राज्यातील ठाकरे सरकारचे धोरण म्हणजे ‘हम करे सो’ कायदा ! चंद्रकांत पाटलांचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 15:19 IST2020-11-02T15:09:11+5:302020-11-02T15:19:23+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्री बाहेर पडायलाही तयार नाहीत..

राज्यातील ठाकरे सरकारचे धोरण म्हणजे ‘हम करे सो’ कायदा ! चंद्रकांत पाटलांचे टीकास्त्र
पुणे : राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे मराठा आरक्षण किंवा इतर कोणत्याही महत्वपूर्ण विषयावर अभ्यास करताना दिसत नाही. तसेच महत्वाच्या मुद्द्यांवर कुणाचे मार्गदर्शन घेण्याची सुद्धा त्यांची मानसिकता नसते. त्यामुळे सध्या ‘हम करे सो’ कायदा याच धोरणावर ठाकरे सरकारची वाटचाल सुरु आहे, अशा खरमरीत शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले.
पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी हे भाजपाला झुकते माप देतात का? या प्रश्नावर आपली भूमिका मांडताना पाटील म्हणाले, मला यावर काही बोलायचे नाही. पण राज्यपालपदाची एक गरिमा असते ती कायम आपण ठेवली पाहिजे. मात्र या घडीला तसे होताना दिसत नाही. किंबहुना राज्यपाल भाजपाला झुकते माप देतात का यांसारखी चर्चा करणारी मंडळी ती गरिमा ठेवत नाहीत.
तसेच दोन राजे विद्यार्थी फी किंवा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर नेमकी भूमिका स्पष्टपणे घेताना दिसत नाही. त्यावर दोन राजे खासदार असलेल्या पक्षाचा मी प्रदेश अध्यक्ष आहे. त्यामुळे मी बोललो म्हणजे सगळे खासदार, आमदार बोलले असेच आवर्जून पाटील यांनी यावेळी सांगितले.