महाविकाआघाडी सरकारमध्ये मानापमान नाट्य, आता सत्ताधारी पक्षातील ११ आमदार करणार उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 20:20 IST2020-08-23T20:17:45+5:302020-08-23T20:20:54+5:30
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील या माहाविकास आघाडी सरकारमधील एका वादावर पडदा पडण्यापूर्वीच दुसरा वाद उफाळून येत आहे.

महाविकाआघाडी सरकारमध्ये मानापमान नाट्य, आता सत्ताधारी पक्षातील ११ आमदार करणार उपोषण
मुंबई - एकीकडे राज्यातील कोरोना विषाणूच्या फैलावाचे संकट संपण्याचे नाव घेत नसताना दुसरीकडे सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील मानापमान नाट्यही जोरात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी निर्णयप्रक्रियेत स्थान मिळत नसल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा काँग्रेसने सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात निधीवाटपामध्ये भेदभाव होत असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीमधील ११ आमदारांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील या माहाविकास आघाडी सरकारमधील एका वादावर पडदा पडण्यापूर्वीच दुसरा वाद उफाळून येत आहे. ठाकरे सरकार निधी वाटपात दुजाभाव करत असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. सर्वांना मतदारसंघात काम करायचं आहे. त्यामुळे सर्वांना समान निधी मिळाला पाहिजे. मात्र तसं होताना दिसत नाही आहे, राज्यातील काँग्रेस नेतृत्वाकडे याबाबात तक्रार करूनही न्याय मिळालेला नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षांमधील ११ आमदार उपोषणाच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याबरोबरच याबाबतची तक्रार काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केली जाणार आहे. त्यासाठी सोनिया गांधी यांची लवकरच भेट घेतली जाईल, असेही गोरंट्याल म्हणाले, याआधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला झुकतं माप दिलं जात असल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती.