लोकांनाच देव मानतो - शरद पवार

By विजय दर्डा | Published: December 12, 2020 06:30 PM2020-12-12T18:30:02+5:302020-12-12T19:18:41+5:30

Sharad Pawar Birthday : लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी घेतलेली शरद पवार यांची खास मुलाखत...

I consider people to be God - Sharad Pawar | लोकांनाच देव मानतो - शरद पवार

लोकांनाच देव मानतो - शरद पवार

Next

सत्तेत असो वा सत्तेबाहेर... शरदचंद्र पवार हे नाव देशाच्या राजकारणात कायमच वलयांकित राहिले आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे देशाच्या कृषीविकासात मोलाचे बदल झाले आहेत. देशातील राजकारणात प्रत्येक पक्षातील नेत्याशी घनिष्ठ आणि जिव्हाळ्याचे संबंध असलेले शरद पवार हे देशातील असे एकमेव नेते आहेत. राज्याच्या राजकारणाच्या इतिहासातील प्रत्येक पुस्तक शरद पवार यांच्याशिवाय पूर्णच होऊ शकणार नाही. त्यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी घेतलेली खास मुलाखत... 

विजय दर्डा : सर्वप्रथम मी शरदचंद्रजी पवार, या देशाचे लाडके नेते आणि आम्हा महाराष्ट्रीयांचे भूषण आपल्या वयाला ८० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने मी आपले अभीष्टचिंतन करतो आणि आपण गप्पा माराव्या या उद्देशाने मला संधी दिली त्याबद्दल आपला आभारी आहे.
शरद पवार : तुम्ही आभारी आहात याचा मला आनंद आहे. पण त्याच्यापेक्षा तुम्ही कारण नसताना मी ८० वर्षांचा झालो, म्हणजे मी म्हातारा झालो याची मला आठवण करून देत आहात. पण मी काही म्हातारा-बितारा नाही.

विजय दर्डा - आपण नेहमी म्हणता की मी, राजकारणातून निवृत्त होत आहे म्हणून... मी आता निवडणूक वगैरे काही लढवणार नाही...
शरद पवार - ते खरंय...

विजय दर्डा - परंतु, पवार साहेब, आपली जी मानसिक बैठक आहे, ती आपल्याला काही स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे लोकांमध्ये वावरणारे, राष्ट्रीय प्रश्नाशी निगडित असणारे, सतत जागरूक असणारे असे हे एक वेगळे व्यक्तिमत्त्व आहे. आणि अशा व्यक्तिमत्त्वाची कोणाशी तुलना करावी, असा प्रश्न जेव्हा माझ्या मनामध्ये येतो, तेव्हा असा कोणीही स्पर्धक मला भेटत नाही ज्याच्याशी मी तुलना करावी. आम्हाला हिंदीत बोलायचे झाले तर ‘हमें आप पर नाज हैं, ईस राज्य को आप पर नाज हैं...’ ज्यांच्यासोबत आपले राजकीय मतभेद असू शकतील असे अनेक जण असतील, पण व्यक्तिगत जीवनात ते तुमच्यावर प्रेम करतात आणि तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता. माझा पहिला प्रश्न असा आहे, आपल्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेचे काय झाले...? राष्ट्रीय प्रश्नांवर बोलायचे तुम्ही कमी केले आहे का? अगदी शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात तुमच्या पक्षाची भूमिका वेगळी होती. या कठीण प्रसंगात तुम्ही हे प्रश्न नवीन तरुण पिढीकडे सोडून दिल्याचे जाणवते. नेमके काय समजावे ?
शरद पवार : दोन गोष्टी. आता तुम्ही वय काढलेच आहे तर त्या वयाचा विचार केल्यावर मला स्वत:ला असे वाटते की माझी जबाबदारी आता नवीन पिढी तयार करण्याची आहे. नवीन पिढी तयार करण्याचा आपण विचार करतो त्या वेळी त्यांना स्वातंत्र्य असले पाहिजे. प्रत्येक गोष्टीत आपण हस्तक्षेप करता कामा नये. त्यांची प्रत्येक गोष्ट आपल्याला आवडेलच असे नाही. पण ते खासगीरीतीने सांगता येते. आणि सार्वजनिकरीत्या जनमानसामध्ये त्यांची प्रतिमा कायम राहील याची काळजी घेणे हे धोरण मी स्वीकारलेले आहे. आणि म्हणून मी संसदेमध्ये किंवा बाकीच्या विचार विनिमयाच्या संबंधाच्या बैठकांमध्ये माझी मते मांडतो. नाही असे नाही. पण त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात पुढाकार घेऊन ते करण्याबद्दलची भूमिका मी क्वचितच प्रसंगात घेत असतो. आता तुम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला. हा प्रश्न सबंध देशात चर्चेला गेलाय. देशाच्या बाहेरही गेल्याचे दिसत आहे. ही गोष्ट खरी आहे की देशातील शेतकऱ्यांच्या  बाबतीत अस्वस्थता आहे. त्याबद्दल ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, त्यांनी अस्वस्थ घटकांच्या प्रतिनिधींशी सुसंवाद साधण्याची गरज आहे. तो सुसंवाद साधला जात नाही, म्हणूनच टोकाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याच्यात त्यांचे काही मुद्दे रास्त आहेत. काही मुद्द्यांवर त्यांना समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. या देशाच्या अन्नदात्याच्या प्रश्नांमध्ये राज्यकर्त्यांनी गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, एवढेच माझे मत आहे.

शेतकऱ्यांच्या संदर्भात केंद्र सरकारने तीन विधेयके आणली आहेत. पण कृषी उत्पन्न बाजार समितीचे महत्त्व कमी करणारे एक विधेयक याआधीच महाराष्ट्राने मंजूर केले आहे. काँट्रॅक्ट फार्मिंगविषयीचे विधेयकही तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने पारित केले आहे. असे असताना तुमचा शेतकरी कायद्याला विरोध का आहे ?
आम्ही सरसकट विरोध करतच नाही. त्यात तुम्ही जो पहिला भाग सांगितला, महाराष्ट्रातली कृषी बाजार समिती आणि इतर राज्यांतील शेती यात फरक आहे. आपल्याकडील बाजार समिती ही शेतकऱ्यांना मान्य असलेली संस्था आहे. या ठिकाणी आम्ही लोकांनीच विचार विनिमय करून शेतकऱ्यांना काही बाबतीत स्वातंत्र्य द्यावे अशा प्रकारची सूचना आली. त्याचा निर्णय महाराष्ट्रात घेतला गेला होता. याचा अर्थ असा की कृषी बाजार समिती कायम आहे. तेथे येऊन माल विकण्याचा शेतकऱ्याला अधिकार आहे. तेथे माल विकत असताना त्याची किंमत त्याच्या पदरात पडेल यासाठी जो खरेदीदार आहे त्याच्यावरील बंधने आजही येथे कायम आाहेत. त्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत काहीही तडजोड केलेली नाही. फक्त बदल एक केला, की कृषी बाजार समितीच्या बाहेरही माल विकण्याची परवानगी महाराष्ट्राने दिली आहे. ही आजच नाही. आता तुम्ही बघितले तर नागपूरची संत्री देशाच्या कानाकोपऱ्यात जातात. ती पूर्वीपासून जातात. नाशिकचा कांदा सबंध देशात जातो. किंवा खान्देशातील केळी संपूर्ण देशात जातात. आपल्याकडे हे स्वातंत्र्य आपण पूर्वीपासून दिलेले आहे. ते स्वातंत्र्य अबाधित राहण्याबद्दलची भूमिका कोणी मांडत असेल, तर त्याला माझा विरोध नाही.

मग अशी आंदोलने कशामुळे होतात..?
आपल्या पद्धतीमध्ये आणि हिंदुस्तानच्या पद्धतीमध्ये थोडासा फरक असा आहे. इथे जी काही किंमत ठरेल, ती किंमत देण्याच्या संबंधीचे बंधन खरेदीदारावर आहे.
आपल्या इथे?
होय आपल्याकडे. समजा गव्हाचा माल आहे. त्याने तेथे लिलावात २१०० रु. क्विंटल भाव देतो असे सांगितले, तर त्याने तेवढे रुपये दिलेच पाहिजेत. ते एक महिन्याने देऊन चालणार नाही. २४ तासांत किंवा ४८ तासांत किंवा कृषी बाजार समितीचा जो काही नियम असेल, त्यानुसार ठरावीक वेळेत पैसे दिलेच पाहिजेत. उत्तरेकडील लोकांच्या तक्रारी याच तर आहेत. लिलाव झाला, माझा माल अ, ब, क नी घेतो म्हटले. तो घेतला आणि माझे पेमेंट २५ टक्के आता दिले आणि बाकीचे पैसे दोन महिने दिले नाहीत. हे असे महाराष्ट्रात होत नाही. महाराष्ट्रात ४८ तासांत किंवा जास्तीत जास्त ४ दिवसांत पेमेंट द्यावेच लागते. मी आता दिल्लीमध्ये जातो, त्या वेळी महाराष्ट्रातले अनेक शेतकरी येऊन भेटतात की उत्तर हिंदुस्तानात आम्ही आमचा कांदा पाठवला, आम्ही आमची संत्री पाठवली आणि आमचे पेमेंट झाले नाही.

म्हणजे हे जे आंदोलन सुरू आहे ते योग्य आहे असे म्हणायचे का ?
यात शेतकऱ्यांची मागणी आहे की माझ्या मालाचे १०० टक्के पैसे मिळालेच पाहिजेत, असे बंधन असले पाहिजे. ही तरतूद आपण केलेली आहे. पण केंद्र सरकारच्या कायद्यात या प्रकारच्या सक्तीचा अभाव आहे. याबद्दल उत्तर हिंदुस्तानात विशेषत: पंजाब, हरयाणा येथील शेतकऱ्यांच्या तीव्र भावना आहेत.

पक्ष चालवण्यासंबंधी सोनिया गांधी यांच्याशी मतभेद झाले होते
विजय दर्डा - आपण १८ व्या वर्षी राजकारणात आलात. त्या वेळी तुम्ही काँग्रेसचा झेंडा हाती घेऊन अगदी स्वत:च्या भावाच्या विरोधातही प्रचार केला. काँग्रेस विचारांची बैठक तुमच्या मनामध्ये बसली ती आजतागायत. असे असताना आपण काँग्रेसपासून वेगळे का झालात ?
शरद पवार - आमची विचारधारा काँग्रेसच्या जवळची, गांधी-नेहरूंच्या जवळची. त्यापेक्षा वेगळी नाही. मतभेद झाले होते ते पक्ष चालवण्याच्या पद्धतीसंबंधी. पण आता तोही प्रश्न राहिला नाही. अनेक वेळा आम्ही एकत्र बसतो. आता महाराष्ट्राचे पाहा. येथे एकत्रित सरकार आणण्यासाठी आम्ही एकत्रित पुढाकार घेतला. यांचे काम ठीक चाललेले आहे. तसेच अन्य ठिकाणीसुद्धा केले पाहिजे, असा माझा आग्रह आहे. पण येथे ज्याप्रमाणे काँग्रेसने समंजसपणाची भूमिका दाखवली, तशी अन्य राज्यांत, उदाहरणार्थ पश्चिम बंगालमध्येही घेतली तर जी तुमची अपेक्षा आहे त्याची पूर्तता व्हायला मदत होईल. शेवटी मोठ्या पक्षाने मोठेपणा दाखवण्याची गरज आहे. हे करत असताना काँग्रेसचे महत्त्व नजरेआड करून चालणार नाही. तो मोठा पक्ष आहे आणि त्या पक्षाचे मोठे योगदान आहे ही गोष्टही कायम लक्षात ठेवली पाहिजे.

मग काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि तुमच्यातले मतभेद आता दूर झाले आहेत असे म्हणता येईल का ?
गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून आम्ही एकत्रच काम करत आहोत. २००४ मध्ये जेव्हा केंद्रात सरकार बनले तेव्हा तर मी विरोधी बाकांवरच होतो. सोनिया गांधी स्वत: माझ्याकडे आल्या आणि त्यांनी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर प्रणबदा, मनमोहन सिंग यांनी चर्चा केली. त्यानंतर आम्ही एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला. २००४ ते २०१४ या दहा वर्षांत काँग्रेस असो की एनसीपी, आम्ही एकत्रच काम करत होतो. मिळूनच सरकार चालवले. सगळे कार्यक्रम एकमेकांसोबत चर्चा करूनच ठरवले. त्यावर सहमती झाल्यानंतरच आम्ही पुढे गेलो. आज सगळ्याच कार्यक्रमांवर आमची विचारधारा एकच आहे. समजा दहा बाबी आहेत आणि आठवर सहमती झाली, तर दोन विषय बाजूला ठेवता येतात. कारण आज एकत्र येण्याची गरज आहे. ही आमची भूमिका आहे.

त्यात असे काही आहे का की पवार साहेब पंतप्रधान नाही झाले पाहिजेत...
नाही. पवार साहेबांसोबत संसदेत किती लोक बसणार आहेत याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
काँग्रेस आणि तुम्ही एकत्र आहात. तुमचे ज्या प्रकारचे व्यक्तिमत्त्व आहे, त्याचा विचार करता तुमचा ग्रुप आणखी मजबूत झाला असता असे नाही वाटत तुम्हाला ?
मला वाटते असा अ‍ॅप्रोच ठेवल्याने काम होणार नाही. लोकशाहीमध्ये संख्या महत्त्वाची असते.

म्हणजे संख्या आपल्या बाजूने असली तर व्यक्ती गौण होते, असे म्हणायचे आहे काय तुम्हाला?
नाही. व्यक्ती आणि संख्या दोन्ही महत्त्वाचे आहेत. ज्या व्यक्तीच्या बाजूने आकडे असतात, ती व्यक्ती गौण असू शकत नाही.
आकडे विविध कारणांनी मिळू शकतात. आज भाजपकडे जे आकडे आहेत, त्यांना स्वीकारून आपण पुढे काम केले पाहिजे असे वाटत नाही का ?
आम्ही भाजपसोबत कसे काम करू शकतो ? आमची विचारधाराच वेगळी आहे. 

पण लोकांनी भाजपला स्वीकारले आहे ना...
लोकांनी १९७७ मध्ये तर काँग्रेसलाही हरवले होते. जनता पार्टीचे सरकार आले होते. लोकांनी जनता पार्टीलाही स्वीकारले होते. तो प्रयोग टिकणार नाही असे आम्ही बोललो होतो. तुम्हीच पाहिले की ते सरकार दोन वर्षंच चालले. लोकांनी मोदींच्या पारड्यात आपले मत टाकले याचा आम्ही विरोध करत नाही. आम्ही हे वास्तव स्वीकारतो. पण त्यांची ध्येय-धोरणे देशाच्या दीर्घकालीन हितासाठी कितपत उपयोगाची आहेत, याबद्दल विचार करण्याचा अधिकार विरोधी पक्षांना आहे.

हा फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे असे बिरुद आपण नेहमी मिरवत असतो. पण गेल्या ६० वर्षांत आपण राज्याला एकही महिला मुख्यमंत्री दिली नाही, याबद्दल आपले मत काय?
शेवटी नंबर पाहिजे ना. आणि नंबर असलेल्या पक्षाच्या बहुसंख्य सदस्यांनी तशी व्यक्ती निवडली पाहिजे. आज मला तसे काही चित्र दिसत नाही. अशा प्रकारचे कर्तृत्व दाखवण्याची कुवत माझ्या तरी गेल्या ५० वर्षांच्या कार्यकाळामध्ये प्रतिभाताई पाटील यांच्यात होती. पण त्यांच्या वेळी काँग्रेसने वेगळी भूमिका घेतली. त्यांच्यात कुवत होती हे त्याच काँग्रेस पक्षाने त्यांना देशाचे राष्ट्रपतीपद देऊन मान्य केले. त्यामुळे भले इथे नसेल पण दुसऱ्या ठिकाणी अशा प्रकारची संधी मिळाली. अशी अनेक राज्ये आहेत ज्या ठिकाणी महिला मुख्यमंत्री झालीच आहे.
पण महाराष्ट्राचा एक वेगळा पिंड आहे...
शेवटी नंबर पाहिजे ना नंबर, तो कसा आणणार..?

हो, पण जेव्हा आपल्याकडे नंबर होते, तेव्हा पण...
त्या त्या वेळची परिस्थिती वेगळी होती. पूर्वीच्या काळी अशी परिस्थिती होती ती काँग्रेसमध्येच. काँग्रेस सरकारने प्रतिभाताईंना संधी दिली. राज्य सरकारमध्ये संधी दिली. काँग्रेस पक्षामध्ये संधी दिली आणि शेवटी देशामध्ये योग्य वेळी राष्ट्रपतीपदावर संधी दिली. त्यामुळे राज्यात त्यांना संधी दिली नाही, असे मी म्हणत नाही. पहिली महिला राष्ट्रपती महाराष्ट्रानेच दिली आहे ना...

नवीन नेतृत्वाकडे सूत्रे सोपवली पाहिजेत असे बोलले जाते. त्याचे काय..?
राष्ट्रवादीमध्ये तरुणांचा संच मोठा आहे आणि या सगळ्यांतून मान्य असतील असे अनेक लोक मी सांगू शकतो राष्ट्रवादीमध्ये... अजित पवार, जयंतराव पाटील, धनंजय मुंडे अशी मी मालिकाच देऊ शकतो नावांची... जी नेतृत्व करण्याच्या पात्रतेची आहेत. यांची प्रशासकीय क्षमता चांगली आहे. कष्ट करण्याची तयारी आहे.

मग हेच राष्ट्रवादीचे भविष्यातील उमेदवार होऊ शकतात का? नेतृ्त्वासाठी?
नाही, उमेदवारीचा आम्ही विचारच करत नाही. याचे कारण म्हणजे आमच्यावर ती वेळच आलेली नाही. आणि राष्ट्रवादीकडे बहुमतही नाही. त्यामुळे कशासाठी त्याची आताच चर्चा करायची. आज तिघांचे एकत्रित सरकार चालवत आहोत. जाणीवपूर्वक एक निर्णय घेतला आहे. त्याच्या पाठीशी आम्ही सगळे आहोत.

तुम्ही संरक्षणमंत्रीही होता. डोकलाम, गलवान खोऱ्यात चीनने जे काही आक्रमण केले आहे, त्यावर भारताने काय करायला हवे होते? त्याबद्दल काय सांगाल ?
आपल्या देशामध्ये बहुसंख्य लोकांचा समज शेजारी राष्ट्रांच्या बाबतीत पाकिस्तानच्या विरोधात जास्त असतो. माझी भूमिका सुरुवातीपासून अशी आहे की पाकिस्तानमधील नेतृत्व आणि तेथील लष्कर हे भारताच्या बाबतीतील भूमिका अनेकदा चमत्कारिक पद्धतीने घेते. ते अमान्य करायचे कारण नाही. पण देशाला धोका कुठून होणार याबाबत जेव्हा विचार केला जातो, त्याबद्दल माझे स्पष्ट मत असे आहे की, चीनच्या बाबतीत आपण आधी खबरदारी घेतली पाहिजे. चीनची मजबूत स्थिती, तेथील अर्थव्यवस्था, हवाईदल, लष्कर आणि नौदलाची ताकद याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. चिनी नेतृत्वाचे एक वैशिष्ट्य आहे. त्यांच्यात खूप संयम आहे. बोलणार नाहीत, करणार नाहीत. योग्य वेळ आल्यानंतरच आपला निर्णय जाहीर करतील. त्यामुळे खरा धोका हा चीनपासूनच आहे. पाकिस्तानचा आहेच, पण चीनकडून जास्त आहे.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
त्यांनी त्यांचे मत मांडले. सगळीच मते मान्य करण्यासारखी नसतात. मी आपल्या देशातील नेतृत्वाबाबत काहीही बोलू शकतो. पण बाहेरच्या देशाच्या प्रश्नांवर मी फारशी चर्चा करणार नाही. तेवढी पथ्ये पाळावी लागतात. मला वाटते ओबामांनी ती टिप्पणी मर्यादा सोडून केली आहे.

म्हणजे ते मोदीजींकडे झुकत आहेत, असे म्हणायचे का?
नाही, ओबामांची भूमिका मोदीजींकडे झुकत आहे, असेही मी म्हणणार नाही. पण इतर देशांच्या नेत्यांबद्दल बोलणार नाही. आजच्याच पेपरमध्ये बातमी आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी कॅनडाच्या पंतप्रधानांनी शेतकऱ्यांची बाजू घेत विधान केले आणि भारत सरकारला अक्कल शिकवण्याचा प्रयत्न केला. त्याला भारत सरकारने लगेच उत्तर दिले. ते योग्य आहे. हा आमच्या देशाचा प्रश्न आहे आणि यात तुम्ही पडायचे कारण नाही. तसेच ओबामांनीही आमच्या नेतृत्वाच्या अंतर्गत विषयात भाष्य केले नसते तर अधिक चांगले दिसले असते.

योगी आदित्यनाथ मुंबईत आले आहेत. ते म्हणताहेत की ते बॉलीवूडला उत्तर प्रदेशात नेणार. एकीकडे बिहार, उत्तर प्रदेशचे लोंढे महाराष्ट्रात येत आहेत. दुसरीकडे बॉलीवूडला उत्तर प्रदेशात नेण्याची भाषा केली जात आहे. हे काय राजकारण आहे?
महाराष्ट्राने आणि मुंबईने देशाचा विचार केला आहे. देशाच्या अनेक भागांत आपल्या लोकांची गुंतवणूक आहे. आपण देशाचा विचार करतो. याआधीही इतर राज्यांचे मुख्यमंत्री इथे त्यांच्या राज्यात गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव घेऊन आले होतेच. पण यामुळे मुंबई आणि महाराष्ट्र दुबळा होईल असे कोणी समजत असेल तर त्यावर माझा विश्वास नाही.

सध्या राज्यातल्या राजकारणाचे सुकाणू आपल्या हातात आहे. त्यात राज ठाकरेंबाबत काय मत आहे ?
सुकाणू माझ्या हातात नाही. ते उद्धव ठाकरे यांच्या हाती आहे. राज ठाकरे यांचा पक्ष स्वतंत्र आहे. ते स्वतंत्रपणे आपली मते मांडतात. त्यांना पाठिंबा देणारा तरुणांचा मोठा वर्ग आहे. निवडणुकीत त्यांना हवे तसे यश आले नसेल. पण याचा अर्थ तरुणांच्या मनातील त्यांची क्रेझ गेली असे मी मानणार नाही.

चार-पाच वर्षांत मोदी विरोधकांशी बोललेच नाहीत
नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून कसे काम करत आहेत ?

माहीत नाही. राजकारणात संवाद महत्त्वाचा असतो. मला वाटते की हे सरकार विरोधकांशी संवाद साधण्यात कमी पडत आहे. ४ तारखेला पंतप्रधान मोदी विरोधकांशी कोरोनाबाबत चर्चा करणार आहेत. कोरोनाचा विषय सोडला तर पंतप्रधानांनी गेल्या चार-पाच वर्षांत विरोधकाशी संवादच साधला नाही.

मोदी सांगतात ते पूर्ण खरे नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, ते राजकारणात तुमचे बोट धरून चालतात. तुमच्याशी चर्चा करतात, मार्गदर्शन घेतात. पण आपला पक्ष आणि भाजप यांच्यात नेहमी संघर्ष पाहायला मिळतो. असे का ?
ते
जे सांगतात ते काही पूर्ण खरे नाही. मी ज्या वेळेले देशाचा कृषिमंत्री होतो, त्या दहा वर्षांच्या कालखंडामध्ये माझा दृष्टिकोन होता की शेती खात्याचे काम ज्याच्याकडे असेल, त्या व्यक्तीने दिल्लीत बसून शेतीमालाच्या उत्पादनवाढीचा प्रश्न सुटणार नाही. त्याने बाहेर राज्यांमध्ये गेले पाहिजे. राज्य सरकारांना विश्वासात घेतले पाहिजे आणि यासंबंधीची शेतीची आणि शेतकऱ्यांची धोरणे राबवायला सहकार्य केले पाहिजे. मी ज्या वेळेला हे काम करत होतो, त्या वेळेला देशाच्या दहा-बारा राज्यांमध्ये आम्ही ज्या विचारांचे होतो त्यापेक्षा वेगळ्या विचारांची सरकारे होती. त्यात मोदी यांचेही गुजरातचे सरकार होते. त्यामुळे गुजरातमधील शेतकऱ्यांचे प्रश्न आले की त्यांना मनापासून मदत करण्याची माझी भूमिका होती. त्याचे कारण त्या त्या राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करणे ही शेतीमंत्र्याची जबाबदारी आहे. त्याच उद्देशाने मी गुजरातमध्ये अनेकदा नरेंद्र मोदींच्या सोबत अनेक जिल्ह्यांचे दौरे केले. त्यांच्या  प्रश्नांमध्ये साथ दिली. त्यामुळे लोकांच्या मनात तशी चर्चा होती. पण त्यांची राजकीय भूमिका त्यांनी बदलली नाही. शेतीच्या कामामध्ये त्यांनी आम्हाला मदत केली. पण ज्या वेळेला निवडणूक आली, त्या वेळी त्यांनी आमचा पराभव करा, असे म्हणत अत्यंत आक्रमक भाषण केले. त्यात काही चुकीचे नव्हते. त्यांच्या पक्षाची ती भूमिका किंवा त्यांची ती नीती होती.

राहुल गांधींमध्ये सातत्य कमी

देशात काँग्रेस पक्षाला काय भवितव्य आहे? पक्ष कोणत्या दिशेला जात आहे? यात राहुल गांधी यांची काही अडचण आहे का?

कुठल्याही राजकीय पक्षात जे नेतृत्व असते त्याची मान्यता संघटनेत किती आहे, हे महत्त्वाचे असते. एक गोष्ट मान्य केली पाहिजे की माझे सोनिया गांधी किंवा त्या घराण्याशी मतभेद होते. पण काँग्रेस पक्षाच्या रचनेत कार्यकर्ते आणि नेते यांच्यात अजूनही गांधी-नेहरू घराण्याबाबतची आस्था आहे. सोनिया गाधी काय किंवा राहुल गांधी काय, दोघेही त्यांच्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे बहुसंख्य लोक हे त्यांच्या विचारांचे आहेत आणि ही वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे. हा देशातला दोन नंबरचा पक्ष आहे.

देश आज राहुल गांधी यांचे नेतृत्व मानायला तयार आहे का?
त्यांच्यात काही प्रश्न आहेत. थोडेसे सातत्य कमी दिसते. 

लोक म्हणतात, शरद पवारांनी काँग्रेसचे नेतृत्व करावे...

विजय दर्डा - सध्या नरेंद्र मोदीजी ज्या प्रकारचे नेतृत्व करत आहेत, त्यांना सशक्त पर्याय देण्याबाबत मी विचारत होतो.
शरद पवार - तुमचा प्रश्न बरोबर आहे. पण असा पर्याय देणारा पक्ष कोणता? तर काँग्रेस. आता काँग्रेसमध्ये असलेल्या बहुसंख्य लोकांना मान्य असलेले नेतृत्व कोणते?
त्यांच्याकडे अजूनही अध्यक्षाचीच निवड झाली नाहीये ?
होणार आहे. म्हणजे होईलच आता.

आपल्याकडे निवडणूक कधी होत असते ?
आमच्याकडे तीन ते पाच वर्षांनी होते. या वर्षी होणार होती पण कोरोनामुळे पुढे ढकलावी लागली. काँग्रेसमध्येही निवडणूक होईल आणि जेव्हा होईल तेव्हा काही वेगळा निकाल लागणार नाही.
पण राहुल गांधी म्हणत आहेत की त्यांना अध्यक्ष व्हायचे नाही...
आता निवडणूक झाल्यानंतर कळेलच ना काय झाले ते...

त्यांच्यावर तुम्ही अध्यक्षपद लादत आहात..?
आम्ही कोणी लादत नाही, त्यांचा पक्ष लादत असेल...
तुम्ही त्या पक्षाचे सल्लागार आहात...
मी त्यांच्या अंतर्गत प्रश्नावर बोलणार नाही. तो त्यांचा प्रश्न आहे.

अनेक लोक म्हणत आहेत की, आता पवार साहेबांनीच काँग्रेसचे नेतृत्व करावे?
त्याला काही अर्थ नाही. काँग्रेस पक्षात त्यांचे अंतर्गत निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे. उद्या असे कोणी म्हटले की, राष्ट्रवादी पक्षातील निर्णय या पक्षाच्या नेतृत्वाने घ्यावा, आमचा पक्ष लहान असेल पण हे स्वीकारणार नाही. तसेच त्यांचेही आहे.

राष्ट्रवादी हा आता लहान पक्ष कुठे राहिला ?
मी देशपातळीवर बोलतोय. त्या तुलनेत लहान आहे. 

सुप्रियाचा इंट्रेस्ट राज्यात नाही
महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून तुम्ही 
सुप्रिया सुळे यांच्याकडे बघता का ?

माझ्या माहितीप्रमाणे तिचा रस राज्यात नाही. तिचा इंट्रेस्ट हा राष्ट्रीय राजकारणात आहे. संसदेत आहे. तिला उत्कृष्ट संसदपटूचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. लोकमतचाही उत्तम संसदपटूचा पुरस्कार मिळाला आहे. शेवटी प्रत्येकाचा इंट्रेस्ट असतो.

सध्या चर्चा आहे की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही आमदार अस्वस्थ आहेत. पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. हे खरे आहे का?
मला वाटते या तयार केलेल्या टेबल न्यूज आहेत. त्यापेक्षा वेगळे काही नाही. असे आहे की, एखाद्या लोकप्रतिनिधीचा त्याच्या मतदारसंघातला एखादा प्रश्न सुटला नाही, तर त्याची कुरकुर असते. नाही असे नाही. मोठ्या पक्षातही हे होते. बहुमताच्या पक्षातही हे होते. पण यामुळे काहीतरी वेगळा विचार करावा, पक्षाची चौकट सोडून काही तरी वेगळे करावे असा विचार कोणाच्याही मनात नाही. अजिबात नाही.

उद्धव ठाकरे यांच्या नावाला सोनिया गांधी व माझी संमती! 
आपण राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग केला आहेत. लोक असे म्हणत आहेत की, जोपर्यंत शरद पवारांची इच्छा आहे, तोपर्यंतच सरकार चालेल. याचा अर्थ काय?

राज्यात शिवसेनेची भूमिका सामंजस्याची आहे. काँग्रेसचे राज्यातील नेतृत्वदेखील समजूतदारपणे वागत आहे. त्यामुळे आम्ही एकत्रितपणे काम करत आहोत. त्यामुळे शरद पवार म्हणा किंवा आणखी कोणी काहीही म्हणो, याचा परिणाम सरकारच्या स्थिरतेवर होईल असे मला वाटत नाही. आम्ही तो परिणाम होऊ पण देणार नाही.

तुम्ही स्थिरतेबद्दल बोललात, त्यावरूनच पुढचा प्रश्न. मध्यंतरी बातमी आली होती की काही अधिकाऱ्यांनी हे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. काय प्रकार होता तो? असा प्रयत्न यापूर्वी कधी झाला आहे का?
माझ्याही वाचनात आले होते. पण मी काही त्याच्या खोलात गेलो नाही. त्याचे कारण येथील प्रशासन यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. लोकशाहीत एक सरकार येते, प्रशासन त्या सरकारच्या धोरणानुसार काम करते. उद्या दुसरे सरकार आले तर तेच प्रशासन त्या दुसऱ्या सरकारच्या धोरणानुसार काम करते. महाराष्ट्रातली नोकरशाही सरकारच्या धोरणांशी सुसंगत अशा पद्धतीने काम करते. त्यामुळे असा प्रकार माझ्या पाहण्यात कधी आला नाही. हां... एखाद-दुसरी व्यक्ती असे काही करत असेल. पण एकूणच महाराष्ट्रात तसे चित्र नाही.

हे सरकार चालावे यासाठीच तुम्ही उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनण्याचे सुचवले का?
असे नाही. संख्या हे सरकार चालवण्याच्या दृष्टीचे मोठे गमक आहे. त्यामध्ये क्रमांक एकची संख्या शिवसेनेची होती, हे वास्तव आहे. जे आपण मान्य केले पाहिजे. एक नंबरची संख्या शिवसेनेची होती, दोन नंबरची संख्या राष्ट्रवादीची, तर तीन नंबरची संख्या काँग्रेसची होती. त्याप्रमाणे आपआपल्या पक्षाच्या क्षमतेनुसार जागांचे वाटप केले आणि एकत्र राहायचा निर्णय घेतला. ठीक चालले आहे सगळे. नेतृत्व उद्धव ठाकरे यांचे असावे ही भूमिका आम्ही सर्वांनी मनापासून स्वीकारली. कारण त्यांची संख्या जास्त होती.

ते मुख्यमंत्रिपद घेऊ इच्छित नव्हते असे काही 
होते का ?

साधारणत: आपण हे पद घ्यावे की नाही, अशी कदाचित द्विधा मन:स्थिती असावी त्यांची... होतीच असे मी म्हणत नाही. पण आम्ही लोकांनी मात्र आग्रहाने भूमिका घेतली. तुमच्याकडे संख्या आहे, तुम्ही नेतृत्व घ्या. तुमच्याकडे नैतिक जबाबदारी आहे.
काँग्रेसने त्या वेळी आग्रह धरला की त्यांनीच मुख्यमंत्री व्हावे?
काँग्रेसने त्या वेळी संमती दिली. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांनी त्याला संमती दिली.  आपण हे पद घ्यावे की नाही, अशी द्विधा मन:स्थिती उद्धव ठाकरे यांची त्या वेळी असावी. होतीच असे मी म्हणत नाही. पण आम्ही लोकांनी मात्र आग्रहाने भूमिका घेतली.

तुमच्या या प्रदीर्घ वाटचालीत तुमच्या मनात राहतील अशा दोन-तीन घटना सांगू शकाल का?
काही गोष्टींचे मला भयंकर समाधान आहे. देशाचा कृषिमंत्री म्हणून मी दहा वर्षे काम केले. ज्या दिवशी मी कृषिमंत्री म्हणून शपथ घेतली, त्याच दिवशी संध्याकाळी माझ्याकडे एक फाइल आली. मी कृषी आणि अन्न व नागरी पुरवठा या दोन खात्यांचा मंत्री होतो. देशातील गव्हाचा साठा संपत आला आहे, परदेशातून गहू आयात करण्यासाठी परवानगी मागणारी ती फाइल होती. कृषिप्रधान देशाचा कृषिमंत्री पहिल्याच दिवशी परदेशातून अन्न आयात करण्यासाठी परवानगी देतो, या बाबीमुळे मी खूप अस्वस्थ झालो. मी काही त्यावर सही केली नाही. दुसऱ्या दिवशी मला पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा फोन आला. ते म्हणाले की, शरदजी, आपने स्टॉक देखा ? जल्द से जल्द इम्पोर्ट करने की आवश्यकता हैं. वो फाइल क्लीअर करो. मी नाइलाजाने त्यावर सही केली. त्याच वेळी ठरवले की या शेतिप्रधान देशाचे हे चित्र बदलायचे. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर म्हणून सांगतो, मी दहा वर्षांनी जेव्हा शेती खाते सोडले, तेव्हा गहू उत्पादन करून निर्यात करणारा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश भारत झाला. जगातला तांदूळ निर्यात करणारा एक नंबरचा देश भारत झाला. साखर निर्माण करणारा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश भारत झाला. फळबागांमध्ये जगात क्रमांक एकचा आणि दुधाच्या उत्पादनाच्या बाबतीतही जगातला क्रमांक एकचा देश भारत झाला होता. दहा वर्षांत त्या मंत्रालयात काम करून जे आऊटकम आले ते मनाला अतिशय समाधान देणारे होते. आता कारकिर्दीत चढ-उतार असतातच. माझ्या हातात राज्य होते. १९८० साली निवडणूक झाली आणि राज्य हातातून गेले. अर्थात तो मतदारांचा अधिकार असतो. सरकार येते आणि जाते. त्या वेळी माझ्याकडे ५४ आमदार होते. पण तीन महिन्यांत ४८ जण मला सोडून गेले. ५४ जणांचा पुढारी होतो, तो विधिमंडळात एकदम सहा जणांचा पुढारी झालो. हेही मी पाहिले आहे. ठीक आहे. सार्वजनिक जीवनात चढ-उतार येतच असतात. त्याची फारशी चिंता करायची नसते हे मी शिकलो.

या सगळ्या प्रवासात देव आपल्यासोबत होता...
लोकं माझ्यासोबत होते...
देवावर विश्वास नाही का ?
मी लोकांनाच देव मानतो...
देव आपल्याला उत्तम आरोग्य देवो, ही शुभेच्छा. धन्यवाद...

Web Title: I consider people to be God - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.