कोल्हापूर अपघातात पुण्यातील वरखडे, केदारी, नांगरे या नातेवाईक परिवारातील १३ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 12:26 IST2018-01-27T12:21:28+5:302018-01-27T12:26:31+5:30
गणपतीपुळ्याहून कोल्हापूरकडे येणारी मिनी ट्रॅव्हल्स कोल्हापूरच्या शिवाजी पुलावर आल्यानंतर पुलाच्या कठड्याला धडकुन पंचगंगेच्या पात्रात कोसळली. या अपघातात पुणे जिल्ह्याचा मुळशी तालुक्याच्या अंबडवेट, बालेवाडी आणि पिरंगुट येथील १६ जण होते.

कोल्हापूर अपघातात पुण्यातील वरखडे, केदारी, नांगरे या नातेवाईक परिवारातील १३ जणांचा मृत्यू
वाकड : गणपतीपुळ्याहून कोल्हापूरकडे येणारी मिनी ट्रॅव्हल्स कोल्हापूरच्या शिवाजी पुलावर आल्यानंतर पुलाच्या कठड्याला धडकुन पंचगंगेच्या पात्रात कोसळली. या अपघातात पुणे जिल्ह्याचा मुळशी तालुक्याच्या अंबडवेट, बालेवाडी आणि पिरंगुट येथील १६ जण होते. या १६ पैकी १३ जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर ३ जखमींवर कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये हिंजवडीतील पत्रकार विजय वरखडे यांचे मोठे बंधू आणि दोन पुतण्या यांच्यासह अन्य नातेवाईकांचा समावेश आहे
भाऊ संतोष बबनराव वरखडे (वय ४५), पुतणी गौरी संतोष वरखडे (१६), ज्ञानेश्वरी संतोष वरखडे (१४) यांचा समावेश असून त्यांची भावजय मनिषा संतोष वरखडे (वय ३८, रा सर्वजण पिरंगुट) या भयंकर अपघातातून सुखरूप बचावल्या आहेत. यातील अन्य मृत व्यक्ती संतोष वरखडे यांच्या सासरवाडीतील पाहुणे होत. जोडून आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे त्यांनी गणपतीपुळे ट्रिपचे आयोजन केले होते.
काही तरुणांनी ही घटना पाहताच नदी पात्राकडे धाव घेतली आणि मदतकार्य सुरु केले. या तरुणांमुळे तीन जणांचे प्राण वाचले. पहाटे तीन वाजेपर्यंत पोलीस, महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी मिनी ट्रॅव्हल्स वर काढली. मृतामध्ये वाहन चालकाचाही समावेश आहे. मात्र वाहन चालकाचे नाव समजू शकले नाही.