बॉलिवूडला कोणत्याही राजकीय पक्षाच्या संरक्षणाची गरज नाही; काँग्रेस नेत्याने शिवसेनेला झापलं

By मोरेश्वर येरम | Updated: December 2, 2020 14:04 IST2020-12-02T14:03:05+5:302020-12-02T14:04:06+5:30

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी अभिनेता अक्षय कुमारची भेट घेतली होती.

Bollywood does not need the protection of any political party says Congress leader sanjay nirupam | बॉलिवूडला कोणत्याही राजकीय पक्षाच्या संरक्षणाची गरज नाही; काँग्रेस नेत्याने शिवसेनेला झापलं

बॉलिवूडला कोणत्याही राजकीय पक्षाच्या संरक्षणाची गरज नाही; काँग्रेस नेत्याने शिवसेनेला झापलं

मुंबई
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावरुन सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. बॉलिवूड मुंबईतून उत्तर प्रदेशात हलविण्याच्या हेतूनं चाचपणी करण्यासाठी योगी आदित्यनाथ मुंबईत आल्याचं बोललं जात आहे. आदित्यनाथ यांच्या या दौऱ्यावर शिवसेनेकडून टीका होत असताना आता काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीही या वादात उडी घेतली आहे. बॉलिवूडच्या मुद्द्यावरुन निरुपम यांनी शिवसेना आणि भाजपला सुनावले आहे. 

"बॉलिवूडला कुणीच कुठे घेऊन जाऊ शकत नाही आणि बॉलिवूडला कोणत्याही राजकीय पक्षाच्या संरक्षणाची गरजही नाही. सिनेप्रेमींनी आपल्या कष्टाने बॉलिवूडचा विराट विश्व इथं निर्माण केलं आहे. त्यासाठी तब्बल १०० वर्ष खर्ची झाली आहेत. त्यामुळे नेत्यांनी बॉलिवूड शिफ्ट करण्याच्या किंवा बॉलिवूडला वाचवण्याच्या वल्गना करू नये", असं ट्विट करत निरुपम यांनी शिवसेना आणि भाजपला खडेबोल सुनावले आहेत. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी अभिनेता अक्षय कुमारची भेट घेतली होती. उत्तर प्रदेशात फिल्मसिटी निर्माण करण्याची तयारी आदित्यनाथ यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांची अक्षय कुमारसोबत चर्चा झाली. त्यानंतर ते काही दिग्दर्शकांची देखील भेट घेणार असल्याचं कळतं. आदित्यनाथ यांच्या या दौऱ्यावर शिवसेनेने जोरदार टीका केली आहे. योगींनी मुंबईशीच पंगा घेतलाय का? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. 

Web Title: Bollywood does not need the protection of any political party says Congress leader sanjay nirupam