सामाजिक कार्याचा जोपासला आदर्श; नक्षलग्रस्त मुलांच्या डोक्यावर मायेचा हात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 00:38 IST2018-09-16T00:38:16+5:302018-09-16T00:38:36+5:30
चार वर्षांपासून नक्षलग्रस्तांच्या मुलांकरिता काम करण्यास आदर्श मित्रमंडळाने सुरुवात केली

सामाजिक कार्याचा जोपासला आदर्श; नक्षलग्रस्त मुलांच्या डोक्यावर मायेचा हात
पुणे :दहशतवादाचा सामना करण्यासाठी त्याला मुळापासून उखडून टाकण्याकरिता नक्षलवाद संपविला गेला पाहिजे. त्याचा कृतिशील आदर्श घेऊन चार वर्षांपासून नक्षलग्रस्तांच्या मुलांकरिता काम करण्यास आदर्श मित्रमंडळाने सुरुवात केली.
चार वर्षांपूर्वी पुण्यात नक्षलवादी सापडले. या प्रश्नावर विचारांचे कृतीत परिवर्तन करण्याचे धाडस आदर्श मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष उदय जगताप यांनी दाखविले. गडचिरोली येथे गेल्यानंतर, तेथील लोकांची व्यवस्थेविषयी कमालीची अनास्था दिसून आली. याचे मुख्य कारण म्हणजे, त्यांना आरोग्य, शिक्षण, रोजगार याविषयी सरकारकडून कुठल्याच प्रकारचे सहकार्य मिळत नाही. या नाराजीचे रूपांतर पुढे संघर्षात झाल्याने नक्षलवाद तयार होतो आहे. शाळेकरिता रोज तब्बल पाच किलोमीटरची पायपीट करणाऱ्यांकरिता शासनाकडून दखल घेतली जात नाही अशावेळी आदर्श मित्रमंडळाने ते आपले उद्दिष्ट मानून नक्षलपीडित ११० कुटुंबांतील विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.
वर्षभर चालणाºया मंडळाच्या उपक्रमांमध्ये नक्षलग्रस्त मुलांचे पुनर्वसन, शिक्षण आणि त्यांना स्वयंपूर्ण घडविणे असा उद्देश होता. या भागात शांतता व सुव्यवस्था राहावी याकरिता परिसरातील साडेतेरा हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली.
याकामी गडचिरोलीतील पोलीस प्रशासनाचे मोठे सहकार्य लाभले. साडेतेरा हजार विद्यार्थ्यांपैकी सहा हजार ७८६ विद्यार्थी निवडण्यात आले. मुलांसोबत शांततेच्या विचारांच्या पुस्तकांचे वाचन करण्यात आले. त्याची नोंद गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये घेतली गेली. शांतता व अहिंसेच्या विचारांचा प्रचार व प्रसार हा त्यामागील हेतू होता. याशिवाय त्या भागातील ३३ पोलीस स्थानकांमध्ये ग्रंथालयांची सुरुवात करण्यात आली. ५० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. हा सगळा सामाजिक उपक्रम पाहून ५६ माओवाद्यांनी गडचिरोतील पोलीस स्थानकात आत्मसमर्पण केले.
७२ वर्षे लाइटविना...
एकीकडे मोठ्या आनंदात स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना दुसरीकडे गडचिरोतील अनेक भाग अद्याप अंधारातच आहे. स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे होऊनदेखील त्यांच्यापर्यंत लाइट पोहोचली नाही.
याकामी दोष कुणाला द्यावा, मंडळाने याकामी त्याभागातील पीडितांना मदत केली. सुरुवातीला पाच शाळांमध्ये लाइटची व्यवस्था करण्यात आली. यानंतर पुढे सहाशे घरांमध्ये लाइटचे कनेक्शन देण्यात आले. नक्षल भागातील मूळ प्रश्नांशी अद्याप संघर्ष सुरूच असल्याची भावना जगताप यांनी व्यक्त केली.
मंडळाचे उपक्रम
गडचिरोलीतील अतिदुर्गम आदिवासी भागासाठी टू व्हिलर अॅम्ब्ल्युन्स उपलब्ध करून दिल्या.
पुढील पिढी नक्षलवादाकडे जाऊ नये, याकरिता ई- लर्निंग स्कूल व ई- संस्कार वर्ग सुरू केले.
गडचिरोली पोलिसांच्या साह्याने तेथील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रदर्शनच्या सहलीचे आयोजन.