Raksha Bandhan: ...अन् तरुणांनी बांधल्या सीमेवरील जवानांना राख्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 16:18 IST2022-08-11T16:18:12+5:302022-08-11T16:18:19+5:30
धायरी येथील “एक राखी -एक शुभेच्छा संदेश” या अभिनव उपक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Raksha Bandhan: ...अन् तरुणांनी बांधल्या सीमेवरील जवानांना राख्या!
धायरी : बहिण- भावाच्या अतूट, गोड मायेच्या नात्याने सजलेल्या रक्षाबंधन सणानिमित्त या वर्षी “एक राखी -एक शुभेच्छा संदेश” हा आगळा वेगळा अभिनव उपक्रम आधार सोशल ट्रस्टच्या वतीने राबविण्यात आला.
धायरी येथील आधार सोशल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संतोष चाकणकर व सहकाऱ्यांनी केलेल्या “एक राखी -एक शुभेच्छा संदेश” आवाहनाला प्रतिसाद देत धायरी परिसरातील नागरिकांनी सीमेवर तैनात सैनिकांसाठी राख्या व शुभेच्छा पत्र दिले. या उपक्रमाद्वारे आधार सोशल ट्रस्टच्या सदस्यांनी राजस्थान सीमेवर सतत कर्तव्यदक्ष असणाऱ्या बीएसएफ जवानांसोबत तसेच वरसगाव येथे सीमेवरती कर्तव्य पार पडताना युध्दात जायबंदी असलेल्या भारतीय सैनिकांना शुभेच्छा पत्रे देत राख्या बांधल्या. भारतीय सैनिक सलग बाराही महिने संरक्षणासाठी सीमेवर डोळ्यात तेल घालून काम करत असतात. त्यामुळे त्यांना रक्षाबंधन या महत्त्वाच्या सणालाही आपल्या बहिणीच्या हाताने राखी बांधायला येणे शक्य होत नाही. अशा सैनिकी भावांचा या सणाच्या दिवशी उत्साह वाढावा, त्यांच्या हातून अखंडपणे चांगली देशसेवा घडावी हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबविला असल्याचे संतोष चाकणकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.