नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधला आहे. राज्यसभेत मोदी भावूक झाले होते त्यावरून थरुर यांनी पंतप्रधानांना टोला लगावला आहे. "पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत रडणं म्हणजे उत्तम अभिनयाचं प्रदर्शन" असल्याचं शशी थरुर यांनी म्हटलं आहे. राज्यसभेत काँग्रेसचे खासदार आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या निरोपादाखल केलेल्या भाषणाच्या वेळी मोदी काही क्षणांसाठी भावूक झाले होते.
माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचं पुस्तक 'बाय मेनी अ हॅपी अॅक्सिडन्ट : रिकलेक्शन ऑफ ए लाईफ' यावर आयोजित परिचर्चेत काँग्रेस नेते शशी थरुर सहभागी झाले होते. 'पंतप्रधानांनी राज्यसभेत रडणं म्हणजे उत्तम अभिनयाचं प्रदर्शन' असल्याचं म्हटलं आहे. तसेच 'हे कदाचित राकेश टिकैत (शेतकरी नेते) यांना प्रत्यूत्तर देण्यासाठी करण्यात आलं असावं... पंतप्रधानांना वाटलं असावं की आपल्याकडेही अश्रू आहेत' असं म्हणत शशी थरूर यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.
संपूर्ण मोदी सरकारने शेतकऱ्यांचे पाय अश्रूंनी धुवायला हवेत, पण...; संजय राऊत यांचा टोला
शेतकरी आंदोलनावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. "शेतकऱ्यांसाठी कोणाच्याही डोळ्यात अश्रू येत नाही" असं म्हणत पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. "संपूर्ण मोदी सरकारने आपल्या अश्रूंनी शेतकऱ्यांचे पाय धुवायला हवेत पण त्याच्यावर सर्वजण मौन बाळगून आहेत आणि त्या आंदोलनाची चेष्टा आणि थट्टा करताहेत, ते नौटंकी आहे असं म्हणताहेत. हा फार विचित्र प्रकार आहे" असं म्हणत संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
"नरेंद्र मोदी यांनी फार चांगल्या पद्धतीने कारभार पाहिला आहे. मुख्यमंत्री असताना त्यांच्या भावनेचा कधी बांध फुटला नाही तर ते कठोर राज्यकर्ते म्हणून काम करत होते. पण जेव्हा ते दिल्लीत आले तेव्हा पहिल्या दिवसापासून अधूनमधून भावनेचा बांध फुटतोय. त्यांच्या अश्रूंच्या संदर्भात कोणीही राजकारण करू नये अथवा चेष्टा करू नये" असं राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच शेतकरी आंदोलनाबाबत विचारलं असता संपूर्ण मोदी सरकारने शेतकऱ्यांचे पाय अश्रूंनी धुवायला हवेत असं म्हटलं आहे. "लाखोंच्या संख्येने शेतकरी गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्यावर आहेत. दोनशेपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण आजारी पडलेत. घर दार टाकून थंडी वाऱ्यात म्हातारे शेतकरी कुडकुडत बसले आहेत. अश्रुंचा महापूर यावा, राज्यकर्त्यांच्या डोळ्यात, असा हा प्रसंग असल्याचं देखील राऊत यांनी म्हटलं आहे.
"लोकसभेत एक, राज्यसभेत एक... ही अशी विभागलेली, कन्फ्यूज काँग्रेस देशाचं भलं करू शकत नाही"
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत शेतकरी आंदोलनावर भूमिका मांडली आहे. याच दरम्यान त्यांनी काही मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच काँग्रेसला सणसणीत टोला लगावला आहे. कन्फ्यूज काँग्रेस देशाचं भलं करू शकत नाही असं म्हणत मोदींनी हल्लाबोल केला आहे. "एवढी वर्षं देशावर राज्य केलेली पार्टी... पण लोकसभेत एक, राज्यसभेत एक. ही अशी विभागलेली, कन्फ्यूज काँग्रेस देशाचं भलं करू शकत नाही'' असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. माझ्या भाषणाने काँग्रेस उघडी पडेल अशी भीती असल्याचं देखील पंतप्रधानांनी म्हटलं आहे. काँग्रेसची लोकसभेत एक भूमिका, तर राज्यसभेत दुसरी भूमिका, इतकी विभागलेली आणि कन्फ्यूज पार्टी मी कधी पाहिली नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.