Ashadhi Wari 2025 : पालख्यांच्या विसाव्यामुळे चौकांना मिळाली संतश्रेष्ठांची नावे
By राजू इनामदार | Updated: June 20, 2025 17:54 IST2025-06-20T17:53:15+5:302025-06-20T17:54:57+5:30
- एकमेव महापालिका : लावणी गायिका म्हणत असे भजन आणि गवळण

Ashadhi Wari 2025 : पालख्यांच्या विसाव्यामुळे चौकांना मिळाली संतश्रेष्ठांची नावे
पुणे : पालखी सोहळा हेही शहराचे गणेशोत्सवाप्रमाणेच अनोखे वैशिष्ट्य आहे. पुण्याने यातही आपले वेगळेपण जपले असून, राज्यातील या एकमेव शहरात संत ज्ञानेश्वर महाराज पादुका चौक व संत तुकाराम महाराज चौक आहेत. शहरात प्रवेश केल्यानंतर दोन्ही पालख्यांचा पहिला विसावा पूर्वी या ठिकाणी होत असे. तिथे तत्कालीन प्रख्यात लावणी गायिका मथूबाई इंदोरीकर यांचे भजन व गवळणींचे गायन झाल्यानंतरच पालख्या तिथून पुढे शहराकडे यायला प्रस्थान करत असत.
पालख्यांच्या पहिल्या विसाव्यावरूनच पुणेकर भाविकांनी या दोन्ही चौकांचे असे नामकरण केले. फर्ग्युसन रस्त्यावर पुढे-मागे असे हे दोन्ही चौक आहेत. आळंदीहून या रस्त्याने येणाऱ्या ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या पालख्या शहरात प्रवेश करत. ज्ञानेश्वर महाराज पालखीचा पहिला विसावा ज्या चौकात होत असे, तो झाला संत ज्ञानेश्वर महाराज पादुका चौक. त्यानंतर संत तुकाराम महाराज यांची पालखी शहरात प्रवेश करत असे. ती सर्वप्रथम ज्या ठिकाणी विसावा घेई, तो चौक झाला संत तुकाराम महाराज पादुका चौक. या चौकात पुणेकर भाविकांची पालख्यांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी होत असे. विठ्ठलनामाच्या गजरात पालख्या शहरात प्रवेश करत या चौकांमध्ये पहिला विसावा घेत.
शेडगे पंचमंडळींची दिंडी क्रमांक ४ ही पालखी सोहळ्यातील महत्त्वाची दिंडी होती, ती पुण्यातलीच. शेडगे विठ्ठल मंदिर आजही प्रसिद्ध आहे. गणपतराव नलावडे, नारायणराव झांजले, मामासाहेब बडदे (यातील नलावडे पुढे महापौर झाले तर झांजले महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष व बडदे उपमहापौर) ही तत्कालीन नगरपालिकेची नगरसेवक मंडळी दिंडीचे प्रमुख शिलेदार होती. यातील बडदे दिंडीचे प्रमुख झाले. ही सगळी मंडळी पुण्याच्या तत्कालीन राजकारणातील महत्त्वाची मंडळी होती.
साधारणत: ५० ते ६० च्या दशकात पुण्यात मथूबाई इंदोरीकर म्हणून प्रसिद्ध लावणी गायिका होत्या. संत तुकारामांच्या भंडारा डोंगऱाखाली त्यांचे इंदोरी हे गाव. त्या शास्त्रीय संगीतामध्ये लावणी म्हणत. त्याही दर्शनासाठी येत. एकदा बडदे यांनी पालखीच्या एका विसाव्याजवळ या मथूबाई इंदोरीकर यांच्या गळ्यात टाळांची जोडी घातली. त्यांना काय करावे ते सुचेना. त्यांनी मग शास्त्रीय संगीतामध्ये भजन गाण्यास सुरुवात केली. त्यानंतर गवळण म्हटली. पुढे अनेक वर्षे मग ही प्रथाच पडून गेली. माजी आमदार उल्हास पवार यांनी ही माहिती दिली.
कालांतराने शहर वाढले. पूर्वी वेशीवर असणारे हे चौक शहरात कधी समाविष्ट झाले ते कळलेच नाही. भारत सावंत नगरसेवक असताना त्यांनी त्यांच्या परिसरात म्हणजे विश्रांतवाडी येथे व चंद्रकांत छाजेड यांनी दापोडी येथे पालख्यांचे स्वागत करण्यास सुरुवात केली. मात्र तरीही आज इतक्या वर्षांनंतरही शहरातील या दोन्ही चौकांचे महत्त्व कायम आहे. तिथे आता दोन मंदिरेही आहेत व वर्षभर तिथे नित्यनियमाने दिवाबत्ती होत असते, असे माजी महापौर अंकुश काकडे व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्रीकांत शिरोळे यांनी सांगितले.