नवरात्रोत्सवात भुजबळ आणि भाजपमध्ये राजकीय दांडिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2022 01:19 AM2022-10-02T01:19:00+5:302022-10-02T01:21:12+5:30

सार्वजनिक कार्यक्रम, बैठकांमध्ये राजकीय नेत्यांनी केलेल्या भाषणावरून वादंग उठण्याचे प्रसंग काही नवीन नाहीत. या आठवड्यात दोन प्रसंग घडले. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या कथित विधानावरून खळबळ उडाली. ह्य...तर मोदीही मला हरवू शकत नाहीत,ह्ण असे मुंडे यांनी भाजपच्या सभेत विधान केल्याचे वृत्त पसरले. स्वत: पंकजा मुंडे यांनी संपूर्ण भाषणाचा व्हिडिओ जारी केला आणि संदर्भ सोडून वाक्य प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला; पण भाजप आणि मुंडे यांच्या प्रतिमेची जी हानी व्हायची होती, ती दरम्यानच्या काळात झालीच. इकडे छगन भुजबळ यांनी सत्यशोधक समाजाच्या स्थापनेच्या दीडशे वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात बोलताना शाळांमध्ये सावित्रीबाई फुले यांच्यासह महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व्हायला हवे. सावित्रीबाईंनी शाळा काढली, सरस्वतीदेवीने कुठे काढली?ह्ण असे कथित विधान केल्याचा आरोप आहे. भाजपने हा मुद्दा उचलला आणि रण पेटविले. शाळांमध्ये सवर्वच महापुरुषांच्या प्रतिमा आहेत. जयंती-पुण्यतिथीदिनी त्यांचे पूजन होते. मग हे विधान कशासाठी, हा प्रश्न निर्माण झाला.

Political fight between Bhujbal and BJP during Navratri festival | नवरात्रोत्सवात भुजबळ आणि भाजपमध्ये राजकीय दांडिया

नवरात्रोत्सवात भुजबळ आणि भाजपमध्ये राजकीय दांडिया

Next

बेरीज वजाबाकी

मिलिंद कुलकर्णी

देव आणि महापुरुषांमध्ये भेदाभेद
भाजपने शिवसेनेच्या शिंदे गटासोबत राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर हिंदुत्वाचा मुद्दा ऐरणीवर आणत शिवसेनेच्या ठाकरे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. कोरोनामुळे दोन वर्षे सर्वधर्मीय सणांवर प्रतिबंध होते. यंदा हे निर्बंध हटविल्याने दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरे झाले. हिंदुत्वाचा विचार असणारे सरकार आल्याने हे घडले, असा प्रचार भाजप करीत आहे. या सणांच्या काळात दोन वर्षांत दाखल गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. हिंदुत्व विचाराचे आम्हीच खरे वारसदार असल्याचे बिंबविण्याचा हा प्रयत्न असल्याचे उघड आहे. छगन भुजबळ यांच्या विधानाने भाजपला संधी गवसली. भारतीय जनता युवा मोर्चा आणि महिला आघाडीने भुजबळांच्या नाशिक व येवल्याच्या निवासस्थानासमोर सरस्वतीदेवीच्या प्रतिमेचे पूजन करून आंदोलन केले. महिला आघाडीने तर राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकातील शिक्षण संस्थाचालकांनीही भुजबळांच्या विधानाचा केला गेला.

अडचणी वाढण्याची शक्यता
कथित विधान आणि चेंबूर पोलीस स्टेनशमध्ये याच विषयावरून धमकी दिल्याच्या दाखल झालेल्या गुन्ह्याने छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ झाली. भाजपकडून भुजबळ यांना लक्ष्य केले जात असल्याचे वारंवार दिसून आले आहे. नाशकात जम बसवायचा असेल तर भुजबळ यांची ताकद दुबळी कशी करता येईल, असा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. वर्षभरापूर्वी किरीट सोमय्या यांनी नाशकात येऊन केलेली ह्यआर्मस्ट्रॉंगह्णची पाहणी, भडक विधाने म्हणजे शिळ्या कढीला ऊत होता. शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र सदनप्रकरणी गेल्या सरकारने भुजबळांना क्लीन चिट दिलीच कशी, असा सवाल उपस्थित केला होता. याच गुन्ह्यातून दोषमुक्त करण्याचा अर्ज आता भुजबळांचे पुतणे समीर आणि पुत्र पंकज यांनी केला आहे. नेमक्या त्याच वेळी हा वाद पेटला. भाजपने अचूक वेळ साधत हा मुद्दा पेटवला आहे. अनेक वादळे अनुभवलेले भुजबळ या प्रसंगातून कसे बाहेर पडतात, हे बघायला हवे.

मदतीला आले कोण ?
महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, शिवसेना या दोन्ही पक्षांच्या मदतीला सातत्याने धावून जाणाऱ्या भुजबळ यांना या प्रसंगात मात्र कोणीही समर्थनासाठी पुढे आलेले नाही. शिवसेना आणि भुजबळ यांचे संबंध पुन्हा मधुर झाले आहेत, पण स्थानिक राजकारण आणि हिंदुत्वाचा विषय लक्षात घेऊन शिवसेनेच्या स्थानिक किंवा राज्यस्तरीय कोणत्याही नेत्याने या विषयात भूमिका घेतलेली नाही. तीच स्थिती कॉंग्रेसची आहे. राहुल गांधी यांनी सौम्य हिंदुत्वाला प्राधान्य दिलेले असताना या वादात न पडण्याची भूमिका कॉंग्रेस नेत्यांनी घेतली आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने अखेर उडी घेऊन शाळांमध्ये महापुरुषांच्या प्रतिमा भेट देण्याचा उपक्रम हाती घेतला. छात्रभारती या विद्यार्थी संघटनेने उघडपणे भुजबळ यांच्या समर्थनाची भूमिका घेतली. समाजवादी पार्श्वभूमी असलेल्या या संघटनेने किमान भूमिका तरी घेतली, पण इतर समतेचा पुरस्कार करणाऱ्या, धर्मनिरपेक्ष अशा पक्ष व संघटनांनी मौन बाळगल्याचे दिसून आले. सरकारची नाराजी नको, असादेखील त्यामागे हेतू असू शकतो. नाशिक जिल्ह्यात भुजबळ हे एक शक्तिकेंद्र तयार झाले आहे. पक्षापेक्षा मोठी प्रतीमा तयार झाल्याने स्वपक्षातीलदेखील अनेक जण दुखावलेले आहेत. इतर पक्षांनाही विस्तारात अडचण भुजबळ, त्यांचे समर्थक आणि समता परिषदेचा आहे. अशा प्रसंगात पोळी भाजून घेण्याचा प्रकार हमखास घडतो. तसे यावेळीही होत आहे.

वादानंतर दोन पावले मागे
भुजबळ आणि समता परिषदेने सावित्रीबाईंच्या आद्य शिक्षिका या भूमिकेचा सुरुवातीपासून पुरस्कार केलेला आहे. त्यांच्या या भूमिकेला महाराष्ट्रात प्रतिसाददेखील मिळाला. मात्र, सरस्वतीदेवीच्या प्रतिमेऐवजी सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करा, या कथित विधानाने गदारोळ झाला. भुजबळ हे चाणाक्ष आणि धोरणी नेते आहेत. त्यांनी हिंदुत्वाचा गजर सुरू असताना हे विधान जाणीवपूर्वक केले की, अजाणता केले हे यथावकाश समोर येईल. मात्र, शिवसेनेत असताना ह्यनथुरामाचे पुतळे उभारूह्ण या त्यांच्या घोषणेची आठवण समाजमाध्यमांवर करून देत त्यांची कोंडी केली जात आहे. या वादाला लागलेले वळण लक्षात घेऊन भुजबळ यांनी दोन पावले माघारीची भूमिका घेतलेली दिसते. मीदेखील हिंदूच आहे, घरात देवीची पूजा करतो, अशी विधाने ते आता पत्रकार परिषदेत करीत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर तातडीने पत्रकार परिषद घेऊन फिर्यादी टेकचंदानीविषयी तातडीने खुलासा केला. मित्र असलेला व्यक्ती अडचणीत सापडल्यावर हितशत्रू बनून संधी कशी साधतात, हे पुन्हा एकदा या प्रकरणात ठळकपणे दिसून आले.

Web Title: Political fight between Bhujbal and BJP during Navratri festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.