मोठी बातमी : कोरोनाचा धोका वाढला, उद्धव ठाकरेंनी मोदींना दिवसभरात तीनवेळा फोन केला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 12:38 PM2021-04-17T12:38:04+5:302021-04-17T12:41:08+5:30

coronavirus in Maharashtra : राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यममंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना गेल्या २४ तासांत तीनवेळा फोन केल्याचे वृत आले आहे. 

coronavirus: Uddhav Thackeray calls PM Narendra Modi three times a day on the backdrop of rising corona | मोठी बातमी : कोरोनाचा धोका वाढला, उद्धव ठाकरेंनी मोदींना दिवसभरात तीनवेळा फोन केला

मोठी बातमी : कोरोनाचा धोका वाढला, उद्धव ठाकरेंनी मोदींना दिवसभरात तीनवेळा फोन केला

Next

मुंबई - गेल्या दोन महिन्यांपासून वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येने आता महाराष्ट्रामध्ये भयावह रूप धारण केले आहे. (coronavirus in Maharashtra) कोरोनाला रोखण्यासाठी कडक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. तरीही रुग्णसंख्येत म्हणावी तशी घट झालेली नाही. दरम्यान, राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यममंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) गेल्या २४ तासांत तीनवेळा फोन केल्याचे वृत आले आहे.  (Maharashtra CM Uddhav Thackeray calls PM Narendra Modi three times a day on the backdrop of rising corona)

या संदर्भातील वृत्त टीव्ही ९ मराठीने प्रसारित केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या २४ तासांत पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तीनवेळा फोनवरून संपर्क साधला. यावेळी झालेल्या चर्चेत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत पंतप्रधानांना माहिती दिली. तसेच ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे परिस्थिती गंभीर बनली असून, त्यामुळे महाराष्ट्राला १२०० ते १५०० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी संपर्क साधला असला तरी मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांशी थेट बोलणे झालेले नांही. पंतप्रधान बंगालमध्ये प्रचारासाठी गेल्याने उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा होऊ शकली नाही, पंतप्रधान बंगालहून परतल्यावर मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधतील, अशी माहिती देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने या चर्चेबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले. 

महाराष्ट्रामध्ये काल पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ दिसून आली. महाराष्ट्रात काल दिवसभरात ६३ हजार ७२९ रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात ३९८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासातं ४५ हजार ३३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या आकडेवारीमुळे राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. 

दुसरीकडे देशातही कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. देशभरातही कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे.   शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे  २ लाख ३४ हजार ६९२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक कोटी ४५ लाखांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १ लाख ७५ हजार ६४९ वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी १६ लाख ७९ हजार ७४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १ कोटी २६ लाख ७१ हजार २२० रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशात कोरोना लसीकरण देखील वेगाने होत आहे. 

Read in English

Web Title: coronavirus: Uddhav Thackeray calls PM Narendra Modi three times a day on the backdrop of rising corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.