२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
By नारायण बडगुजर | Updated: May 27, 2025 20:40 IST2025-05-27T20:39:38+5:302025-05-27T20:40:18+5:30
१५ जखमा तिच्या मृत्यूपूर्वी २४ तासांच्या आत झालेल्या होत्या, त्यामुळे तिच्या मृत्यूपूर्वी तिला मारहाण करण्यात आल्याने आत्महत्या नसून हत्याच आहे, असे माझे ठाम म्हणणे आहे

२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
पिंपरी : वैष्णवी हगवणे हिच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर वैष्णवीच्या वडिलांनी हा खून असल्याचे म्हटले आहे. वैष्णवीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे, असे माझे म्हणणे आहे, असे सांगत वडील आनंद उर्फ अनिल कस्पटे यांनी याप्रकरणी कसून चौकशी होण्याची मागणी केली आहे.
वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यू प्रकरणानंतर हगवणे कुटुंबियांना अटक करण्यात आली. त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, वैष्णवीचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून, त्याबाबत माध्यमांशी बोलताना वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे म्हणाले, ’’शवविच्छेदन अहवालानुसार वैष्णवीच्या शरीरावर २९ जखमा होत्या. यातील १५ जखमा तिच्या मृत्यूपूर्वी २४ तासांच्या आत झालेल्या होत्या. त्यामुळे तिच्या मृत्यूपूर्वी तिला मारहाण करण्यात आली होती. यावरून ही आत्महत्या नसून हत्याच आहे, असे माझे ठाम म्हणणे आहे. तसेच उर्वरीत वळ व जखमा जुन्या असल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थात वैष्णवीला सतत मारहाण करून छळ करण्यात येत होता, हे त्यावरून सिद्ध होत आहे. तसेच याप्रकरणात चांगला वकील नियुक्त करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. आम्हाला या प्रकरणातील माहिती कळविण्यात यावी तसेच तपास एसआयटीकडे देण्यात यावा, अशी आमची मागणी आहे.’’
...म्हणून लावून दिले होते लग्न!
दरम्यान, वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, ‘‘वैष्णवी आणि शशांक यांचे लव्ह मॅरेज आहे. त्यांच्या लग्नाला सगळ्यांचा विरोध होता. घरातील सगळ्यांचा विरोध असूनही वैष्णवीने माझ्याकडे लग्न करण्यासाठी हट्ट धरला होता. तिला त्याच्याशीच लग्न करायचे होते. त्यांच्या घरात यावरून वाद झाले. त्यावेळी वैष्णवीचे वडील आनंद यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी आपण पळून जाऊन लग्न करू असे तिला शशांक म्हणाला होता. त्यावेळी तिने पळून लग्न करणार असल्याचे माझ्या मुलाला सांगितले. असा काही निर्णय घेऊ नको. तुझे वडील आयसीयूमध्ये आहेत, असे सांगून माझ्या मुलाने तिला समजवण्याचा प्रयत्न केला. पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यामुळे माझ्या मुलाने लगेच मला फोन करून सांगितले. आम्ही धावतपळत घरी आलो. तिला समजावून सांगितले. तसेच शशांकला फोन करून सांगितले की आपण याबाबतचा निर्णय नंतर घेऊ. त्यानंतर आपली समाजात बदनामी होऊ नये. म्हणून लग्न लावून दिले.
वैष्णीव म्हणाली, ‘‘माझी चूक झाली...’’
वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘‘लग्नानंतर सहा महिन्यांनी वैष्णवीचा सासरच्यांकडून छळ सुरू झाला. त्यावर मी तिला म्हणालो, वैष्णवी काय प्रकार आहे हा? त्यावर ती म्हणाली, मामा हे लग्न करून माझी चूक झाली. तिच्या सासरच्यांनी तिचा छळ करून तिला मृत्यूस कारणीभूत ठरले. त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.’’