योगी सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा : पिंपरीत असंघटित महिला काँग्रेसचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 15:05 IST2020-10-05T15:03:10+5:302020-10-05T15:05:09+5:30
हाथरस घटनेची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या समितीने करावी

योगी सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा : पिंपरीत असंघटित महिला काँग्रेसचे आंदोलन
पिंपरी : उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारच्या कार्यकाळात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. तसेच हाथरस येथील बलात्कार प्रकरणातील बळी पडलेल्या पीडित तरुणीचे अंत्यसंस्कार पोलिसांनी कुटुंबियांच्या परस्पर केले. अशाप्रकारची दुर्दैवी घटना आजपर्यंत देशात कधीच घडली नाही. महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटनांबाबत योगी सरकार दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे हे सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार काँग्रेसच्या महिला संघटनेने केली आहे.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात हाथरस येथील घटनेचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले.तसेच पीडित तरुणीला श्रध्दांजली वाहण्यात आली. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात हाथरस येथील घटनेचा निषेध करण्यासाठी सोमवारी (दि.५) सकाळी अकरा वाहत आंदोलन करण्यात आले. या घटनेतील पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी काँग्रेसचे सरचिटणीस खासदार राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी गेले असता उत्तर प्रदेश सरकारने त्यांना अटकाव केला. त्याचाही यावेळी निषेध करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा शितल कोतवाल, सरचिटणीस पृथ्वीराज साठे, शहराध्यक्ष सुंदर कांबळे, पर्यावरण सेलचे प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे, एनएसयुआयचे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, तसेच असंघटीत महिला कामगार कॉंग्रेसच्या वंदना आराख, चंदाताई ओव्हाळ, संजना कांबळे, परवीन शेख, निलम गवळी, राजश्री वेताळे, शशीकला पोटफोडे, नितीन पटेकर, संजय साळवी, नवनाथ डेंगळे, संदेश नवले, आबा खराडे आदी उपस्थित होते.
शितल कोतवाल म्हणाल्या, सीबीआय ही यंत्रणा केंद्र सरकारच्या हातातील बाहुले आहे. त्यामुळे सीबीआय हाथरस घटनेचा निपक्षपणे तपास करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यात हस्तक्षेप करावा आणि या घटनेची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या चौकशी समितीच्या वतीने करावी. तसेच आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.