आडत्याने थकविलेले कांदा उत्पादक शेतक-यांचे ४९ लाख अखेर वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 18:54 IST2019-02-18T18:48:34+5:302019-02-18T18:54:35+5:30

गुलटेकडी मार्केटयार्डात काही आडत्यांकडून शेतक-यांचे शेतमालाच्या पट्टीचे पैसे थकविल्याच्या घटना घडतात.

49 lakhs recovery from onlon businessman | आडत्याने थकविलेले कांदा उत्पादक शेतक-यांचे ४९ लाख अखेर वसूल

आडत्याने थकविलेले कांदा उत्पादक शेतक-यांचे ४९ लाख अखेर वसूल

ठळक मुद्देबाजार समितीची मध्यस्ती :  शेतकऱ्यांचा प्रश्न सुटलाबाजार समितीकडे शेतक-यांनी एका आडत्याने कांदा विक्रीचे सुमारे ६४ लाख रुपये दिले नसल्याची तक्रार

पुणे :  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डात कांदा उत्पादक ५२ शेतक-यांचे शेतमालाच्या पट्टीचे आडत्याने थकविलेली ४९ लाख रुपये बाजार समितीने वसूल करून दिले. विक्री केलेल्या कांद्याचे थकीत पैसे मिळाल्यामुळे कांदा उत्पादक शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 
गुलटेकडी मार्केटयार्डात काही आडत्यांकडून शेतक-यांचे शेतमालाच्या पट्टीचे पैसे थकविल्याच्या घटना घडतात. व्यापारातील चढ उतार आणि फसवणुकीमुळे आडत्यांनाही कधी-कधी शेतक-यांचे पैसे देण्यास अडचणी निर्माण होतात. मात्र, शेतक-यांना त्यांच्या शेतमालाचे पैसे देणे आडत्याला बंधनकारकच असते. मागील काही महिन्यात मार्केटयार्डातील मे.पिंपळे आणि कंपनी या गाळ्यावर ५२ कांदा उत्पादक शेतक-यांनी कांदा विक्री केला होता. मात्र, आडत्याकडून त्याचे पैसे शेतक-यांना देण्यात आले नव्हते. त्यामुळे संबंधित शेतक-यांनी बाजार समितीकडे लेखी तक्रार केली. बाजार समिती प्रशासक बी.जे.देशमुख यांनी यात लक्ष घालून संबंधित तक्रारींवर सुनावणी घेत शेतक-यांना त्यांच्या हक्काचे ४९ लाख ६२ हजार २२४ रुपये परत मिळवून दिले.
    याबाबत पुणे जिल्ह्यातील पुरदंर तालुक्यातील बोपगाव येथील शेतकरी शामराव फडतरे म्हणाले, काही महिन्यांपुर्वी  मार्केटयार्डात सुमारे ५ ते ६ टन कांदा विक्री केली होती. त्याची पट्टी सुमारे ७१ हजार रूपयांची झाली. मात्र, वारंवार आडत्याला भेटूनदेखील त्यांच्याकडून पैसे दिले जात नव्हते. बाजार समितीकडे तक्रार केल्यानंतर समिती प्रशासनाने दखल घेत पैसे मिळवून दिले.  
--------------
बाजार समितीकडे कांदा उत्पादक शेतक-यांनी एका आडत्याने कांदा विक्रीचे सुमारे ६४ लाख १३ हजार ९१० रुपये दिले नसल्याची तक्रार केली होती. त्यानुसार बाजार समितीने संबंधित आडत्याने किती पैसे दिले आणि किती बाकी आहेत, याची शहानिशा करून सर्व अर्जांवर सुनावणी घेतली. त्यानंतर सर्व शेतक-यांचे मिळून ४९ लाख ६२ हजार २२४ रुपये त्यांना मिळवून दिले. बाजार समिती शेतक-यांच्या हितासाठीच कार्यरत आहे. पुणे बाजार समितीत शेतक-यांची फसवणुक अथवा पैसे थकविल्यास तत्काळ कार्यवाही करून शेतक-यांना न्याय देण्याचे काम केले जाते. 
बी.जे.देशमुख, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे.

Web Title: 49 lakhs recovery from onlon businessman