कपडे धुण्यासाठी विहिरीवर गेलेल्या १२ वर्षीय मुलीचा इंदापुरातील कळसमध्ये मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 16:21 IST2017-12-19T15:38:34+5:302017-12-19T16:21:08+5:30
कपडे धुण्यासाठी विहिरीवर गेलेल्या मुलीचा पाय घसरुन पाण्यात पडल्याने बूडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी कळस (ता. इंदापूर) येथे घडली. अनिता सर्जेराव खारतोडे (वय १२) असे त्या मुलीचे नाव आहे.

कपडे धुण्यासाठी विहिरीवर गेलेल्या १२ वर्षीय मुलीचा इंदापुरातील कळसमध्ये मृत्यू
कळस : कपडे धुण्यासाठी विहिरीवर गेलेल्या मुलीचा पाय घसरुन पाण्यात पडल्याने बूडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी कळस (ता. इंदापूर) येथे घडली. अनिता सर्जेराव खारतोडे (वय १२) असे त्या मुलीचे नाव आहे.
येथील शरद राजेभोसले यांच्या विहिरीवर अनिता सकाळी कपडे घेवून धुण्यासाठी गेली होती. कपडे धुवत असताना तिचा पाय घसरुन ती पाण्यात पडली. बराच वेळ झाला तरी कपडे धुवून अनिता का परतली नाही, म्हणून घरच्यांनी तिचा शोध घेण्यास सुरवात केली. मात्र विहिरीवर केवळ कपडे आढळून आले. तिचा इकडे तिकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही. यामुळे ती पाण्यात पडली असावी असा अंदाज लावून नातेवाईक तरुणांनी पाण्यात उतरून तिचा शोध घेण्यास सुरवात केली. मात्र पाण्यात मोठ्या प्रमाणावर असलेल्या पाणगवतामुळे तळापर्यंत शोध घेणे जिकिरिचे ठरत होते. सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर तिचा मृतदेह पाण्यात तळाशी आढळून आला. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. वालचंदनगर पोलीस ठाण्याचे हवालदार सुरेंद्र वाघ पुढील तपास करत आहेत.
अनिता ही येथील श्री हरणेश्वर विद्यालयात सहावीच्या वर्गात शिकत होती. शिक्षणाबरोबर आई-वडिलांना ती घरकामात नेहमीच मदत करत असे. सुट्टीच्या दिवशी शेतकरी असलेल्या वडिलांना शेतीकामात मदत करत असे. तिच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.