'गरज सरो, पटेल मरो' हा त्याच नाट्याचा भाग; सामनातून मोदींवर टीकेचे बाण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 08:04 AM2021-02-26T08:04:54+5:302021-02-26T08:07:34+5:30

shiv sena sanjay raut attacked narendra modi : 'गुजरातलाच सरकार पटेलांविषयी आस्था नसेल तर इतरांनी विरोधाच्या टिपऱ्या का बडवायच्या?'

shiv sena sanjay raut criticized narendra modi over stadium name changed of motera to narendra modi | 'गरज सरो, पटेल मरो' हा त्याच नाट्याचा भाग; सामनातून मोदींवर टीकेचे बाण

'गरज सरो, पटेल मरो' हा त्याच नाट्याचा भाग; सामनातून मोदींवर टीकेचे बाण

googlenewsNext
ठळक मुद्दे"मोदी हे फकीर, कधीही ‘झोला’ उचलून जंगलात किंवा हिमालयात जातील "

मुंबई : नरेंद्र मोदी यांचे नाव सरदार पटेलांच्या जागी दिले म्हणून इतके अकांडतांडव का करता? हा बदल त्यांच्या गुजरातच्या जनतेने स्वीकारला आहे. पाच महापालिका निवडणुकांत काँग्रेसचा दारुण पराभव झाला व भाजपा विजयी झाला. सरदार पटेलांपेक्षा मोदी महान झाल्यानेच लोक त्यांना भरभरून मते देत आहेत. गुजरातलाच सरकार पटेलांविषयी आस्था नसेल तर इतरांनी विरोधाच्या टिपऱ्या का बडवायच्या? सरदार पटेलांचे महत्त्व नव्या राजकारणात संपले आहे, उद्या नेताजी बोसही संपतील. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा वापरही मागच्या निवडणुकीत झालाच होता. आता ‘गरज सरो, पटेल मरो’ हा त्याच नाट्याचा भाग आहे, अशी खरपूस टीका आजच्या सामना अग्रलेखातून केली आहे. (shiv sena sanjay raut criticized narendra modi over stadium name changed of motera to narendra modi)

जगातली प्रत्येक मोठी गोष्ट गुजरातसाठी, या ध्यासाने मोदी-शहांचे सरकार पछाडलेले
जगातली प्रत्येक मोठी गोष्ट गुजरातलाच करायची या ध्यासाने दिल्लीतील मोदी-शहांचे सरकार पछाडलेले दिसत आहे. त्यात काही चुकले असे वाटण्याचं कारण नाही. आपल्या मातीवर प्रेम असणे हा गुन्हा नाही, पण आपण देशाचे नेतृत्व करीत आहोत हे भान विसरून कसे चालेल! अशा मोठ्या कामांची जंत्री मोठी आहे म्हणून वाजंत्री लावून सांगण्याची गरज नाही. आज हा विषय वाजंत्री लावून चर्चेला आहे, तो जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमला नरेंद्रभाई मोदी यांचे नाव दिल्यामुळे.

पटेल यांचे नाव पुसण्याचा प्रयत्न नक्की कोण करीत आहे?
गुजरातमध्ये आधी सरदार पटेल यांचा जगातला सर्वात उंच उभारण्यात आला. अमेरिकेतील 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' पेक्षा सरदार पटेलांचा पुतळा उंच आहे आणि काँग्रेसने अपमानित केलेल्या सरदारांचा मानसन्मान, उंची वाढविणारा गुजरातमधील सरदार पटेल यांचा पुतळा असल्याचे मोदी यांच्याकडून सांगण्यात आले. पटेल यांचे नामोनिशाण मिटविण्याचा प्रयत्न काँग्रेस किंवा नेहरू-गांधी घराण्याने केला असे गेल्या पाचेक वर्षांत अनेकदा सांगण्यात आले, पण गुजरातमधील सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलून ते मोदी स्टेडियम करावे असे काही सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी सुचविल्याचे दिसत नाही. पटेल यांचे नाव पुसण्याचा प्रयत्न नक्की कोण करीत आहे, ते यानिमित्ताने दिसले.

...तर याला अंधभक्तीची पुढची पायरी मानावी लागेल
मोदी हे महान आहेतच. त्याविषयी शंका घेण्याचे कारण नाही, पण मोदी सरदार पटेल, महात्मा गांधी, पंडित नेहरू किंवा इंदिरा गांधी यांच्यापेक्षाही महान आहेत असे मोदी भक्तांना वाटत असेल तर त्यास अंधभक्तीची पुढची पायरी मानावी लागेल. मुळात सरदार पटेलांचे नाव काढून मोदी यांचे नाव लावण्याचा प्रयत्न व खटाटोप ज्यांनी केला त्यांनी मोदी यांना लहान केले.

लोकांनी बहुमत दिले म्हणजे बेपर्वा वागण्याचा परवाना नाही
लोकांनी प्रचंड बहुमत दिले आहे. बहुमत म्हणजे बेपर्वा वागण्याचा परवाना नाही. सरदार पटेल, पंडित नेहरू यांच्याकडे बहुमत होते ते देश घडविण्यासाठी. नेहरू यांनी आयआयटीपासून भाभा अणुशक्ती केंद्र, भाक्रा-नांगल योजना राष्ट्राला समर्पित केल्या. मोदी यांच्या काळात काय झाले, तर जगातील सर्वात मोठय़ा क्रिकेट स्टेडियमला सरदार पटेलांचे नाव होते ते पुसून मोदींचे नाव दिले, असे त्यांच्या भक्तांना इतिहासात नोंद करून हवे आहे काय?

या सरकारने सरदार पटेलांचे कोणते आदर्श पाळले? 
मोदींना सरदार पटेलांचे कालपर्यंत गुणगान गाणारे हे लोक एका स्टेडियमच्या नावासाठी सरदारविरोधी होतात, हा निव्वळ व्यापार म्हणावा लागेल. उद्या प. बंगालात सत्तांतर झाले तर (शक्यता अजिबात नाही) नेताजी बोस यांच्या नावे असलेल्या संस्थांची नावेही बदलली जातील अशी भीती लोकांना वाटू लागली आहे. सरदार पटेल हे काही फक्त गुजरातचे पुढारी नव्हते. गांधी-नेहरूंप्रमाणे ते देशाचे आदर्श होते व आहेत, पण सरदार पटेलांचे कोणते आदर्श या सरकारने पाळले? 

...पण आज देशातील शेतकऱ्यांची काय अवस्था आहे? 
स्वातंत्र्याच्या महाभारतातील बारडोलीचा लढा हे अत्यंत तेजस्वी पर्व म्हणून समजले जाते. हा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांचा लढा होता व त्याचे नेतृ सरदार पटेलांनी केले. काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून ”मी शेतकरी आहे!” (”हूं खेडूत छू!”) अशी गर्जना करणारे सरदार पटेल हे पहिलेच अध्यक्ष होते, पण आज देशातील शेतकऱ्यांची काय अवस्था आहे? चार महिने झाले तरी शेतकऱ्यांचे आंदोलन दिल्लीच्या सीमेवर सुरु आहे. आंदोलनातला शेतकरी सरदार पटेलांचा जयजयकार करीत आहे म्हणून सरदार पटेल यांच्या नावाची स्टेडियमवरील पाटी पुसण्यात आली काय?, असा सवाल करत मोदी यांच्या सरकारला भव्यदिव्य, उत्कट असे काही करायचे असेल तर त्याचे स्वागत आहे, पण आधीचेच प्रकल्प रंगरंगोटी करून बदलण्यात व नामांतरे घडविण्यात काय हशील!

मोदी हे फकीर, कधीही ‘झोला’ उचलून जंगलात किंवा हिमालयात जातील 
अर्थात, जे घडले त्यात मोदींचा काही दोष नसावा. मोदी हे फकीर आहेत व कधीही ‘झोला’ उचलून जंगलात किंवा हिमालयात जातील. त्यांचे भक्तच त्यांच्या नावाने हे भलतेसलते उद्योग करीत आहेत. मोदी हे एकदम योग्यासारखे तटस्थ व नम्र असल्याने ते या उद्योगांकडे थंडपणे पाहतात इतकेच, असे सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे.

Read in English

Web Title: shiv sena sanjay raut criticized narendra modi over stadium name changed of motera to narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.