावरून प्रश्न उपस्थित केले जात आहे. तसेच विरोधकांकडून सुद्धा राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली. यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलतांना संताप व्यक्त केला ते म्हणाले,'अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यामुळे मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. मीडियाने चुकीच्या बातम्या चालवल्या, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले,'अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला. त्यानंतर मुंबईत कायदा-सुव्यवस्था ढासळली, अशा बातम्या प्रसारमाध्यमांनी माहिती न घेता चालवल्या. महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था चांगलीच राहावी, हा आमचा प्रयत्न असतो. पोलिसांनी तपास केल्यानंतर ती व्यक्ती सापडली आहे. हल्लेखोर घरात कसा गेला, नेमका चोरीच्या उद्देशाने गेला की त्यांच्यातीलच कोणी यात सहभागी होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.' उपमुख्यमंत्री पवार पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिकेच्या कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.