"योग्य कोण, पंतप्रधान की तुम्ही?", जयंत पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 08:23 AM2021-05-09T08:23:07+5:302021-05-09T08:24:53+5:30

Jayant Patil : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीवरून ठाकरे सरकावर टीका केली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

NCP leader Jayant Patil slams to Devendra Fadnavis on Corona issues | "योग्य कोण, पंतप्रधान की तुम्ही?", जयंत पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

"योग्य कोण, पंतप्रधान की तुम्ही?", जयंत पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्राच्या काही सूचना केंद्राने मान्यही केल्या, याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.

मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दूरध्वनीद्वारे माहिती घेतली व दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे, असे सांगत कौतुक केले. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीवरून ठाकरे सरकावर टीका केली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. (NCP leader Jayant Patil slams to Devendra Fadnavis on Corona issues)

यासंदर्भात जयंत पाटील यांनी ट्विट केले आहे. "देवेंद्र फडणवीसजी आजच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारने कोविडचा प्रसार रोखण्याकरिता केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. मला आशा आहे की याची आपल्याला जाणीव असेल. आता मुख्य प्रश्न असा आहे कि योग्य कोण, मा. पंतप्रधान कि तुम्ही?", असा खोचक सवाल जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे केला आहे. 

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबईत कोरोना मृतांचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेले पत्र ट्विटरवर शेअर केले आहे. यामध्ये "मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे, असे घडत आहे. त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता कोरोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होत आहे. हे प्रकार तत्काळ थांबविण्यात यावे", अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे केली आहे.

दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्र लढतोय चांगली लढाई, मोदींकडून कौतुक!
कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दूरध्वनीद्वारे माहिती घेतली व दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे, असे सांगत कौतुक केले. मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनीदेखील विशेषत: महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे, अशी विनंती केली. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी राज्य कसे नियोजन करीत आहोत, त्या विषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करीत असून, त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होत आहे. महाराष्ट्राच्या काही सूचना केंद्राने मान्यही केल्या, याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. 

लसीकरणासाठी स्वतंत्र ॲपची उद्धव ठाकरेंची मागणी
१८ ते ४४ या वयोगटातील लोकांच्या लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी अन्य उत्पादकांकडून लस विकत घेण्याची मुभा द्यावी तसेच कोरोना लसीकरणाच्या नोंदणीसाठी राज्याला स्वतंत्र ॲप विकसित करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. अन्य उत्पादकांकडून लस विकत घेण्याची परवानगी मिळाली तर कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करता येईल, असे पत्रात म्हटले आहे.

Web Title: NCP leader Jayant Patil slams to Devendra Fadnavis on Corona issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.