LMOTY 2020: राहुल गांधी अध्यक्ष व्हावेत ही तर देशातील तरुणांची इच्छा- सुशील कुमार शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 17:26 IST2021-03-18T17:22:40+5:302021-03-18T17:26:10+5:30
LMOTY 2020: काँग्रेस पक्षाला ठेच लागली आहे. त्यामुळे पक्ष आवश्यक सुधारणा नक्की करेल; सुशील कुमार शिंदेंना विश्वास

LMOTY 2020: राहुल गांधी अध्यक्ष व्हावेत ही तर देशातील तरुणांची इच्छा- सुशील कुमार शिंदे
मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून काँग्रेस पक्षाला पूर्ण वेळ अध्यक्ष नाही. त्यावरून पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनीदेखील नाराजी व्यक्त केली. मात्र तरीही अद्याप पक्षाला पूर्ण वेळ अध्यक्ष मिळालेला नाही. यावर भाष्य करताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदेंनी (Sushil Kumar Shinde) राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) नावाला पसंती दिली. राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्ष व्हावं अशी देशातील तरुणांची इच्छा. काँग्रेस पक्षाला ठेच लागली आहे. त्यामुळे पक्ष आवश्यक सुधारणा नक्की करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द ईयर अवॉर्ड २०२० सोहळ्यात (Lokmat Maharashtrian of The Year Awards 2020) बोलत होते.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसनं मल्लिकार्जुन खर्गेंना निवड केली. गुलाम नबी आझाद यांच्या खासदारकीचा कालावधी संपताच काँग्रेस नेतृत्त्वानं त्यांना पुन्हा संधी दिली नाही. यानंतर आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंडभरून कौतुक केलं. यामागचं राजकारण काँग्रेसचे ज्येष्ठ सुशीलकुमार शिंदेंनी (Sushil Kumar Shinde) सांगितलं आहे. सगळ्यांना संधी मिळायला हवी या हेतूनं खर्गेंची राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली, असं शिंदे म्हणाले.
ईडीची मोठी कारवाई! सुशिलकुमार शिंदेंची मुलगी, जावयाची करोडोंची मालमत्ता केली जप्त
राज्यसभा संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे. या सभागृहात प्रगल्भ नेत्यांची आवश्यकता असते. त्यामुळेच मल्लिकार्जुन खर्गेंना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं. सगळ्यांना संधी देता यावी यासाठीच आझाद यांना दुसरी टर्म दिली गेली नाही, असं शिंदेंनी सांगितलं. काँग्रेसला ठेच लागली आहे. यातूनच सुधारणा होतील. राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष व्हावेत, ही पक्षातील युवाशक्तीची इच्छा आहे, असं ते पुढे म्हणाले.
...म्हणून आझादांच्या जागी खर्गेना संधी; सुशील कुमारांनी सांगितलं काँग्रेसचं 'राज'कारण
काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमधील २३ बड्या नेत्यांनी पक्षात निवडणुकीत व्हाव्यात, पूर्ण वेळ अध्यक्ष मिळावा, पक्ष संघटनेत आमूलाग्र बदल व्हावेत, अशी मागणी केली. अनेक माजी केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री असलेला हा गट जी-२३ नावानं ओळखला जातो. त्यावरही सुशीलकुमार शिंदेंनी भाष्य केलं. जी-२३ गट काँग्रेसविरोधी नाही. पक्षात सुधारणा व्हाव्यात अशीच या गटाची इच्छा आहे. मात्र माध्यमांनी हा विषय मोठा केला, असं शिंदेंनी म्हटलं.
काँग्रेसमध्ये विविध सूर असतात, मतमतांतरं असतात. यातून चर्चा होते आणि मार्ग निघतो, असं सांगताना शिंदेंनी इंदिरा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कालावधीत घडलेल्या घटनांची उदाहरणं दिली. इंदिरा गांधी, नेहरूंच्या काळातही पक्षात दबावगट तयार झाला होता. काँग्रेसमध्ये अशा घटना होतच असतात. पण तो गट काही पक्षाच्या विरोधात नसतो. त्यांच्यासोबत चर्चा होणं गरजेचं असतं. जी-२३ प्रकरणही तसंच आहे. माध्यमांनी हा विषय मोठा केला, असं मत शिंदेंनी व्यक्त केलं.