Hathras Gangrape : "तो आदेश कोणी दिला?, कधीपर्यंत हेच चालत राहणार?, तुम्ही कसे मुख्यमंत्री आहात?", प्रियंका गांधींचा घणाघात

By सायली शिर्के | Published: September 30, 2020 06:31 PM2020-09-30T18:31:02+5:302020-09-30T18:47:55+5:30

विरोधकांनी उत्तर प्रदेशातील सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा मागितला आहे.

congress priyanka gandhi questions to yogi adityanath over Hathras Gangrape | Hathras Gangrape : "तो आदेश कोणी दिला?, कधीपर्यंत हेच चालत राहणार?, तुम्ही कसे मुख्यमंत्री आहात?", प्रियंका गांधींचा घणाघात

Hathras Gangrape : "तो आदेश कोणी दिला?, कधीपर्यंत हेच चालत राहणार?, तुम्ही कसे मुख्यमंत्री आहात?", प्रियंका गांधींचा घणाघात

Next

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील 19 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. दिल्लीत सफदरजंग रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना मंगळवारी पीडितेचा मृत्यू झाला. यामुळे देशभर संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी हाथरस येथे मध्यरात्री जबरदस्तीने तिच्यावर अंत्यसंस्कार केले. पोलिसांच्या या भूमिकेवरून विरोधकांनी उत्तर प्रदेशातील सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा मागितला आहे. यानंतर पुन्हा एकदा प्रियंका यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. 

प्रियंका गांधी यांनी हाथरस घटनेसंदर्भात योगी आदित्यनाथ यांना काही प्रश्न विचारले आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे. "मी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारू इच्छिते… कुटुंबीयांकडून जबरदस्तीने हिसकावून घेत पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा आदेश कोणी दिला?, मागील 14 दिवसांपासून तुम्ही कुठे झोपला होतात? कार्यवाही का केली नाही? कधीपर्यंत हेच चालत राहणार? तुम्ही कसे मुख्यमंत्री आहात?" असं म्हणत प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. 

योगी आदित्यनाथांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; प्रियंका गांधींची मागणी

"रात्री अडीच वाजता कुटुंबीयांनी विणवनी केली पण हाथरस पीडितेचा मृतदेह जबरदस्तीने यूपी प्रशासनाने जाळला. ती जिवंत असताना सरकारने तिला संरक्षण दिले नाही, जेव्हा तिच्यावर हल्ला झाला तेव्हा सरकारने वेळेवर उपचार दिले नाहीत" असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच पीडितेच्या मृत्यूनंतर सरकारने कुटुबीयांकडून मुलीच्या अंत्यसंस्काराचा हक्क काढून घेतला आणि मृताला सन्मान दिला नाही, असा आरोप प्रियंका यांनी केला आहे. तसेच, मोठी अमानुषता, तुम्ही गुन्हेगारी थांबवली नाहीत, उलट तुम्ही गुन्हेगारांसारखी वर्तवणूक केली. अत्याचार थांबवला नाही, एक निष्पाप मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांचा दुप्पट छळ केला, असंही प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. आपल्या सरकारमध्ये न्याय नाही, तर फक्त अन्यायाचा बोलबाला आहे, असे प्रियंका गांधी यांनी सांगत योगी सरकारवर टीका केली आहे. 

"भारतमातेच्या मुलीची बलात्कार करून हत्या, उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा" 

काँग्रेसने उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "भारतमातेच्या मुलीची बलात्कार करून हत्या, उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा" असं काँग्रेसने म्हटलं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचं ट्विट केलं आहे. "भारतमातेच्या एका मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आली. दहा दिवसांनंतरही तक्रार दाखल केली नाही. तिला दिल्लीतील रुग्णालयात पोहोचवण्यास उशीर केला आणि पोलिसांनी मृतदेहावर जबरदस्तीने अंत्यसंस्कार केले. याला जंगलराज म्हणतात. उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा" असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. 

"उत्तर प्रदेशच्या 'वर्ग-विशेष' जंगलराजने आणखी एका तरुणीला मारलं"

"उत्तर प्रदेशच्या ‘वर्ग-विशेष’ जंगलराजने आणखी एका तरूणीला मारून टाकलं" असं म्हणत राहुल गांधींनी जोरदार टीका केली आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "सरकारने म्हटलं की फेक न्यूज आहे आणि पीडितेस मरण्यासाठी सोडून दिलं. मात्र ही दुर्देवी घटना खोटी नव्हती, पीडितेचा मृत्यूही आणि सरकारचा निर्दयीपणा देखील खोटा नव्हता" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच प्रियंका गांधी यांनी देखील योगी सरकारवर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशमधील कायदे व्यवस्था बिघडल्याचं म्हटलं आहे. 
 

Web Title: congress priyanka gandhi questions to yogi adityanath over Hathras Gangrape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.