कधी येणार घरी ? युद्धाच्या सावटाखाली दुबईत अडकले पिंपरी-चिंचवडकर
By विश्वास मोरे | Updated: March 3, 2026 09:14 IST2026-03-03T09:12:47+5:302026-03-03T09:14:22+5:30
- आईच्या डोळ्यांत अश्रू, दुबईत अडकलेले लेकरू; मायदेशी परतीची आस लागली

कधी येणार घरी ? युद्धाच्या सावटाखाली दुबईत अडकले पिंपरी-चिंचवडकर
पिंपरी : दुबईमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने पर्यटन व अभ्यासदौरे, पुरस्कार सोहळे आदी विविध कारणांसाठी पिंपरी-चिंचवड परिसरातून दुबईला गेलेले साठहून अधिक नागरिक अडकून पडले आहेत. त्यामुळे आपण मायदेशी घरी कधी परतणार? अशी चिंता पर्यटकांना लागली आहे तर भारतातील त्यांच्या कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागलेला आहे. दुबईमध्ये सतर्कता असून मानसिक भीतीचे वातावरण आहे. मात्र, प्रत्यक्षात गंभीर परिस्थिती नाही, अशा प्रतिक्रिया पर्यटकांनी व्यक्त केल्या.
पिंपरी-चिंचवड शहरातून काही ग्रुप पिंपरी-चिंचवड शहरातून काही ग्रुप दुबई आणि आखाती देशांमध्ये पर्यटनासाठी गेले आहेत. किती लोक असावेत अशी नेमकी माहिती उपलब्ध नाही. मात्र, इंदिरा महविद्यालय, भोसरीतील दोन ग्रुप पर्यटनाला गेल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्यात मानसिक भीतीचे वातावरण आहे. भारतातील पिंपरी-चिंचवडमधील त्यांच्या कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागलेला आहे. याबाबत आपबिती सांगितली. परंतु, कुटुंबीयांना फार काळजी करू नये, असेही आवाहन त्यांनी केले.
पुणे व भोसरी परिसरातील ४० जणांचा ग्रुप अडकला
देशभरातील एका हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे ३७५ जण दुबईला पर्यटनासाठी आणि कार्यक्रमासाठी प्रोत्साहन सोहळ्यासाठी गेले होते. त्यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ४० जणांचा समावेश आहे. त्यात कंपनीचे पुण्याचे प्रमुख संदीप सूर्यवंशी असून, पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांचाही समावेळ आहेत. त्यांनी दुबईतील आपबिती सांगितली.
आई रडली, मायदेशी परतण्याची प्रतीक्षा
नरेंद्र बनसोडे म्हणाले, आम्ही २६ फेब्रुवारीला दुबईमध्ये आलो. त्यानंतर काही ठिकाणी पर्यटन केले. मात्र, सतर्कतेच्या सूचना दिल्याने आज दिवसभरातील सर्व पर्यटनाचे कार्यक्रम रद्द केले. आम्ही सध्या दुबई फेस्टिव्हल सिटीमधील हॉलिडे इन हॉटेलमध्ये आहोत. कालपासून येथील नागरिकांमध्ये थोडी भीती जाणवत आहे. मात्र, प्रत्यक्षात तशी काही परिस्थिती नाही. येथील प्रशासनाच्या वतीने प्रत्येकाच्या मोबाइलवर दक्षतेसंदर्भात सायरन वाजवला जात आहे माध्यमांमध्ये युद्धाच्या बातम्या येत असल्याने आमचे नातेवाईक घाबरलेले आहेत. सातत्याने चौकशी करत आहेत. आज तर माझ्या आईने फोन करून विचारणा केली. तिच्या डोळ्यांत पाणी आले होते. येथील वातावरण अजूनही सुरक्षित आहे. आम्ही सोमवारी भारतात परतणार होतो, मात्र त्या नियोजनामध्ये बदल झाला आहे.