छोट्या चुकीमुळे आपला देश पारतंत्र्यात: केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 11:36 IST2023-03-17T11:36:01+5:302023-03-17T11:36:11+5:30

नाईक म्हणाले, "देशाला भविष्यात अग्रस्थानी नेण्यासाठी देखील हीच आध्यात्मिक, धार्मिक शक्ती साहाय्यक ठरेल....

A small mistake made our country a disaster said Union Minister Shripad Naik | छोट्या चुकीमुळे आपला देश पारतंत्र्यात: केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक

छोट्या चुकीमुळे आपला देश पारतंत्र्यात: केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक

पुणे : "छोट्या चुकीमुळे आपला देश पारतंत्र्यात गेला. त्यावेळी देशातील संत समाज आणि आध्यात्मिक शक्तीमुळेच देश पुन्हा उभा राहिला. संतांच्या आशीर्वादांमुळे सत्य आणि नीतिमत्तेच्या मार्गावर चालत राहिलेला हा देश सातत्याने प्रगतिपथावर आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.

महामंडलेश्वर शिवानंद महाराज प्रतिष्ठान व मातोश्री विजयाताई नाईक सामाजिक फाउंडेशनच्या पुढाकारातून महाराष्ट्राच्या इतिहासात पुण्यात पहिल्यांदाच झालेल्या साधू-संत-महंत संमेलन व दर्शन सोहळ्यात श्रीपाद नाईक बोलत होते. वर्धमान सांस्कृतिक भवनमध्ये झालेल्या या संमेलनावेळी हरियाणा येथील महंत श्रीश्रीश्री १००८ कालिदास महाराज, पंचदशनाम जुना आखाड्याचे महामंत्री श्रीश्रीश्री १००८ अशोक महाराज, हरिद्वार येथील महामंडलेश्वर प्रेमगिरी महाराज, हरिगिरी महाराज, किन्नर जुना आखाड्याच्या महामंडलेश्वर दीपाताई राजमाने (जगवाली), महामंडलेश्वर शिवानंद महाराज यांच्यासह अनेक मठाधिपती, नागा साधू, वाचासिद्धी संत, महात्मे उपस्थित होते.

गुरुवर्य प्रकाश शिंदे निर्मित भारतातील एकमेव जागृत अकरा मारुती मठाचा आणि मठाधिपती पदाचा ग्रहण सोहळा झाला. नाईक म्हणाले, "देशाला भविष्यात अग्रस्थानी नेण्यासाठी देखील हीच आध्यात्मिक, धार्मिक शक्ती साहाय्यक ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या राजकारणाला नवी दिशा देत आहेत. साधू-संतांचे आशीर्वाद व मार्गदर्शन त्यांना लाभत आहे. साधू-संतांच्या शरणागतीत आणि मार्गदर्शनात आपल्या जीवनाचे समाधान, विश्वाचे कल्याण होणार आहे."

कालिदास महाराज म्हणाले, "काही वर्षांपूर्वीपर्यंत प्रभू श्री राम मंदिराचा मुद्दा वादात होता. तो प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्याने मार्गी लावला. गंगा स्वच्छता अभियान चांगल्या पद्धतीने राबविले जात आहे. आता केंद्र सरकारने गोवंश संरक्षण आणि संवर्धनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. गोवंश असेल तर देश टिकेल आणि गोवंश असेल तर भारताला वैश्विक महाशक्ती होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. युवा पिढीने सद्सद्विवेक बुद्धीने काम करावे."

मठाधिपती पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गुरुवर्य प्रकाश शिंदे म्हणाले, लवकरच नगर रस्त्यावरील ११ मारुती जागृत मठ उभारणार आहे. आध्यात्मिक ऊर्जेने हा नवा प्रवास जबाबदारीने पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे."

Web Title: A small mistake made our country a disaster said Union Minister Shripad Naik