Maharashtra Election 2019: ....ही तर आपल्या विजयाची नांदी! राहुल कलाटे यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 16:48 IST2019-10-14T16:43:08+5:302019-10-14T16:48:01+5:30
काम कमी आणि दिखावा जास्त असल्यामुळे महायुतीच्या उमेदवारांची भिस्त केवळ स्टार प्रचारकांवर आहे...

Maharashtra Election 2019: ....ही तर आपल्या विजयाची नांदी! राहुल कलाटे यांचा दावा
पिंपरी : काम कमी आणि दिखावा जास्त असल्यामुळे महायुतीच्या उमेदवारांची भिस्त केवळ स्टार प्रचारकांवर आहे. मात्र, आपण केवळ नगरसेवक असतानाही जनतेत उतरून काम केल्यामुळे आपल्याला जनतेचा पाठिंबा वाढत आहे, विरोधी उमेदवाराला घाम फोडला असून हीच आपल्या विजयाची नांदी आहे, असा दावा चिंचवड विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी केला आहे.
रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून कलाटे यांनी दिवसभर प्रचार केला. दुचाकी रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. सकाळी नऊला रॅलीला सांगवी येथून सुरुवात झाली. जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, वाकड, पिंपळे निलखसह मतदारसंघाच्या विविध भागात ही रॅली काढली. रॅलीचे ठिकठिकाणी फटाके फोडून जंगी स्वागत केले. अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, राजेंद्र जगताप यांच्यासह अनेक आजी-माजी नगरसेवक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. विकासाची चाहूल फक्त राहुल, बॅटला मतदान करा, असे आवाहन कार्यकर्ते करीत होते.
कलाटे म्हणाले, ‘‘अनधिकृत बांधकाम, शास्ती कर, रिंगरोडचा प्रश्न सुटण्याची नागरिकांना अपेक्षा आहे. सामान्यांमध्ये मिसळून काम करणाºया, प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन काम करणाºया नेतृत्वाची मतदारसंघाला गरज आहे. ही गरज आपण पूर्ण करणार आहोत. करदात्यांच्या पैशांची अक्षरश: लूट सुरू आहे. नव्यानेच विकसित केलेल्या डायनोसोर उद्यानाचे मिरॅकल गार्डन सुरू करण्याच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी सुरू आहे. विकास कामांच्या नावाखाली भ्रष्टाचाराचा डायनासोर माजला आहे. जनता यावेळी या डायनासोरला धडा शिकविणार आहे.’’
कलाटे म्हणाले, ‘‘राज्यातील महत्त्वपूर्ण मतदारसंघांपैकी एक असलेल्या चिंचवड मतदारसंघात उच्चशिक्षित, उच्चविद्याविभूषित मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत. सजग व सुसंस्कृत असा येथील मतदार आहे. परंतु, कमी शिक्षण घेतलेले मतदारसंघाचे नेतृत्व करीत असल्याने विकासाचे व्हिजन नाही. परिणामी, एकीकडे चिंचवड विधानसभा मतदार संघाचे नागरीकरण वाढत असताना बकालपणा वाढत आहे. काळानुरूप मतदारसंघातील विकासाचे प्रश्नही बदलत आहेत. हे प्रश्न समजून घेण्यासाठी आपल्या सारख्या उच्चशिक्षित पदवीधर उमेदवाराची गरज आहे.’’