"ममतांना पराभूत करणार, नंदिग्रामचा संग्राम मीच जिंकणार,’’ शुभेंदू अधिकारींचे प्रतिआव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 14:26 IST2021-03-12T14:23:40+5:302021-03-12T14:26:43+5:30
West Bengal Assembly Elections 2021, Subhendu Adhikari Challenge to Mamata Banerjee : तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपावासी झालेले नंदिग्राममधील वजनदार नेते शुभेंदू अधिकारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आता नंदिग्राममध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरुद्ध शुभेंदू अधिकारी अशी थेट लढत होणार हे आता निश्चित झाले आहे.

"ममतांना पराभूत करणार, नंदिग्रामचा संग्राम मीच जिंकणार,’’ शुभेंदू अधिकारींचे प्रतिआव्हान
कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये सुरू असलेली चढाओढ सध्याच टोकाला पोहोचली आहे. त्यातच नंदिग्राममध्ये ममता बॅनर्जींवर हल्ला झाल्याचा दावा करण्यात आल्यापासून वातावरण अधिकच तापले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपावासी झालेले नंदिग्राममधील वजनदार नेते शुभेंदू अधिकारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आता नंदिग्राममध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरुद्ध शुभेंदू अधिकारी अशी थेट लढत होणार हे आता निश्चित झाले आहे. दरम्यान, या मतदारसंघातील निवडणुकीत ममता बॅनर्जींना पराभूत करू, असा विश्वास शुभेंदू अधिकारी यांनी व्यक्त केला. ("I will defeat Mamata Banerjee, I will win the battle of Nandigram," Subhendu Adhikari Challenge to Mamata Banerjee)
हल्दियामध्ये पदयात्रेदरम्यान शुभेंदू अधिकारी म्हणाले की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी माझ्याविरोधात उभ्या राहिल्या आहेत. मात्र तुम्ही चिंता करू नका. मी त्यांना पराभूत करेन. माझ्या पोस्टरला काळे फासले गेले. माझे झेंडे फेकून देण्यात आले. मी विचारतो की, तोहा सिद्धिकी टीएमसीचा कोण आहे. अब्बास सिद्धिकी कोण आहे. कुणी साधू ममतांच्या मंचावर का नव्हता, कुठे आहे सबका साथ, सबका विकास, असा प्रतिप्रश्न शुभेंदू अधिकारी यांनी विचारला आहे.
यावेळी नंदिग्राम येथे झालेल्या प्रचार सभेला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही संबोधित केले. त्या म्हणाल्या की, मी ममता दिदींना विचारू इच्छिते की, कुठल्या मुलीला मत द्यायचे आहे? ८० वर्षांच्या वृद्ध महिलेला कुणी मारहाण केली? भाजपा कार्यकर्त्यांची हत्या कुणी केली. दूर्गा मूर्तींचं विसर्जन आणि सरस्वती पूजनाची परवानगी कोण देत नसे? जेव्हा त्या नंदिग्रामला येतात आणिखेला होबे म्हणतात तेव्हा चंडीपाठ कोण करते, असा सवाल स्मृती इराणी यांनी विचारला. तसेच नंदिग्राम बोले जय श्रीराम असा नाराही दिला.
दरम्यान, आज नंदिग्राम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शुभेंदू अधिकारी यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत स्मृती इराणी, बाबुल सुप्रियो आणि धर्मेंद्र प्रधान हे उपस्थित होते. तर १० मार्च रोजी या ठिकाणाहून तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.