"राणे जिथे जातात, तेथील सत्ता जाते", दीपक केसरकरांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 11:19 PM2020-11-27T23:19:14+5:302020-11-27T23:23:58+5:30
Deepak Kesarkar : फडणवीसांच्या काळात कर्जमाफीला दोन वर्ष लागली. मात्र महाविकास आघाडीने हे काम २ महिन्यात केले. माझे कुटुंब माझी जबाबदारी याची दखल जागतिक आरोग्य पातळीवर घेण्यात आल्याचे केसरकर म्हणाले.
सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे सध्या रिकामी आहेत. त्यामुळेच ते काही बोलतात. राणे जेवढे बोलतील तेवढे भाजपाच्या लोकांमधील स्थान कमी होत जाईल. पक्षच बदनाम होणार असून, जिथे राणे जातात तेथील सत्ता जाते, असा आता पर्यंतचा इतिहास आहे, अशी टीका राज्याचे माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केली आहे. ते शुक्रवारी रात्री उशिरा सावंतवाडी येथे पत्रकारांशी बोलत होते.
केसरकर म्हणाले, ज्या मुख्यमंत्र्यांचे जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाबाबत कौतुक केले आहे. मग राणेंची टीकेची नोंद कोण घेणार? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद दिले होते. त्यांनाही हयातीत त्रास देण्याचे काम राणे यांनी केले आहे. राणेंवर संपत्ती बद्दल न्यायालयात खटले सुरु आहेत. त्यांच्या एका मुलावर खंडणीचा तर दुसऱ्या मुलावर अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. राणेंची त्या ढोलकी वाल्या उंदरा सारखी परिस्थिती झाली आहे.
याचबरोबर, राणे सध्या मुख्यमंत्र्यावर बोलत आहेत. मात्र कारवाई झाली की ते कांगावा करणार आपण बोललो म्हणून कारवाई केली. राणे मुख्यमंत्र्यांवर बोलून कारण शोधू लागले आहेत, असे म्हणत केसरकर यांनी राणे यांच्यावर निशाणा साधला. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम चांगले आहे. फडणवीसांच्या काळात कर्जमाफीला दोन वर्ष लागली. मात्र महाविकास आघाडीने हे काम २ महिन्यात केले. माझे कुटुंब माझी जबाबदारी याची दखल जागतिक आरोग्य पातळीवर घेण्यात आल्याचे केसरकर म्हणाले.
नगरसेवकांचे काय नगराध्यक्षांनाही आपले पद गमवावे लागेल
सावंतवाडी शहरात नव्याने उभारण्यात आलेले स्टॉल तसेच अन्य अनधिकृत बांधकामे काढून टाकण्यात येतील, हे स्टॉल उभे राहताना त्यांना रोखण्याची मुख्याधिऱ्यांची जबाबदारी होती. त्यामुळे ते कारवाईस पात्र आहेत आणि अशा बेकायदेशीर स्टॉलना कोणी 'प्रोटेक्ट' करत असेल तर नगरसेवकच काय नगराध्यक्षांवर सुद्धा अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असा सज्जड इशारा आमदार दीपक केसरकर यांनी दिला.